अशोक खरात आणि 'भूमिका' !

Update: 2026-04-07 09:33 GMT

1977 सालचा 'भूमिका' हा श्याम बेनेगल यांचे दिग्दर्शन असलेला गाजलेला चित्रपट. 'भूमिका' ही एका अभिनेत्रीच्या जीवनातील अनेक भूमिका, यश, अपयश, प्रेम, शोषण आणि तिच्या स्वातंत्र्याच्या तळमळीची गहन आणि भावनिक कथा. गतपिढीच्या ख्यातनाम अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या आत्मचरित्रावर आधारलेला हा चित्रपट स्मिता पाटील यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानला जातो.

कथा गोव्यातील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात सुरू होते. उर्वशी उर्फ उषा (स्मिता पाटील) ही एका देवदासी परंपरेच्या प्रसिद्ध गायिकेची नात आहे. तिच्या आजीने तिला शास्त्रीय संगीत शिकवलेलं. उषाची आई (सुलभा देशपांडे ) एका व्यसनी आणि मारहाण करणाऱ्या इसमाची पत्नी असते. त्याच्या अकाली मृत्यूनंतर, आईचा विरोध असूनही, कुटुंबातीलच एक व्यक्ती असलेल्या केशव दळवी (अमोल पालेकर) सोबत मुंबईतील एका स्टुडिओमध्ये गायिका म्हणून ऑडिशन देण्यासाठी उषाला नेले जाते.

ही एका प्रक्रियेतील पहिली पायरी असते, जी उषाच्या प्रेमळ आजीच्या पसंतीने आणि आईच्या भीतीने पार पाडली जाते. अखेरीस हीच प्रक्रिया तिला कॅमेऱ्यासमोर उभं करते आणि किशोरवयीन स्टार बनवते; पुढे जाऊन केशवसोबत तिचा दुर्दैवी प्रेमविवाह घडवून आणते.

कुरूप आणि वयाने खूप मोठ्या असलेल्या केशवला त्याच्या शैशवापासूनच तिच्याबद्दल आकर्षण वाटत होते, लग्नाआधीच्या गर्भधारणेने उषा हे नाते हट्टाने पुढे नेते. तिच्या कुटुंबाप्रती असलेल्या त्याच्या निष्ठेची तो हेतुपूरस्सर वारंवार आठवण करून देतो. खेरीज उषाच्या प्रारंभिक ऐहिक यशातही त्याचा वाटा आहे याची तो जाणीव करून देत राहतो. असे असूनही ज्या घरात आपला छळ होतो तिथून घरातून सुटका मिळवण्याचे एक साधन म्हणून उषा त्याच्याकडे पाहते. वास्तवात उषा ही एक हट्टी स्त्री आहे, स्वतःच्या अभिनय कारकीर्दीवर तिचा जीव आहे. तिचा स्वभाव बंडखोरीचा असल्याने, आपल्या कडक शिस्तीच्या आईला आव्हान देण्यावर ती ठाम आहे. उषाच्या आईचा या लग्नाला विरोध आहे कारण केशव त्यांच्या जातीचा नाही.

हट्टी उषा काही केल्या ऐकत नाही, ती केशवसोबत लग्न करते. लग्नानंतर उषाला हे पाहून धक्का बसतो की, केशव तिचा 'बिझनेस मॅनेजर' म्हणून काम करत राहतो आणि तिच्यासाठी लोकप्रिय अभिनेता राजन (अनंत नाग) सोबत मुख्य भूमिका मिळवून देतो; वास्तवात राजनचे उषावर एकतर्फी प्रेम असते. आपल्या व्यवसायात अयशस्वी ठरलेला असल्याने, तो पूर्णपणे उषाच्या कमाईवर अवलंबून असतो; आपल्या नाकर्तेपणाचा सल केशवच्या मनाला पोखरत असतो. त्यामुळे तो एकाच वेळी टोकदार अहंकारी नि वाईट स्वभावाचा मत्सरग्रस्त नवरा बनतो आणि एक लोभी दलाल बनतो.

सह-कलाकाराविषयी घृणा वाटत असूनही तो उषाला काम करायला भाग पाडतो. त्यांच्या दांपत्यजीवनात मुलगी जन्माला आल्यानंतर उषाला अभिनय सोडून केवल गृहिणी म्हणून राहायचे असते. तिच्या विरोधाला न जुमानता, काम करण्यास भाग पाडतो. साहजिकच, त्यांचे नाते अधिकाधिक विषाक्त होत जाते. विशेषतः स्टार-मॅगझिनमधील गप्पांमुळे केशवच्या मनात संशयाचे भूत उभे राहते. राजनसोबत उषाचे प्रेमसंबंध आहेत असं त्याला वाटू लागतं. अर्थात या गोष्टीत काही अंशी तथ्य असते देखील मात्र हे प्रेम एकतर्फी असतं!

