Indian Politics and Godmen : राजकारण आणि बुवाबाजी, नेते अजूनही धडा का घेत नाहीत?
राजकीय नेते आणि बुवा-बाबा यांच्या भेटींमुळे समाजात अंधश्रद्धेला बळ मिळते... वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाला पुढे घेऊन जाण्याऐवजी नेतेमंडळी ढोंगी बाबा-बुवा अडकून पडले आहेत? खरातच्या निमित्ताने आजवरच्या नेत्यांचे बाबा-बुवा-महाराज यांचा लेखाजोखा मांडणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख
why Indian politicians follow godmen सर्व राजकारण्यांनी आता तरी धडा घ्यावा
Indira Gandhi इंदिरा गांधी - धीरेंद्र ब्रम्हचारी
नरसिंहराव - चंद्रास्वामी
शंकरराव चव्हाण - सत्यसाई बाबा
शिवराज चाकूरकर.
अडवाणी, मोदी -आसाराम बापू
पंजाब हरियाणा नेते- राम रहीम
आणि आजचा खरात- एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर
वरील नावे ही फक्त झलक आहे. खरे तर अपवाद वगळता जवळपास सर्वच राजकीय नेत्यांचा असा एक गुरु असतो. स्थानिक महाराजांकडे तर त्या तालुका जिल्ह्यातील नेते जात असतात. काहीजण उघडपणे भेटतात तर काहीजण अंधारात. अलीकडे मोबाईल आल्यामुळे फोटो शूटिंग होतात अन्यथा जुन्या काळात हे पुढे येत नव्हते.
राजकारण ही अत्यंत अस्थिर गोष्ट आहे. सतत असुरक्षिततेची भावना असते व तीव्र महत्त्वाकांक्षाही असते. त्यात राजकीय नेते पारंपरिक धार्मिक असतात. त्या मानसिकतेतून यांच्याकडे ते ओढले जातात, त्यात त्यांना काही गैरही वाटत नाही.. त्यातून मग निवडणुकीचा अर्ज कधी भरायचा इथपासून तर शपथ कधी घ्यायची ? पुढे काय होईल हे विचारत राहतात व आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी होम हवन अशा अनेक गोष्टी करत राहतात. सामान्य माणसेही अशीच असतात तेही या बाबांच्या कच्छपी लागलेली असतात पण फरक हा आहे की हे भोंदू बाबा राजकीय संबंधांचा लगेच वापर सुरू करतात. बेकायदेशीर कामे करून घेतात. इस्टेट वाढवतात आणि अनेक राजकीय नेते यांच्याकडे येत असल्याचा सतत प्रचार करतात आणि त्यातून सामान्य माणसांमधील TRP भलताच वाढतो. त्यातून पुन्हा ते आर्थिक व लैंगिक शोषण करून स्वतःचे महत्त्व वाढवतात, गुन्हेगारी कृत्य करतात व समाजातील बुवाबाजी त्यातून वाढत जाते... रामरहीम सारख्या विकृत बाबाला सतत सवलत देऊन आता शिक्षाही माफ होते.
आसाराम बापूच्या दर्शनाला गुजरात मधील आणि देशातील अनेक राजकीय नेते भेटीचे फोटो आहेत. वाजपेयी, अडवाणी, नरेंद्र मोदी यांचे व्हिडिओ आहेत पण आपल्या पोलीस व न्याय व्यवस्थेने धाडस दाखवत तरीही त्यावर मात करत त्याला जेलमध्ये पाठवले पण त्यावरून राजकीय नेते काहीच धडा घेत नाही.
अर्थात राजकीय नेत्यांचेही तीन प्रकार करावे लागतील.
१) अशा प्रकारच्या बाबांचे उद्योग माहीत असून त्याला मदत करणारे किंवा काळा पैसा लपवायला अशा बाबांचा उपयोग करणारे नेते
२) दुसरा प्रकार असुरक्षिततेतून व महत्त्वकांक्षेतून धार्मिक विधी, भविष्य यासाठी या नेत्यांना शरण जाणारे राजकीय नेते
३) तिसरा प्रकार जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या बाबाचे जाहीर दर्शन घेतले तर लोकांमध्ये आपले स्थान पक्के होते अशा भावनेने जाणारे नेते.. देवस्थानाच्या विविध महाराजांच्या दर्शनाला त्यामुळेच अनेक नेते जात असतात. महाराजांच्या मेळाव्यात आवर्जून जातात.
किमान आजच्या या प्रकरणावर नेत्यांनी धडा घ्यावा आणि मोबाईलच्या काळात तुमची अंधारातली भेट ही गुप्त राहणार नाही हे लक्षात घेऊन बुवा बाबांपासून दूर राहावे... यातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की, भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्था जर ठरवली असल्याने संवैधानिक पदावर असताना सरकारी गाडीने सरकारी यंत्रणेचा वापर करून अशा प्रकारच्या बुवा बाबांकडे जाऊ नये आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणेचा वापर करून धार्मिक ठिकाणी दर्शनाला जाणे ही टाळले पाहिजे. समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी नेत्यांनी त्याचे पालन करायला हवे कारण एकदा नेते धार्मिक ठिकाणी गेले त्या देवस्थानची गर्दी ही वाढत जाते... लोकांच्या अंधश्रद्धेला बळ मिळते.
सत्य साईबाबा यांच्या मृत्यूनंतर तिथे जाऊन रडणारा सचिन तेंडुलकर यामुळेच अनेकांना खटकला होता. काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा या ठिकाणी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबा यांना तिथे निमंत्रित करून त्यांची पूजा केली होती. तेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी त्याला विरोध करून एक लेख लिहिला होता व ज्या सत्यसाईबाबांवर गुन्हे दाखल आहेत व हातचलाखीचे जे प्रयोग करतात अशी व्यक्ती संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानात येऊच कशी शकते ? असा प्रश्न विचारला होता. आज दुर्दैवाने धार्मिक राजकारणामध्ये हे कोणालाही खटकत नाही पण आजच्या घटनेने सर्वपक्षीय नेत्यांना सद्बुद्धी लाभो हीच या सर्वत्र पसरलेल्या सर्वपक्षीय श्रद्धास्थान असलेल्या बाबांच्या चरणी प्रार्थना....!!!!!!!!!!!!
GodmenPolitics, IndianPolitics, BlindFaith, FakeBaba, SecularIndia, PoliticalControversy, SocialJustice, RationalThinking