धक्कादायक: सहकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Update: 2021-11-04 02:29 GMT

पुणे// वसई पोलिस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या राहत्या घरी गळफास लावून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. पोलीस दलातील वाल्मिक गजानन आहिरे या कर्मचाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

दीपाली बापूराव कदम असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, याबाबत तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर वाल्मिक आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी दीपालीने आपल्या भावाला पोलीस कर्मचारी त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

वाल्मिक आहिरे हा पालघर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. मृत दीपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, दीपाली ही वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. तिचे लग्न ठरले असताना देखील या पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक त्रास देऊन तिचे लग्नही मोडले. त्यामुळे या झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दीपालीचे दीड महिन्यापूर्वी भोसरी येथील तरुणाशी लग्न ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला आणि तिच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींना फोन करून जीवे मारण्याची धमकी देत होता. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यालाही दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Tags:    

Similar News