नवऱ्याकडून होणारा शाब्दिक आणि शारीरिक छळ, तसेच पोटच्या मुलीपासून आणि आईपासून तिला दूर राहावे लागते. हा विरह तिला घायाळ करतो. त्यातच कामानिमित्त अधूनमधून हॉटेलमध्ये राहण्यास तिला भाग पाडले जाते. खचून गेलेली उषा, आधार शोधण्याच्या निमित्ताने अखेरीस नव्या संबंधाकडे वळते. यातूनच तिच्या आयुष्यात दुसरे पुरुष येतात. निराशावादी वृत्तीचा आणि आत्मकेंद्रित विचारांवर फोकस करणारा दिग्दर्शक सुनील वर्मा (नसीरुद्दीन शाह) अल्पकाळासाठी तिच्या आयुष्यात येतो.

सुनीलशी जवळीक झाल्यानंतर उषाला आधार मिळण्याऐवजी निराशेच्या गर्तेने ग्रासले जाते. त्याच्यासोबत ती दुहेरी आत्महत्येचा कट रचते, जो सुनीलकडूनच हाणून पाडला जातो, पराभूत मनाने उषा त्याला अलविदा म्हणते. तिच्या परिघात नव्या पुरुषाची एंट्री होते. विलक्षण श्रीमंत व्यावसायिक असणाऱ्या विनायक काळे ( अमरीश पुरी ) सोबत ती आपमर्जीने राहू लागते. लग्नाचे आमिष दाखवून आपल्या आलिशान इस्टेटीवर एक लाडकी रखेल म्हणून तिला 'ठेवतो'. दुसरी पत्नी म्हणून उषाला क्षणभर एक प्रकारची प्रतिष्ठा मिळते, ज्यामुळे तिला विनायकची आई (दिना पाठक), मुलगा आणि अंथरुणाला खिळलेल्या पत्नीकडून काही प्रमाणात प्रेम आणि आदर मिळतो. मात्र उषाचा आनंद दीर्घकाळ टिकत नाही.

एके दिवशी जेव्हा ती विनायकच्या मुलाच्या प्रेमाखातर त्याचा बालहट्ट पुरा करण्यासाठी गावाजवळच्या जत्रेत एकट्याने कारमधून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला कळते की, यासाठी तिला अगदी मूलभूत स्वातंत्र्याचीही किंमत मोजावी लागते. काळेच्या सरंजामी पुरुषप्रधान नियमांचे पालन करणे तिला अशक्य होते. आपण नजरकैदेत अडकलो आहोत याची जाणीव झाल्यावर तिच्यासाठी अजूनही कायदेशीर नाते असलेल्या, तिचा एके काळचा तिरस्कृत पती केशवच्या हस्तक्षेपात सुटकेची एकमेव आशा दिसते. गुपचुप चिठ्ठी पाठवून ती त्याच्याशी संपर्क साधते.

पत्र मिळताच तिच्या कामाईवर डोळा ठेवून असणारा लोभी केशव पोलिसफाटा घेऊन तिला ताबडतोब न्यायला येतो. तिच्याच चेहऱ्याच्या जाहिरात फलकांनी सजलेल्या मुंबईत, आणि त्याच नीरस हॉटेलमध्ये व एकाकी परिस्थितीत तिला परत आणतो. वयाने मोठी झालेली उषाची मुलगी, उषाला तिच्यासोबत राहण्यासाठी आमंत्रित करते, पण उषा नकार देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात, हॉटेलच्या खोलीत उषा एकाकी अवस्थेत विमनस्क मनाने बसलेली असते, तितक्यात तिला राजनचा फोन होतो. संभ्रम कायम ठेवून सिनेमा संपतो.

भूमिकाचा पीक पॉईंट म्हणजे विनायकच्या घरातून उषाचं निघून जाणं! एकेक वस्तूंचा, माणसांचा निरोप घेऊन ती निघते. निघताना विनायकच्या पत्नीपाशी येते. सर्व पातळ्यांवर आयुष्याची लढाई हरलेली ती हतबल स्त्री शक्य तितक्या कारुण्याने उषाला एक त्रिकालाबाधित सत्य सुनावते. ती म्हणते, "बायकांचे फक्त पलंग बदलतात, स्वयंपाकघरं बदलतात, वाट्याला आलेल्या माणसांचे मुखवटे बदलतात, पण त्यांच्या नशिबी आलेले भोग बदलत नाहीत. शोषण करणारी माणसं बदलत नाहीत"

'भूमिका' आठवण्याचे कारण म्हणजे अशोक खरातने जे काही केले आहे त्यावर सोशल मीडियावर वितंडवाद सुरु आहे आणि त्याच्याकडे गेलेल्या स्त्रियांविषयी समाजात दुही पडली आहे, काहींना प्रकर्षाने वाटते की या बायका आपखुशीने गेलेल्या बदचलन बाया होत तर माझ्यासारख्या काहींना वाटते की या स्त्रियांचे सरसकटीकरण करणे अन्यायकारक ठरेल. कोणत्याही व्यक्तीची पार्श्वभूमी नीट ठाऊक असल्याशिवाय संबंधितांच्या चारित्र्यावर कधीही कुणीही प्रश्नचिन्ह लावू नये! कॅरेक्टर असॅसिनेशन करणे ही गोष्ट जिवंतपणी मरणयातना देण्यासारखे आहे.


Tags:    

Similar News