राजकारण, धर्म आणि विकृती : खरात प्रकरणात कोण कोण गुंतले?
अशोक खरातच्या ‘उत्थान’ आणि ‘पतन’ची कहाणी सांगताहेत लेखक समीर गायकवाड
सुरूवातीला फेस रीडिंग करणारे अशोक खरात फेमस नव्हते. त्यांना पैशाची हवा लागली नव्हती. साध्या ॲाफिसवजा खोलीत बसून ते हा उद्योग करत. त्यांच्या टेबलावर सुरुवातीच्या काळात एक ताट ठेवलेले असे, ते ज्यांचा चेहरा पाहून भविष्य सांगत त्या व्यक्तीला ते, अमुक एक रक्कम द्या असा हट्ट कधी करत नसत. इच्छाशक्तीनुसार लोक त्या ताटात पैसे टाकत. पुढे जाऊन ताटाऐवजी तबक आले. नंतर तबक जाऊन एक असिस्टंट आला जो चेहरा पाहण्याची फी घेतल्यानंतरच साहेबांसमोर पाठवू लागला. नंतर ही रक्कम वाढतच गेली. नंतर त्यांने अंकशास्त्र आणि ज्योतिष यावर लक्ष केंद्रित केले.
अशोक खरात सैनिकी कॅप्टन कधीच नव्हते. नावेतून प्रवास करत असताना दिव्य ज्ञान प्राप्त झाले म्हणून आपण कॅप्टन आहोत असा विचित्र युक्तिवाद ते करत असत. अहिल्यानगरमध्ये जेमतेम काही वर्षांपूर्वी हनी ट्रॅपच्या काही केसेस समोर आल्या होत्या. एका बाईने पदर पाडून भल्याभल्यांना ‘प्रवरेचे‘ पाणी पाजले होते. पुढे तिचा मर्डर करण्यात आला. एका प्रथितयश दैनिकाच्या संपादकाचे नाव पुढे आले. खरेतर तेव्हा खरातांचे नाव समोर यायला पाहिजे होते पण तसे घडले नाही कारण खरातांची कमळा उफाड्याची आहे. खरातचे कनेक्शन संभाजीनगर, परभणी, ठाणे, बीड, नागपूरशी खास जुळलेले आहे.
अहिल्यानगरचे एक कोंबडी खुडूक कृष्ण राजकारणी खरातचे पहिल्या खाऱ्या धारेचे भक्त, आता त्यांची पाचावर धारण बसली असेल. खरातचा अस्त तेव्हा सुरू झाला जेव्हा त्याने ट्रस्ट मंदिर यांचा वापर साधनासारखा केला. एका विशिष्ट मंदिरात खाजगी व्यथा वेदनांची गाऱ्हाणी सांगणाऱ्या महिला त्याच्या रडारवर आल्या. नाशिक पोलिसांनी नुकतीच या मंदिराच्या पुजाऱ्यांची गोपनीय चौकशी केली. ही चौकशी गुप्त का ठेवली गेली, यातून काय माहिती समोर आली, स्टेशन डायरीत याची नोंद झाली का हे प्रश्न अनुत्तरित आहेत. खरात प्रकरण हिमनगासारखे आहे. या हिमनगाचे टोकही नीट दिसत नाही. हिमनगाच्या टोकाखाली समुद्राच्या पाण्यात पाहिले तर डोळे विस्फारून जावेत असं विशालकाय प्रलयंकारी रूप असेल.
खरे तर या घडीला निर्भीड प्रामाणिक आणि लढवय्या पत्रकारितेची समाजाला नितांत गरज आहे मात्र आता तशी नावं अपवादानेही दिसत नाहीत. एक रंगेल मंत्री आपला रंग उजळावा अन् कंड शाबूत राहावा म्हणून खराताचे तीर्थ घेत. तिथून चाकणकर कनेक्ट झाल्या. आता त्यांची अवस्था, आयोगाचे अध्यक्षपद गेले, प्रदेशाध्यक्ष पदही गेले पण हाती खराटणे आले अशी दारूण झालीय. ज्यांनी ज्यांनी खरातला बळ दिले त्या सर्वांची वरात निघाली पाहिजे पण तसे घडणार नाही. फार तर काही आठवडे खरात चर्चेत राहतील. तोपर्यंत सर्वांचं चांगभलं.
(साभार - सदर पोस्ट समीर गायकवाड यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)
AshokKharat, GodmanScam, FakeBabaExposed, MaharashtraNews, InvestigativeJournalism, SpiritualFraud, BreakingNewsIndia, PoliticalLinks, CrimeStory, TruthExposed