Ashok Kharat case : 'खराता'यन.. राजमान्यता आणि लोकमान्यता...
खरात काय.. त्यांच्यासारखे असंख्य भोंदूबाबा महाराज काय, त्याला शरण जाणारे व्हीआयपी काय. मुळात झाडाचे मूळ म्हणजे राज्याची बहुसंख्य जनताच बोगस झाली आहे. मग त्या जनतेच्या झाडाच्या फांद्या सोनेरी फळे कुठून देणार.!!
Maharashtra godman controversy भोंदू बाबा खरातचा 'कुटाणा' काही केल्या कमी होत नाहीये. जेव्हढं कुटलं जातंय त्यापेक्षा जास्त मसाला बाहेर येतोय.! टीव्हीवरील बातम्यांमध्ये त्याचाच जोर जास्त आहे. त्याला सध्या पोलीस कोठडी आहे. आणि एकूण स्वतः मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं घेतलेले हे प्रकरण पाहता, खरातला पोलिसांच्या कोठडीत व्हीआयपी थाट मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. Tv News channels टिव्हीवर बातम्यांमध्ये त्याला Police पोलिसांबरोबर अडखळत चालताना बघून त्याला पोलिसांचा 'विशेष प्रसाद' मिळाला असावा असा अंदाज आहे. असे असताना, हा महाराष्ट्राचा कुपुत्र ज्या प्रकारची स्टेटमेंट्स देतोय ते पाहून.. विशेषतः मी भक्तांचं भले करायला गेलो आणि मलाच त्रास झाला.. महिलांशी शारीरिक संबंध हा विधींचाच एक भाग होता. मी कोणत्याही महिलेला जबरदस्ती केलेली नाही.. वगैरे वगैरे.. अशी विधाने पाहिल्यावर त्याला त्याच्या कृत्यांचा अजिबात पश्चात्ताप झालेला दिसत नाहीये. उलट तो त्याच्या कृत्यांचं निर्लज्ज समर्थन करताना दिसतोय.
तो कोठडीत काही मंत्रोच्चार करतो आहे अशाही बातम्या ऐकल्या आहेत. असे असेल तर तपास यंत्रणांना त्याच्या psychological मानसिक अवस्थेची ( सायकोलोजिकल..) तपासणी करावी लागू शकते का अशी एक शक्यता वाटतेय का.. अर्थात तो निर्णय सर्वस्वी तपास यंत्रणांचा असेल. कारण, इतके सगळं होऊनही तो आपल्या किळसवाण्या गुन्ह्यांची भलामण करतोय असं वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहून प्रथमदर्शनी तरी वाटतेय.! शिवाय विशिष्ट थोरामोठ्यांच्या (!) सहाय्याने तो हवाला रॅकेट चालवत असावा, या आजच्या ताज्या धक्कादायक बातमीने खरात हा सामान्य गुन्हेगार नसून आर्थिक गुन्हेगारीच्या एका मोठ्या रॅकेटचा भाग असावा अशी शक्यता असावी का.. याची उत्तरे तपास यंत्रणेकडून महाराष्ट्राला यथावकाश मिळू शकेलही.! पण खरात या भोंदूगिरीच्या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जातायत की काय असे वाटायला लागले तर नवल वाटायला नको.!
'चाळीस आमदार' हे दोन शब्द महाराष्ट्राच्या वेगळ्या संदर्भात आठवणीत आहेत. पण यावेळी आमदार सर्वपक्षीय असावेत आणि त्यांचा अलिबाबा अशोक खरात असावा. अशी शक्यता महाराष्ट्राचे लाडके (!) प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊतांना अनेकजण हसण्यावारी घेतात हे ठीक आहे.पण Sanjay Raut संजय राऊत हे एकेकाळी उत्कृष्ट गुन्हे पत्रकार होते हे विसरता येणार नाही. तेही एक्सप्रेस वृत्तसमूहाचे.! त्यांना गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी कळू शकते.! बाकी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी.!
