वारकऱ्यांच्या मदतीला धावले 'एकनाथ'

राज्यात एकीकडे राजकीय पट रंगला आहे. तर दुसरीकडे लाखो वारकरी आषाढी वारीच्या निमीत्ताने पंढरपुरच्या दिशेने चालत आहेत. या वारीत सांगली येथे झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीला थेट मुख्यमंत्री धावून गेले आहेत.

Update: 2022-07-07 03:04 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार सांभाळताच निर्णय आणि बैठकांचा धडाका लावला आहे. दरम्यान सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यातच मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे.

मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे. त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे.

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ.रुपेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

आषाढी वारी अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं आहे. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.



Tags:    

Similar News