Ashok Kharat case : जिजाऊ - सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात आजची स्त्री इतकी असुरक्षित का?

"महिलांना "रोल मॉडेल" म्हणून बघता यावीत अश्या किती महिला महाराष्ट्र राज्यात आहेत?" महाराष्ट्रचे राजकारण आणि अशोक खरात प्रकरणासंदर्भात डॉ. वृषाली राऊत यांचा लेख

Update: 2026-03-25 04:53 GMT

International Women’s Day 2026 मार्च महिन्यात जागतिक महिला दिन नुकताच साजरा झाला आहे व दुर्दैवाने याच महिन्यात Ashok Kharat case अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र राज्यातील मराठी स्त्रियांची दयनीय स्थिती अधोरेखित केली. खरात प्रकरणात अशोक खरात याने शेकडो महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण केलेच पण त्या संबधित फोटो, व्हिडिओ व्हायरल करणार्‍या व ते बघणार्‍या पुरुषांनी त्या सर्व पीडित महिलांचे एक प्रकारे शोषणच केले आहे. बरं एवढे मोठे प्रकरण बाहेर आल्यावर महिला संघटना यांनी रस्त्यावर उतरणे अपेक्षित होते परंतु या पुरेशी घटनेची चर्चा देखील होताना दिसत नाही. एक स्त्री म्हणून दुसर्‍या स्त्री शी बोलताना ही घटना येऊन women safety Maharashtra स्त्रियांच्या सुरक्षितेबद्दल चिंता व्यक्त होणे अपेक्षित आहे पण माझ्या संपर्कातील एकाही स्त्रीने हा विषय स्वत:हून काढला नाही. एका स्त्रीने घडविलेल्या महाराष्ट्रात असे व्हावे हे सर्वात दुर्दैवी आहे. आपण समाज म्हणून कुठे आलो आहोत याचे भान आपल्याला उरले नाही आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र घडविणार्‍या जिजाबाई, स्त्री शिक्षणाची सुरवात करणार्‍या सावित्रीबाई फुले, परकीय आक्रमणाच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रात मुक्ताबाई, जनाबाई यासारख्या संत कवियत्री, बाल विवाह नाकारून भारतात पहिला घटस्फोट घेणार्‍या डॉ. रखमा राऊत, मानववंशशास्त्र यावर मोलाचे काम करणार्‍या इरावती कर्वे तसेच भारतीय सिनेमा संगीतावर अधिराज्य गाजविणार्‍या गानकोकिळा लता मंगेशकर, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली अभिनेत्री स्मिता पाटील या आणि अश्या अनेक मराठी स्त्रियांनी पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्र घडविण्यात अनमोल वाटा उचलला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या धडाडी व कणखर स्त्रिया होऊन गेल्या मग स्वतंत्र भारतात महाराष्टात राज्याची एकही महिला मुख्यमंत्री का झाली नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महिला मुख्यमंत्री सोडा, सर्व क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर स्त्रिया किती व ज्या आहेत त्यांच्याकडे खरच निर्णय घेण्याची पावर आहे का? महिलांना "रोल मॉडेल" म्हणून बघता यावीत अश्या किती महिला महाराष्ट्र राज्यात आहेत? बहुसंख्येने भरजरी साड्या, मेकअप, दागिने, ठसठशीत मंगळसुत्र आणि तोंडावर खोट हसू घेऊन वावरणाऱ्या महिला सगळीकडे दिसतात जे पुरुषांच्या सोयीचे "महिला मॉडेल" आहे. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे नशा करून, तोकडे कपडे घालून, रील बनविणारी, पुरुषांच्या पैशावर मजा करणार्‍या महिलांची एक कॅटेगरी आहे, ही देखील पुरुषांच्या सोयीची आहे.

शिकलेली, स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणारी, भावनिक रित्या साक्षर असणारी, कायद्याचे माफक ज्ञान असणारी, आर्थिक स्वातंत्र उपभोगणारी, नवीन क्षमता विकसित करणारी, अशी समाधानी व प्रसन्न स्त्री असेल तर मग पुरुषी अहंकाराचे काय होणार ? पुरुषी अहंकार कुरवाळण्यासाठी पूर्वी सती, केशवपन, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारणे, आर्थिक गुलामी अश्या प्रथा होत्या ज्याचे आधुनिक रूप पुरुषांनी सिनेमा, नाटक, संगीत, साहित्य व आता पोर्न, सोशल मीडिया यामधून उभारलेल्या स्त्री प्रतिमा आहेत.

