BHR पतसंस्था घोटाळा... मुख्य आरोपी गजाआड!

राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज झंवर याला नाशिक येथून ताब्यात घेतले.

Update: 2021-08-10 13:58 GMT

बीएचआर पतसंस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी नोव्हेंबर २०२० मध्ये पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेळा अटक सत्र राबवून राज्यभरातून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक झाली होती. आता मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याला अटक झाली आहे. झंवर हा भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. त्याच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.

BHR प्रकरणी झंवर यांची अटक महत्वपूर्ण - भाग्यश्री नवटक्के

सुनील झंवर याच्या अटकेसंदर्भात बोलताना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, "गेल्या आठवडाभरापासून एक विशेष पथक सुनील झंवर याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन सातत्याने बदलत होते. तो अहमदाबाद येथून मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आला होता. त्यानंतर उज्जैन येथून नाशिकला आला. पोलिसांनी मंगळवारी सकाळी नाशिकच्या पंचवटी भागातून त्याला अटक केली, असे पोलीस उपायुक्त नवटके यांनी सांगितले. नाशकात झंवर नातेवाईकांकडे थांबला होता. मोबाईल लोकेशनवरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. दरम्यान, नाशिक येथे असताना बंगल्याच्या गॅलरीत आल्यानंतर पोलिसांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याचे गुपचूप फोटो काढले. तो झंवर असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली."

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, "सुनील झंवर हा बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. त्याची अटक या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकते. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी होईल, त्यानंतर पोलीस पथक त्याला पुण्यात आणणार आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाईल," असे नवटके यांनी सांगितले.

मध्यंतरी सुनील झंवर हा पोलिसांना सापडत नव्हता. त्याला फरार करण्याची प्रक्रिया पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केली होती. तेव्हा झंवरने पुण्याच्या विशेष न्यायालयात शरण येत अटक वॉरंट रद्द करून घेतले होते. त्यानंतर त्याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला होता. सुनील झंवरने मुंबई उच्च न्यायालयात २ मार्च रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याला १५ दिवसांचे अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच या १५ दिवसांच्या काळात पुणे न्यायालयातून अटकपूर्व जामीन घ्यावा, अशी सूचना केली होती. परंतु १५ दिवसांची मुदत संपल्यानंतरही झंवरने सेशन कोर्टातून जामीन न घेता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने झंवरला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर झंवरने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत पुन्हा एकदा १५ दिवसांचे संरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळली होती.

Tags:    

Similar News