गोरगरीब, ग्रामीण जनतेचे आणि आदिवासींचे सुद्धा जादूटोणा करणारे असंख्य साधू बाबा महाराज स्त्रीपुरूष असतात. बिचाऱ्या अडाणी अशिक्षित गरिबांच्या असंख्य समस्या असतात. त्यांना झोपडी, डोंगरावरचे क्रिमिनल बाबा महाराज साधू सफाईने मूर्ख बनवतात.! पण.. खरात हा श्रीमंतांच्या जादूटोण्याचे प्रतिनिधित्व करत होता.! त्यांच्याकडे जाणारे.. सॉरी त्यांच्या दरबारात हजेरी लावण्याची किंमत व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी भक्तांनाच परवडण्यासारखी होती असे म्हटले जातेय.!
वृत्तवाहिन्यांकडून आलेल्या बातम्यांनुसार राज्याचे श्रीमंत राजकारणी, त्यांची कुटुंबे, राज्याचे श्रीमंत उच्चाधिकारी आणि त्यांची कुटुंबे यांचा जास्त सफाईने वावर त्याच्या तथाकथित अघोर पूजेसाठी या भोंदू जादूटोणा राजाच्या (!) दरबारात होता. ममता कुलकर्णी ही आता विस्मरणात गेलेली एकेकाळची बॉलिवूडची मोठी स्टार. तिने आपल्या खरात बाबाच्या लिंगपिसाट वृत्तीला बळी पडलेल्या दुर्दैवी महिलांवर ताशेरे ओढलेत. तुम्हाला तो घाणेरडा स्पर्श करू पाहत असताना, त्याला प्राणपणाने विरोध करता आला असता.. तो का केला नाही. जबरदस्ती करताना त्याला लाथ मारून का उडवले नाही असे प्रश्न तिने विचारलेत.! असो.. असे बाहेरून विचारणे सोपे असते.. कदाचित आमच्या बळी पडलेल्या आया-बहिणी खरातच्या संमोहनाखाली असाव्यात. पण खरातवर इतकी वर्षे तो लोकांना गंडवत असतांना, ब्लॅकमेल करत असताना कुणीही गंभीर तक्रारीसाठी तपास यंत्रणांकडे जाऊ नये हे आश्चर्य आहे. त्याच्या शिपायाच्या फुटण्याचे त्याचे बिंग फुटले असे ऐकिवात आहे. हे खरे असेल तर... इतकी वर्षे खरातचे धोकादायक भांड साम्राज्य बिनबोभाट सुरू होते असे मानायला जागा आहे.! आणि कथित राजसत्तेचा आशीर्वाद जर डोक्यावर असेल तर त्याला रोखणारे कोण होते. अर्थात त्याला रोखण्यासाठी राज्याचे विद्यमान गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस यंत्रणेसह पुढे आले हे महाराष्ट्राचे सौभाग्य म्हणायचे.!
कोणे एकेकाळी अनेक मोठी वृत्तपत्रे आणि त्यांचे धाडसी शोधपत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे बुरखे फाडत असत. पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आता पंचतारांकित मीडिया झाला आहे. आता तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बातम्या बनतात. अर्थात याला असंख्य उत्तम सन्माननीय अपवाद. असो.. देश.. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांत तीनशे साठ अंशाने बदलला आहे. त्याला माध्यमे कशी अपवाद असू शकतात. आजच सहज फेसबुक स्क्रोल करत असताना एका भिकारी सदृश्य बिचाऱ्या वयोवृद्ध बाबांच्या पुनर्वसनाचा व्हिडीओ पाहिला. त्या सर्वस्व गमावलेल्या बाबांची हालत पाहून सद्गदित झालो.. ते एकेकाळी मुंबईतील मोठ्या प्रमुख वृत्तपत्रामध्ये पत्रकार होते हे कळल्याने त्यांची आत्ताची अवस्था पाहून धक्का बसला. सॉरी विषयांतर झाले. असो...
खरात काय.. त्यांच्यासारखे असंख्य भोंदूबाबा महाराज काय, त्याला शरण जाणारे व्हीआयपी काय. मुळात झाडाचे मूळ म्हणजे राज्याची बहुसंख्य जनताच बोगस झाली आहे. मग त्या जनतेच्या झाडाच्या फांद्या सोनेरी फळे कुठून देणार.!!