स्मशानातला बाबासाहेबांचा पुतळा बाहेर काढला फक्त राज असरोंडकर यांच्या प्राणांतिक उपोषणामुळेच !

तो पुतळा राज असरोंडकर यांच्या प्राणांतिक उपोषणामुळेच तर काढला गेला. याचं श्रेय त्यांना देण्यात मनाचा मोठेपणा का दाखवत नाही आपण? वाचा मिलिंद धुमाळे यांचा लेख

Update: 2026-04-08 11:50 GMT

श्रेयवादाने आंबेडकरी चळवळीचे वाटोळे केले आहे. आम्ही तसे नव्हतो. नाही.

आम्ही संघटना स्थापन केली मुळात श्रेयवाद होऊ नये म्हणून, नाहीतर आमचे आंबेडकरी सॉरी आरपीआयचे नेते म्हणजे श्रेयवादात कोण मोठा, मी की तू यातच संपले, खुंटले आणि प्रस्थापितांच्या दारात येसकर याचक म्हणूनच राहिले. दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ शेवटच्या काळात याच कारणाने खचून गेले, इतके की शेवटी शेवटी माध्यमांच्या समोर अक्षरश: रडले हे पाहिलं आहे. एवढा मोठा डोंगर हलवणारा पँथर ढसाढसा रडताना पाहणे असहाय्य होतं. त्यांच्यावर आरोप करणारे बाजारबुणगे म्हणतात ढसाळ सेनेत गेले, शरण गेले, तसं कधीही नव्हतं, ढसाळ केवळ सामना मध्ये समष्टी सदर मध्ये लिहीत होते, त्यांच्यावर सेनेकडून उपचार करण्यासाठीचा खर्च भागवला गेला होता, त्याची ती परतफेड, समाज म्हणून तेव्हा आपण नालायक होतो ना, होतो की नव्हतो?

का कुणी मायचा लाल त्यांच्यासाठी फंड उभा करण्यासाठी पुढे नाही आला? ते आजारी असताना त्यांचे लेखही नंतर दुसऱ्याच कुणी त्यांच्या नावावर लिहिले असेही आम्ही मित्रांनी एका मोठ्या नेत्याच्या बैठकीत ऐकलं होतं. आम्ही या सर्व घडामोडीचे साक्षीदार आहोत, म्हणून त्यांच्याबद्दल कुणी काही बरळलं की संताप होतो. आपल्याकडे कार्यकर्ता जगवणारी सपोर्ट सिस्टम आहे का? नाही.

हा तर आम्ही श्रेयवादाला कधी थारा दिला नव्हता, आम्ही संघटना स्थापन केली तेव्हाही त्याअगोदरही आमच्या विभागात मंडळ हातात असताना, आमच्यापेक्षा लहान भावंडांना कोणताही अनुभव नसताना अध्यक्ष उपाध्यक्ष बनवले होते, आम्ही मार्गदर्शक भूमिकेत राहिलो होतो, तीच गोष्ट संघटनेत, परंतु आपला समाज म्हणजे खेकड्याचा गुणधर्म असलेला समाज, आपल्याच बांधवांना खाली खेचणारा. संघटनेत पण हेवेदावे सुरू झाले, कटाक्षाने आम्ही तिला नॉनपॉलिटिकल ठेवलं होतं. पण काही लोकांचा ईगो एवढा मोठा झाला की त्यातून बाहेर पडणंच योग्य होतं असं ठरवून बाहेर पडलो. जे आरपीआय गटांचे अन इतर संघटनांचे होते तेच इथेही झाले.

नवे प्रयोग करणाऱ्या आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला. पद सन्मान पैसा प्रतिष्ठा अशा कोणत्याही अपेक्षा न ठेवता. दोन्ही वेळेस पदासाठी विचारणा झाली दोन्ही वेळेस नम्रतापूर्वक नकार दिला. पण कधीही चुकीचे सल्ले दिले नाहीत, आजवर जे केले त्यातून संबंधित लोकांचा फायदाच झाला. आमची बांधिलकी समाज चळवळीशी आहे. आम्ही राजकीय लाभासाठी कधीही कुठेही गेलो नाही. काही वाईट लोक सगळीकडेच असतात म्हणा.पण आपल्या समाजात थोडं अधिक प्रमाण असावं यामुळे समाज आजही खितपत पडला आहे. समाजाचं भलं होत नाही. किंवा तसं भानच नाही.

