Shahaji Raje Bhosale Jayanti : शिवरायांच्या स्वराज्यामागचा खरा विचार: शहाजी राजे यांचे दूरदर्शी नेतृत्व

Update: 2026-03-18 08:43 GMT

Shahaji Raje Bhosale Jayanti शहाजी राजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या पराक्रमी तेजस्वी father of Shivaji Maharaj पुत्राकडून शिवरायांकडून ते पूर्ण करून घेतले, त्याची जबाबदारी त्यांनी जिजाऊ माँसाहेबांवर सोपवली! वेरूळचे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे आजोबा होत. मालोजीराजांचे लग्न फलटणचे देशमुख वणंगपाळ उर्फ वणगोजी निंबाळकर यांच्या कन्या दीपाबाई (नंतरचे नाव ऊमाबाई) यांच्याशी झालेलं. लग्नानंतर संतानप्राप्तीसाठी त्यांनी तत्कालीन अहमदनगरच्या सुफी संत शहाशरीफ़ दर्गाहमध्ये अनुग्रह मागितला. मालोजीराजे आणि उमाबाई या दांपत्यास इस.1594 आणि 1597 साली दोन मुले झाली.

शहाशरीफ़ यांच्यावरील श्रद्धेपोटी मालोजीराजे नि उमाबाई यांनी या अपत्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे शहाजीराजांना थोरले संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही तीन मुले झाली. आज मालोजीराजे भोसले हयात नाहीत व ते आताच्या काळात जन्मलेले नाहीत या दोन्ही गोष्टी एका अर्थाने बऱ्या म्हटल्या पाहिजेत कारण तथाकथित संस्कृतीरक्षकांनी शिवाजीराजांच्या वडिलांचे नाव शहाजी आणि काकांचे नाव शरीफजी असे ठेवले म्हणून त्यांनाही ट्रोल केले असते! असो. 18 मार्च 1594 रोजी, मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाई साहेब यांच्या पोटी शहाजी राजांचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात मालोजी व विठोजी भोसले दोघेही फलटणच्या वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्यासोबत रहिवास करत होते. होते. मालोजीराजांचा पराक्रम पाहून वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती. कालांतराने त्यांचे नाव उमाबाई ठेवण्यात आले.

मालोजीराजांच्या अकाली मृत्यूनंतर वयाच्या पाचव्या वर्षी शहाजीराजे निजामशाहीचे जहागिरदार झाले. शूर रणवीर योद्धे अशी ख्याती असणारे शहाजीराजांचे व्यक्तिमत्व विलक्षण तेजस्वी आणि देखणे होते. ऑक्टोबर 1624 मध्ये तत्कालीन अहमदनगरमधील भातवडी येथे झालेल्या युद्धात त्यांनी तलवार आणि डावपेच दोन्हीचा वापर करत एकाच वेळेस आदिलशाही आणि दिल्लीच्या मुघल बादशाहीला पराभवाचे पाणी पाजले होते. या लढाईमुळे शहाजीराजांचे नाव कर्णोपकर्णी झाले. भूप्रदेशाचा वापर त्यांनी हत्यारासारखा केला, जो पुढे जाऊन शिवबांच्या गनिमी काव्याच्या डावपेचाचा महत्वाचा भाग ठरला.

शहाजीराजांनी आदिलशाही आणि निजामशाही दोन्हीकडे चाकरी केली, तिथे त्यांना पराक्रमी सरदार म्हणून मानसन्मानही मिळाला आणि त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्नही तितकाच झाला. आदिलशाही दरबारात दौलतखान (खवासखान) नावाचा जो मुख्य वजीर होता त्याचे कारभारी म्हणून मुरार जगदेव काम पाहत होते. दौलतखानास खवासखान ही पदवी असल्याने इतिहासात याचे नाव खवासखान म्हणूनच येते. मुघल बादशाह शाहजहानने जेव्हा दक्षिणेकडील राज्ये जिंकण्याची मोहीम सुरु केली त्यावेळी दक्षिणेतील निजामशाही व आदिलशाही परस्परांबरोबर भांडत होत्या. या धामधुमीच्या काळात आदिलशहाकडून मुरार जगदेव व रणदुल्लाखान यांना पुण्यास पाठवण्यात आले. पुणे हे त्याकाळी निजामशाही राज्यातील एक प्रमुख तटबंदीयुक्त शहर होते; खेरीज शहाजी महाराजांचे ते मुख्य ठाणे होते. मुरार जगदेवने पुण्याचा निजामशाही कोट नष्ट करून शहाजी महाराजांचे वाडे जाळले आणि प्रचंड लूट केली. यावेळी त्यांनी पुण्यावर आदिलशाही अमल सुरु झाला आहे हे दाखवण्यासाठी पुण्याच्या मूळ कसब्यात जाळपोळ करून तेथे गाढवाचा नांगर फिरवला आणि या ठिकाणी पुन्हा कुणीही वास्तव्य करू नये असा इशारा दिला. पुण्यास जाळपोळ केल्यावर मुरार जगदेवने भुलेश्वर येथे दौलत मंगळ हा किल्ला बांधून तेथून पुणे प्रांतावर आदिलशाही अमल सुरु केला.

या सर्व घटनांनी शहाजीराजे प्रचंड विचलित झाले आणि त्या दरम्यानच आपले स्वराज्य असले पाहिजे ही संकल्पना त्यांच्या आणि जिजाऊंच्या मनात रुजत गेली. मुरार जगदेवने जिथे पहार ठोकून गाढवाचा नांगर फिरवला होता तिथे नंतरच्या काळात शिवबा आणि जिजऊंनी सोन्याचा फाळ असणारा नांगर फिरवला! त्यांच्या मनात स्वराज्याची जिद्द, उमेद आणि प्रेरणा रुजवणारे शहाजीराजेच होते! रयतेच्या स्वातंत्र्याचे स्वराज्याचे आपले स्वप्न आपल्या पत्नी आणि पुत्राकडून पूर्ण करवून घेणारे शहाजीराजे दृष्टे होते. संयम आणि पराक्रम हे त्यांचे स्थायीभाव होत. आज त्यांची जयंती. स्वराज्य संकल्पक, उत्तम प्रशासक आणि महापराक्रमी राजास अभिवादन!

- समीर गायकवाड

Similar News