प. बंगालमध्ये काँग्रेसचे चुकलेच, सामनामधून पुन्हा टीका

भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडीची सध्या चर्चा सुरू आहे. पण यामध्ये काँग्रेसचे कुठे चुकले यावर सामनामधून भाष्य करण्यात आले आहे.

Update: 2021-04-02 02:35 GMT

प.बंगालच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात असताना ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडी निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी पत्र लिहिले आहे. याच पत्राचा संदर्भ देत सामनामधून राष्ट्रीय आघाडीच्या कल्पनेचे स्वागत करण्यात आले आहे. पण विरोधकांमध्येच एकजूट नाही अशी टीका करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसवरही टीका करण्यात आली आहे. काय म्हटले आहे अग्रलेखात ते पाहूया...

देशात केंद्रीय सत्तेत असलेल्या भाजपची दादगिरी बिगर भाजपशासित राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने एका छत्राखाली येऊन लढा द्यावा, असे आवाहन सध्या व्हिलचेअरवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन, नवीन पटनायक, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. पण हा एकत्र येण्याचा प्रयोग प्रत्यक्षात आकार घेईल काय? आज आपापल्या राज्यात अनेक प्रादेशिक पक्ष 'राष्ट्रीय' असल्याचा तुरा मिरवीत स्वतःचे स्वतंत्र राजकारण करीत आहेत. प्रत्यक्ष प. बंगालात तृणमूल काँग्रेस व सोनिया गांधींची काँग्रेस हातात हात घालून लढत नाही. ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे एकत्र येण्याच्या प्रयोगाची सुरुवात कोलकात्यापासून होणे गरजेचे होते, पण प. बंगालातील भाजपच्या आक्रमणानंतर ममता बॅनर्जी यांना सगळय़ांनी एकत्र यावे असे वाटत असेल तर त्या भावनेचे स्वागत व्हावे. विरोधकांचा एकोपा नसल्यानेच लोकशाहीचे मातेरे झाले आहे. या शब्दात टीका करण्यात आली आहे.

Similar News