दोन दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा

Update: 2021-12-04 13:10 GMT

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील अनवली व कासेगाव भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मनसेकडून शेताच्या बांधावरच धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. दरम्यान यावेळी मनसेकडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी तीन लाख रुपयांची तसेच इतर शेतमालासाठी एकरी सरासरी एक लाखाच्या पुढे मदत करावी अशी मागणी करण्यात आली. तर विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा भरपाई न दिल्यास विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व विमा कंपन्यांच्या ऑफिसमध्ये मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल दिला असा इशारा यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.

धोत्रे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत अशी मागणी केली. परंतु 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच त्या भागाचे पंचनामे होतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगताच धोत्रे चांगलेच आक्रमक झाले. राज्यामध्ये शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन सत्तेवर आलेले तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधील नेत्यांनी व मंत्र्यांनी कुठल्याही अटी शर्तीचे बंधन न घालता नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करावेत. केंद्र सरकारने ही यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकऱ्यांना केवळ भूलथापा देत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना या सरकारचा ढोंगीपणा शेतकरी, कष्टकरी,सामान्य जनता, कामगार सर्वांनाच दिसून आला आहे. त्यामुळे राज्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला असेल त्या सर्व ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना दोन दिवसाच्या आत शासनाने सरसकट मदत जाहीर करावी अन्यथा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात महाविकासआघाडी, केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल व याचे परिणाम नक्कीच केंद्रासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारला भोगावे लागेल असा इशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी याप्रसंगी दिला आहे.

Tags:    

Similar News