मराठा समाजाकडून शिकावं कसं आपल्या माणसाला तळहातावर जपलं जातं, कितीतरी नेते आहेतच त्यांच्यात पण मनोज जरांगे ना समाजाने सर्व ताकद दिलीच, पाठीशी उभा राहिला, त्यांनी विजय देखील खेचून आणला. ब्राह्मण समाजाकडून शिकलं पाहिजे कसं आपल्या माणसाच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलं जातं. आमच्या इकडं मात्र हे कशाला? हा प्रश्न कशाला? तो मुद्दा कशाला? इथून सुरुवात.

मागेही अनिल मिश्रावर इकडं गुन्हा दाखल करण्यावर मतभेद, वाद.. हे कारण देणार समाजाला भावनिक करू नका, समाजाचा वेळ घालवू नका. जसा समाजात सगळेच नासामध्ये काम करत आहेत एक सेकंद जरी वेळ इकडे तिकडे झाला तर मोठं नुकसान होणार आहे. बोध गया आंदोलनातही तेच दिसले. जे करतात पुढाकार घेतात द्या ना समर्थन त्यांना, कशाला आपल्याला इनसिक्युर वाटायला पाहिजे? आता राज असरोंडकर यांनी जीव धोक्यात घालून आंदोलन केलं. सहा दिवस उपोषण केलं, यात ते एकटेच होते, समाज म्हणून आपण फक्त निमित्त होतो. तरीही काही धुरंधर लोक बोंबलत आलेच होते, भावनिक करू नका, वेळ घालवू नका. आता पुतळा काढल्यावर समाज भावनिक झाला का? समाजाचा वेळ गेला का? तो पुतळा राज असरोंडकर यांच्या प्राणांतिक उपोषणामुळेच तर काढला गेला. याचं श्रेय त्यांना देण्यात मनाचा मोठेपणा का दाखवत नाही आपण?

एवढ्या कोत्या मनोवृत्तीने काय साध्य होते? कसले समाधान मिळते? एकीकडे तथागतांचा विचार सांगायचा.समता बंधुता न्याय यातले बंधुता अन न्यायाचे तत्व अशावेळी कुठे जाते? शिवाय नीतिमान समाज म्हणून विवेकी विचारांचा समाज म्हणून आपली ओळख असताना अशी ओळख नीतीमत्ता कुठे विरघळून जाते?

लिहू का आणखी सविस्तर? इथं कोण कोण कसं वागतं? कसे आम्हाला निवडून बाजूला केले जाते, क्लोज ग्रुप करून सतत बदनामी केली जाते. आपल्याच लोकांकडून. पोस्ट शेअर करून त्यातील शब्दन शब्द किस पाडून स्क्रूटनी केला जातो. अन इमेज खराब केली जाते. आपल्या मागे पुढे करणारे दादा दादा करणारे गुलाम भाट पाळून चळवळीचे मातेरे करणारे असे क्रीम क्लास लोकही आहेत आपल्या समाजात. कुणी मोठा होत असेल तर त्याच्या विरोधात यांची सुप्त चळवळ सुरू झालीच म्हणून समजा. कसला आंबेडकरी विचार आहे हा? कोणत्या भगवान बुद्धांचा विचार चालवत आहात? खरंतर तुम्ही काही वाचलेलं देखिल नाही,वाचलं असतं अभ्यास केला असता तर असे विपरीत वागला असता?

एका एक करोड (मूळ संख्या कमी आहे) ग्रुपच्या एडमीन ने ज्याची सामाजिक ओळख काहीच नाही, ना सोशल मीडियात कुठे ओळख आहे, ना कधी चार ओळीची समाजासाठी पोस्ट ना कोणत्या वृतपत्रात कधी लेख, पण भाई असे ग्रुप काढून लाखों लोकांना कंट्रोल करणार. तिथं मला मोडरेटर केलेलं, आता मी काय साहित्य शेअर करतो सांगण्याची गरज नाही, जागल्याभारतच्या पोस्ट तिथं शेअर होत होत्या, अनेक लोकांना अपडेट्स मिळत होत्या, याने एका रात्री आम्हा सर्वांना उडवले. बरं नियंत्रण काढून घेणे समजू शकते, पण किमान पोस्ट शेअरिंग का बंद केली असावी? अभिव्यक्तीचा गळा घोटला की नाही? आता त्याने मला मागे कधीतरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, मी घेतली नाही, का घेऊ अशा व्यक्तीची?

