हिजाब परिधान करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये बंदी, धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर

Update: 2022-02-05 08:14 GMT

एकीकडे देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढले असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. तर दुसरीक़डे कर्नाटकमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पुन्हा एकदा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्नाटकमधील उडपी जिल्ह्यातील कुंडूपूरमध्ये एका  कॉलेजमध्ये मुस्लीम मुलींना डोक्यावर हिजाब घालून येण्यास कॉलेज प्रशासनाने मनाई केली आहे. पण या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अशाप्रकारे हिजाब बंदी करणे हे मुस्लिम मुलींना शिक्षणापासून दूर लोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

दुसरीकडे ज्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारण्यात आला, त्यांनी कॉलेजबाहेर जोरदार आंदोलन केले. तसेच कॉलेजने आपल्या नियमावलीत गणवेशाला मॅचिंग हिजाब घातलेला चालणार आहे, असे लिहिले होते, असा दावा केला आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनावर कुणाचा दबाव आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटकातील इतरही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यार्थ्यांना भगव्या शॉल पांघरुन घेण्याचे आवाहन केले आणि काही ठिकाणी विद्यार्थी अशा भगव्या शॉल पांघरुन आल्याचेही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार टीका केली आहे. "तोकडे कपडे घातलेल्या किंवा फॅशनेबल फाटकी जीन्स घालणार्‍या मुली यांना चालत नाहीत. अंगभर कपडे घालणाऱ्या, डोक्यावरुनही हिजाब घेणाऱ्या मुलींना हे कॉलेजात बंदी घालतात. यांना अभिप्रेत असलेली संस्कृती नेमकी काय आहे?"


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावरुन जोरदार टीका केली आहे. मुस्लिम विद्यार्थ्यीनींचे हिजाब त्यांच्या शिक्षणाच्या आड आणत भारतातील मुलींचे भविष्य खराब केले जात आहे, पण देवी सरस्वती सर्वांना ज्ञान देते, भेदभाव करत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Similar News