गृहमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
महाराष्ट्रातील गृहविभागावरून सध्या राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर ट्विट करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसले आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सपकाळ पुढे म्हणाले की, “जर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल, तर पत्रकार रवींद्र आंबेकर यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी रात्री अपरात्री हुडी घालून पोलीस स्टेशनचे दौरे करायला हवेत.त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच,” ” असा त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
याचबरोबर सपकाळ यांनी आणखी गंभीर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “जर या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच टक्केवारी ठरलेली असेल, तर भ्रष्टाचारमुक्त राज्याची अपेक्षा कोणाकडून करायची?”
दरम्यान, यावर रवींद्र आंबेकर यांनी ट्विट केलं होतं. त्यांनी राज्यात “गुंजाळ, खरात” अशी प्रकरणांची मालिका सुरू असल्याचा दावा केला. “गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची ताकद विरोधकांना लक्ष्य करण्यात खर्च होत असून, त्याचा फायदा घेत पोलीस यंत्रणेत हफ्तेबाजी वाढली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
आंबेकर यांनी म्हटले की, “सध्या DCP आणि अतिरिक्त पोलीस अधिकारी ठाण्यांचे दौरे करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून ठराविक रक्कम घेत असल्याच्या चर्चा आहेत. मुख्य पोलीसांपेक्षा ‘झीरो पोलीस’ अधिक असून, सत्तेशी निष्ठा दाखवत खाली मात्र मनमानी कारभार सुरू आहे.”
तसेच फडणवीस यांनी गृहखात्याचा पुनर्विचार करावा किंवा गुपचूप पोलीस स्टेशनचे दौरे करावेत, अशी सूचनाही केली.
या सर्व आरोपांमुळे राज्यातील गृहविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.