मला हा अनुभव आंबेडकरी ग्रुपमध्ये अनेकदा येतो, बाता लोकशाहीच्या पण प्रत्यक्षात त्याच्या विपरीत वर्तन, मी अनेक ग्रुपमध्ये आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादी अन इतर जनरल यांनी कधीही पोस्ट अडवल्याचे दिसले नाही, पण वंचित पासून कोणताही आंबेडकरी ग्रुप असो हे लोक अडवणूक करतात, संकुचितपणा दाखवतात. मी विचार केला हे राजकीय असेल तर असं नाही, हा आपल्या समाजाचाच प्रॉब्लेम आहे. आणि हे वाईट आहे. यावर मला कधीतरी बोलायचं होतंच. आणि ते डोक्यावर पुस्तकांचे गठ्ठे घेऊन जाणारे अन ते शेअर करणारे लोक खरंच ते वाचतात का? हा प्रश्न मला अनेक वर्षापासून पडलेला आहे. तसे असते तर समाज आजही मागे का आहे? आजही आपण आश्रित का आहोत? आपण संघटित का नाही? आजही आपले प्रश्न का सुटलेले नाहीत? आजही आपल्याला न्यायासाठी का झगडावे लागते? इतर समाजावर अशी वेळ का येत नाही? जैन पारशी लिंगायत हे देखील आपल्या समकक्ष आहेत,फक्त आपलीच दुरावस्था का? एवढे गटतट बेबनाव का? नक्की काय वाचन चालू आहे आपलं? याची उत्तरे कुणी शोधणार आहे?

आता राज असरोंडकर यांच्यामुळेच पुतळा निघाला आहे, हे सर्वानाच माहिती आहे. मी काहीच जास्तीची माहिती दिली नाही, फक्त व्यक्तीची ओळख दिली. अनेकजण त्या व्हिडिओखाली देखील हेच म्हणत आहेत. सहा दिवस राज असरोंडकरांनी जीव धोक्यात घातला तेव्हा श्रेय घेणारे ग्राऊंडवर कुठेच नव्हते, आम्ही प्रत्यक्ष भेट दिलीय, त्याअगोदरही राजसरांच्या संपर्कात होतो. day1 पासून हे आंदोलन पाहतो आहे. घडामोडी पाहतो आहे. कुणाचे काय योगदान होते पाहिलं आहे. राज यांची बदनामी देखील करणारे या दरम्यान पाहिले आहेत. खूप लोकांनी पत्रव्यवहार केला असेल ते मान्यच पण राज असरोंडकर यांनी उपोषण केले नसते तर तुमच्या पत्रांना केराची टोपलीच दाखवलेली होती. त्यामुळे मोठं मन करा. अन निर्विवाद त्यांना श्रेय द्या.

या अशा वृत्तीमुळे नवे तरुण चळवळीत यायला तयार नाहीत. त्यांना दिसतं हे जेष्ठ लोक कसे कर्मठ आहेत,कोत्या मनाचे आहेत,यांचा ईगो आकाशाला लाजवणारा आहे. आणि आमच्यासारखेही आता निराश व्हायला लागले आहेत,माझे अनेक सहकारी लिहिणे बंद करून गायब आहेत,जुने सहकारी अकाऊंट बंद करून गेले आहेत,काहींनी विषयावर लिहिणे बंद केले आहे. अनेकजण जगण्याच्या संघर्षात झगडत आहेत,त्याची कारणे असतील त्यात हे एक कारण आहेच.

समाज असा वागणार असेल दखल घेणारच नसेल तर कुणी कशासाठी करेल? आता तर सरकार वेड्यासारखे वागत आहे,सर्वांवर मानहानीच्या केसेस इतर गुन्हे दाखल करत आहेत, मग कोण कशाला या भानगडीत पडणार आहे? नका काही करू, निदान जे करतात त्यांना समर्थन देता येत नसेल तर पायात पाय घालून पाडण्याचा प्रयत्न तरी करू नका. असेच प्रश्न विचारणारे लिहिणारे कमी कमी होत गेले की मग तुमचा आवाजही पोहोचणार नाही, हे एवढं लक्षात ठेवा. आपल्या सर्वांना एकमेकांची तेवढीच गरज अन मदत हवी असते. संघटित होणे आणि एकमेकांचा आदर सन्मान राखणे अन् याहीपेक्षा नैसर्गिक हक्क अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून न घेणे एवढं केलंत तरी समाजाचे भलेच होईल.

बघा पटलं तर..

जयभीम!

Tags:    

Similar News