मीडिया संदर्भात घडलेल्या महत्त्वाच्या तीन घटना...
सरकार कोणाचं आहे. याचा विचार न करता, गेल्या आठवड्यात तीन उद्योगपतींनी मीडियाशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले... काय आहेत हे निर्णय वाचा... वाचा अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख
मोठ्या कॉर्पोरेटच्या नेत्यांमध्ये, गुंतवणूकदारांमध्ये होत असलेल्या बदलांचे स्वागत केले पाहिजे. अलीकडच्या काळातील तीन घटना...
(१) रुपर्ट मरडॉक हे मीडिया मुघल मानले जातात. न्यूज कॉर्प ही त्यांची कंपनी. वृत्तपत्रांची साखळी, फॉक्स न्यूज सारखा टीव्ही चॅनेल ही कंपनी चालवते. त्यांचा वारसदार जेम्स मरडॉक. "माझ्या बापाची मीडिया कंपनी सत्य काय हे लोकांसमोर न आणता समाजात परस्परात सतत संशय पेरत असते. द्वेष पेरत असते. हे मला पटत नाही" म्हणून त्यांनी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचा राजीनामा दिला.
(२) राजीव बजाज. भारतातील बजाज उद्योग समूहाचे सध्याचे प्रमुख. धंदा वाढवण्यासाठी वाटेल त्याला मी जाहिराती देणार नाही. जे टीव्ही चॅनेल देशात द्वेष पसरवतात. त्यांच्या जाहिराती बंद
(३) एक्झॉन मोबिल जगातील तेल क्षेत्रातील दादा कंपनी. मागच्या आठवड्यात "नेक्स्ट एरा" नावाच्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटलायझेशन एक्झॉन मोबिल पेक्षा जास्त होते. वॉल स्ट्रीट वरील गुंतवणूकदार पर्यावरण स्नेही कंपन्यांना उचलून धरत आहेत.
समाज परिवर्तनाच्या चळवळीत आयुष्यभर काळ्या-पांढऱ्यात , नैतिक, शुद्ध भूमिका घेणे, मी आयुष्यात कोणतीही तडजोड केली नाही. असे म्हणत स्वतःची पाठ थोपटत एक दिवस मारून जाणाऱ्यांबद्दल मला आदर आहे.
पण मुद्दा आहे जग बदलण्याचा, व्यक्तीकेंद्री नैतिक इमेज बनवण्याचा नाही. समाज परिवर्तन करू पाहणाऱ्यांकडे व्यापक वैचारिक पट असला पाहिजे; त्यातून राजकीय लढाईत आपले प्राधान्यक्रम काय? आपले राजकीय शत्रू आणि मित्र कोण हे ठरवता येईल. तरुणांना आवाहन; खरे जग प्रचंड गुंतागुंतीचे आहे. ते समजून घेण्यासाठी मन मोकळे ठेवा.
संजीव चांदोरकर (१३ ऑक्टोबर २०२०)