आपल्या आजूबाजूला बघितलं तर स्त्रियांची परिस्थिती दयनीय आहे. Diversity and inclusion च्या नावाखाली शोभेची बाहुली म्हणून बहुसंख्य स्त्रियांना पद देण्यात आली आहेत. ज्या स्त्रियांना ही पद मिळाली त्या देखील कळसूत्री बाहुल्या आहेत. मराठी सिरियल्स तर कहर आहेत. बहुसंख्य सिरियल्स मधील स्त्री पात्र ही मानसिक दृष्ट्या अस्थिर आहेत. याच गोष्टी बघून महिला प्रेक्षकवर्ग काय शिकत असेल? सोशल मीडिया वरील स्त्री इन्फ्लुएंसर्स हा वादाचा विषय आहे. जशी नग्नता ही सामान्य बाब झाली आहे तसेच बाबा बुवांची भक्ती ही देखील चिंताजनक आहे. मानसिक आरोग्याचे प्रश्न स्त्रियांमध्ये वेगळ्या पद्धतीने बाहेर येत आहेत. सेल्फी वेड, रील्सचे व्यसन, ते अगदी ऑनलाइन शरीर विक्रीपर्यंत हा प्रकार आला आहे. मेकअपचे वाढलेले फाजील महत्त्व, स्त्री सौंदर्याचे अनैसर्गिक निकष, ही यादी वाढतच आहे. अशोक खरात व त्याच्यासारखे अनेक भोंदू याच पुरुषसत्ताक मानसिकेतचा वापर करून स्त्रियांचे सर्व प्रकारचे शोषण करतात. अर्थात अशोक खरात च्या बायकोला व या प्रकारात खरात ला मदत करणार्‍या स्त्रियांना हा पुरुष नालायक आहे, इतर स्त्रियांचे शोषण करतो हे माहीत असूनही त्यांनी त्याला आधीच उघडकीस का आणले नाही? कारण या प्रकारातून मिळणारा पैसा, सुखसोयी व पावर ही या बायकांना देखील हवी होती. अभ्यास करून, मेहनत करून रोज काम करण्यापेक्षा चटकन व काहीही श्रम न करता श्रीमंत होणे गैर नाही या मतांच्या या स्त्रिया आहेत. या खरातकडे येणार्‍या मध्यमवर्गीय व श्रीमंत स्त्रिया देखील मानसिक दृष्ट्या कमकुवत असतील अन्यथा त्या या प्रकरला बळी पडल्या नसत्या. खरात प्रकरणातील सर्व पीडित स्त्रियांना मानसिक आघात झाला असून याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतील, अर्थात मानसिक आरोग्याची योग्य उपचार पद्धती त्यांना मदत करू शकते.

देशातील व महाराष्ट्र राज्यातील वातावरण निराशाजनक आहे. कोविडनंतर परिस्थिती बिकट झाली आहे. अश्या वेळी आपल्याला हव्या त्या गोष्टी चटकन मिळविण्यासाठी लोकांनी खरात कडे बुद्धी गहाण टाकली. हा माणूस आपल्याला फसवीत आहे, आपल्या घरातील स्त्रियांचे शोषण करत आहे हे पुरुषांनी ओळखले नसेल की फायदा होतोय, जो काही त्रास आहे तो स्त्रीलाच सहन करायचा आहे म्हणून चूप बसायचे की खरात "देवमाणूस" आहे, देवाचा कोप होईल म्हणून सर्व सहन करायचे ? खरात प्रकरणात गुंतलेले सर्व स्त्री पुरुष मानसिक दृष्ट्या गोंधळलेले आहेत असेच दिसते.

डॉक्टरने चुकीचे उपचार केले म्हणून त्याला मारहाण करणारे शूरवीर, खरात सारख्या भामंट्या समोर का नांगी टाकत असतील? अंधश्रद्धा, अनैसर्गिक कृती, अनैतिकता, विकृती या सर्व गोष्टी महाराष्ट्रात फोफावल्या कारण पुरोगामी तत्व व वैज्ञानिक विचार हे लोकांना पटवून देण्यात इथला पुरोगामी वर्ग कमी पडला असेच खेदाने म्हणावे लागेल. बुद्धीचा अहंकार बाळगणारी ही महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ ही मोजकी नाव, कालानुरूप बदल न करणे, मर्यादित वर्तुळात वावरणे, नवीन लोकांना सामील न करणे, या कारणांनी विशिष्टवर्गापर्यंत मर्यादित राहिली. हेच स्त्रीवादी चळवळीचे देखील झाले आहे.

सर्वसामान्य स्त्रीला साधारण आनंदी आयुष्य जगणे हा मूलभूत हक्क आहे. यासाठी कायदा कडक हवाच पण सोबतीला समाजाने देखील आपल्या मूलभूत विचारसरणीत बदल केला पाहिजे. स्त्री ही दायित्व नसून देणगी आहे व ती सुरक्षित व सुखी राहिली तर आपला समाज आनंदी होईल.

Similar News