महाड सत्याग्रहाचे ९९ वर्षे ; चवदार तळ्यापासून समतेच्या क्रांतीपर्यंत
शतकानुशतकांपासून सार्वजनिक पाण्यावर असलेली बंदी झुगारून देत, “आम्हीही माणूस आहोत” हा स्वाभिमानाचा आवाज देशभर पोहोचवणारा हा लढा होता. आज या ऐतिहासिक घटनेला ९९ वर्षे पूर्ण होत असताना, त्या संघर्षाची प्रेरणा आणि समतेची मूल्ये जपणे हीच खरी मानवतेची ओळख आहे.
महाड येथे 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेकडो अस्पृश्यांनी चवदार तळे महाड येथे त्या तळ्याच पाणी पिण्याचा सत्याग्रह केला. शेकडो वर्षांपासून अस्पृश्य समाजाला सार्वजनिक पाणी पिण्याच्या ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती.
1923 साली बॉम्बे विधान भवनात तत्कालीन विधान भवनाचे सदस्य, सत्यशोधक विचारांचे असलेले थोर समाज सुधारक सी के बोले यांनी मांडलेल्या ठरावा द्वारे मुंबई कायदेमंडळात कायदा तयार होऊन सर्व पाणवठे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुली करण्यात आलेली होती. परंतु अस्पृश्य समाजास सवर्णांकडून सार्वजनिक पाणवठ्यात पाणी पिण्यास धर्माच्या आधारे कठोर विरोध होता. ही अत्यंत अमानवी बाब होती.
19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे "कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद" भरवण्यात आलेली होती. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या परिषदेसाठी तत्कालीन अस्पृश्य जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती तर होतीच. परंतु यात चित्रे, सहस्त्रबुद्धे, इत्यादी मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे इतर सवर्ण समाजातील सहकारी सुद्धा उपस्थित होते. चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील तरुणांनी या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात मदत केली होती व या बाबत बाबासाहेबांनी आपल्या 3 एप्रिल 1927 च्या बहिष्कृत भारत च्या अंकात त्यांचे विशेष आभार देखील मानले होते. या परिषदेत अस्पृश्य वर्गाच्या उद्धारासाठी आवश्यक असलेल्या अनेक विषयांवर विविध ठराव पारित करण्यात आले होते. परंतु चवदार तळे येथे जाऊन प्रत्यक्ष आपण तेथील पाणी पिऊन सत्याग्रह करणार असल्याबाबत कुठलीही पूर्वकल्पना या परिषदेत देण्यात आलेली नव्हती. बाबासाहेबांनी या योजने बाबत गोपनीयता बाळगली होती.
परिषदेतील अध्यक्षीय भाषण व आभार प्रदर्शन झाल्यानंतर अनंत विनायक चित्रे यांनी सुचवले की महाड येथील अस्पृश्य वर्गाची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. म्युन्सिपालिटीने ठरावाद्वारे येथील सर्व तळे खुले केले असले तरी आजवर अस्पृश्य वर्गाने प्रत्यक्ष याठिकाणी पाणी भरण्याचा प्रघात सुरू झालेला नाही. तरी महाड येथील चवदार तळे येथे जाऊन, पाणी पिऊन आपण या परिषदेद्वारे तो प्रघात सुरू करूया. यानंतर परिषदेस उपस्थित असलेले सर्वजण मिरवणूक काढत चवदार तळे येथे दाखल झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या ओंजळीत पिले आणि त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेकडो अस्पृश्य बांधवांनी देखील पिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह करून समतेचा संघर्ष सुरू केला. यावेळी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी हे स्पष्ट केले होते की आम्ही केवळ पाणी पिण्यासाठी चवदार तळ्याला जात नसून आम्ही सुद्धा इतरांसारखे मनुष्य आहोत हे ठासून सांगण्यासाठी जात आहोत.
"आम्ही चवदार तळ्याला केवळ त्याच पाणी पिण्यासाठी जात नाही. तर आम्ही सुद्धा इतरांप्रमाणेच मनुष्य आहोत हे ठासून सांगण्यासाठी आम्ही तेथे जात आहोत. हे स्पष्ट असावे की ही सभा समतेचे निकष स्थापित करण्यासाठी बोलवण्यात आलेली आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पाणी या निसर्गाच्या संपत्तीवर जितका अधिकार सवर्णांचा तितकाच आमचाही आहे आणि आम्ही तो मिळवणारच हे बिंबवण्याचा त्यावेळी बाबासाहेबांचा प्रयत्न होता.
यानंतर महाड गावात उच्चवर्णीयांकडून वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात आल्या. अस्पृश्य लोक चवदार तळ्यानंतर वीरेश्वराचे मंदिर देखील बाटवणार अशी अफवा पसरली व गावातील सवर्ण या ठिकाणी एकवटले. दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या सवर्णांच्या जमावाने परिषदेसाठी आलेल्या अस्पृश्य लोकांवर हल्ला केला, यात अनेकजण जखमी झाले. यावेळी जशास तसे उत्तर देण्याची काही अस्पृश्यांची तयारी होती. बाबासाहेबांना तसे काही जणांनी विचारले होते. परंतु बाबासाहेबांनी यावेळी संयमाची भूमिका घेतली. त्यांना आपला सत्याग्रह अहिंसा व कायदेशीर चौकटीपासून भरकटू द्यायचा नव्हता. पुढे या अस्पृश्यांसोबत मारामारी करणाऱ्या गुंडांवर कायदेशीर कार्यवाही झाली. त्यांना 4-4 महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.
तेथील लबाड उच्च वर्णीय सनातन्यांनी नंतर बाबासाहेबांपुढे कोर्टात अनेक कायदेशीर पेच उभे केले. अनेक दिवस कोर्टात हा खटला चालला. पण बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर कोर्टातही या सनातन्यांना नमवले.
1927 वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात 25, 26, 27 तारखेला बाबासाहेबांनी पुन्हा महाड येथे महाड सत्याग्रह परिषद भरवली. महाडच्या तत्कालीन सवर्ण लोकांनी डॉ. आंबेडकर व इतर चार जणांच्या विरोधात फिर्याद दिली. कोर्टाकडून अस्पृश्यांना चवदार तळ्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्याचा हुकूम मिळवण्यात त्यांना यश आले. परंतु यावेळी बाबासाहेबांनी धर्मव्यवस्थेला मोठा हादरा दिला. या परिषदेत मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या सत्याग्रहास आज 20 मार्च 2026 रोजी 99 वर्ष पूर्ण होत आहे. या एका शतकात डॉ. आंबेडकरांच्या या समतेच्या क्रांतिकारी संग्रामामुळे संपूर्ण देशभरातील अस्पृश्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. पुढे बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1950 रोजी देशाला दिलेल्या संविधानामुळे अस्पृश्यतेवर कायदेशीर बंदी आणली गेली. संविधानात समान अधिकार मिळाले.
- इंजि.मुकुल निकाळजे
आंबेडकरी विचारांचे अभ्यासक