Pakistan Mediation Iran US Ceasefire : पाकिस्तानने साधली संधी, भारताने गमावली!

जगाला युद्धाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठीची शस्त्रसंधी पाकिस्तानच्या मध्यस्तीने... वाचा समीर गायकवाड यांचा लेख

Update: 2026-04-08 04:19 GMT

Pakistan Mediation Iran US Ceasefire  जी संधी सर्वाथाने आपल्याला होती, जे काम आपला देश पुर्वी करायचा, ज्यासाठी आपण ओळखले जात असू ते काम पाकिस्तानने केलं! ती संधी पाकिस्तानने नेमकी साधली! जगाला युद्धाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठीची शस्त्रसंधी पाकिस्तानच्या मध्यस्तीने झाली! आपली माध्यमे रात्रंदिवस पाकिस्तानच्या मध्यस्तीची टवाळकी करत राहिली आणि अखेर त्याच पाकिस्तानने हे करून दाखवलं! वास्तवात पाहता आपले आणि इराणचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत. पाकिस्तान इराणचे तितके सख्य नव्हतेच.

1994 मध्ये, पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉ-ऑपरेशनने एकत्र येत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या जिनिव्हा बैठकीत भारताविरुद्ध ठराव आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये भारतावर काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी इराणने पाकिस्तानच्या प्रस्तावित ठरावा विरोधात नकाराधिकार वापरला होता. भारतासाठी ही खूप सकारात्मक बाब ठरली होती.

2001 मध्ये, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इराणला भेट दिली होती. तिथे दोन्ही देशांदरम्यान 'तेहरान डिक्लरेशन'वर स्वाक्षरी झाली होती.

त्यानंतर इराणचे अध्यक्ष मोहम्मद खतामी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान करण्यात आलेली 'न्यू दिल्ली डिक्लरेशन' यामुळे भारत-इराण संबंध अधिक मजबूत झाले.

'तेहरान डिक्लरेशन'मध्ये दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य, आर्थिक आणि व्यापारी संबंध, प्रादेशिक स्थिरता ते अफगाणिस्तानात शांततेसाठी प्रतिनिधी सरकारच्या स्थापनेपर्यंतच्या प्रमुख मुद्द्यांवर हा करार झालेला होता.

2003 मध्ये भारताने इराणला चाबहार बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव दिला होता. जेणेकरून, भारतीय माल पाकिस्तानला बायपास करून रस्ते आणि रेल्वे प्रकल्प - आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) द्वारे अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचू शकेल.

2016 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणला भेट दिली. India's Prime Minister Narendra Modi visited Iran त्याच वर्षी या कराराला मान्यता देण्यात आली. हजारो कोटींची भारतीय गुंतवणूक असलेले हेच चाबहार बंदर सद्य भारतीय नेतृत्वाचा जिवलग मित्र असलेल्या इस्राएलने उध्वस्त केले आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान हा दोन्ही देशांसाठी एक समान धोका होता. त्यामुळे तिथे सहकार्य स्वाभाविक होतं. चाबहार बंदर करारामुळे भारताला पाकिस्तानला मागे टाकून अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये थेट प्रवेश मिळाला होता. आपण त्यावर शेण पसरवलंय! आपण चाबहारसारख्या सर्व शक्यता गमावल्या आहेत. आपण केलेली सर्वात मोठी चूक ट्रम्प यांच्या राजवटीत झाली, जेव्हा आपण ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकलो आणि इराणकडून तेल खरेदी करणं बंद केलं. आपण अमेरिकेला हे सांगायला हवं होतं की जर त्यांना आमच्याशी मैत्री करायची असेल तर त्यांना आमच्या हितांनाही प्राधान्य द्यावं लागेल.

इराणच्या शाहच्या काळात, ते भारताच्या खूप जवळ येऊ इच्छित होते. त्यांनी 'इराण-हिंद शिपिंग लाइन' आणि 'मंगलोर ऑइल रिफायनरी' स्थापन केली. भारताला पेट्रोलियम पुरवठा करण्यात इराणने एक महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आणि इराणने 15 मार्च 1950 रोजी 'फ्रेंडशिप ट्रीटी' अर्थात मैत्री करारावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची औपचारिक सुरुवात झाली होती. या करारामध्ये असं म्हटलं होतं की, दोन्हीही देश शांतता आणि मैत्रीच्या मार्गावर चालतील. हा तोच काळ होता, जेव्हा जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन ध्रुवांमध्ये विभागलं गेलेलं होतं. आणि या विभागणीमध्ये भारताने अलिप्ततेचा मार्ग स्वीकारलेला होता.

जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' The Discovery of India  या पुस्तकामध्ये लिहिलंय की, "जगात होत असलेले बदल आशियातील देशांना पुन्हा एकमेकांकडे पाहण्यासाठी भाग पाडत आहेत. येणाऱ्या काळात भारताची इराणशी जवळीक वाढेल, यात शंका नाही."

आणि आता या समरप्रसंगी आपण काय केलं? आपलं नेतृत्व कशात दंग होतं? आपण खूप काही गमावून बसलो आहोत. आतातरी आपल्या परराष्ट्रनीतीचे पुनरावलोकन व्हावे.

- समीर गायकवाड

 India Iran Relations History, India Foreign Policy Iran, Pakistan Mediation Iran US Ceasefire, India Iran Strategic Partnership, Chabahar Port India Iran, India Middle East Policy Analysis, Iran India Friendship Treaty 1950, India Iran Trade and Energy Relations, Pakistan Role in Iran Ceasefire, India Lost Diplomatic Opportunity

Similar News