United Nations slavery resolution : गुलामगिरी जिवंत आहे ? माणसाच्या स्वातंत्र्याची लढाई अजून संपलेली नाही !

Update: 2026-03-29 06:30 GMT

United Nations slavery resolution अलीकडे New York येथील United Nations च्या बैठकीत आधुनिक स्वरूपातील गुलामगिरी व मानव तस्करीविरुद्ध कठोर ठराव मंजूर करण्यात आला. यावरून स्पष्ट होते की, काळ बदलला तरी माणसाच्या स्वातंत्र्याची लढाई अजून संपलेली नाही; मात्र आज जागतिक स्तरावर त्या विरोधात एकत्र येण्याची जाणीव अधिक प्रगल्भ झाली आहे. मानवाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि अमानवी प्रथांपैकी एक म्हणजे गुलामगिरी. एका माणसाने दुसऱ्या माणसावर मालकी हक्क गाजवणे, त्याच्या श्रमांचे शोषण करणे आणि त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे. हीच गुलामगिरीची मूलभूत व्याख्या आहे. ही प्रथा साधारणतः ४-५ हजार वर्षांपूर्वी प्राचीन संस्कृतींमध्ये Egypt, Greece आणि Rome येथे सुरू झाल्याचे दिसते.

सॉक्रेटिस यांच्या मृत्यूनंतर प्लेटो सत्य, न्याय आणि आदर्श राज्यव्यवस्थेचा शोध घेत विविध प्रदेशांत फिरत होते. या प्रवासात ते सिसिलीतील Syracuse येथे गेले. तेथे Dionysius I of Syracuse या राजाच्या दरबारात त्यांनी आपले विचार मांडले. प्लेटोचे विचार केवळ तात्त्विक नव्हते, तर ते सत्तेला प्रश्न विचारणारे होते. राज्य हे न्यायावर आधारित असावे, सत्ता ही विवेकबुद्धीने चालवली जावी, अशी त्यांची भूमिका होती. परंतु सत्ताधाऱ्यांना सत्य सहन होत नाही, हा इतिहासाचा नियमच आहे. प्लेटोचे विचार राजाला रुचले नाहीत. परिणामी त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना Aegina येथे गुलाम म्हणून विकण्यात आले. एक महान तत्त्वज्ञ ज्याच्या विचारांनी पुढे जगाला दिशा दिली त्याला त्या काळातील सत्तेने गुलाम बनवले, ही गोष्ट केवळ व्यक्तीची नव्हे तर विचारांची विटंबना होती. पण इथेच मानवतेचा दुसरा पैलूही दिसतो. प्लेटो यांचे अनुयायी Anniceris यांनी त्यांना ओळखले आणि पैसे देऊन त्यांची सुटका केली. ही घटना केवळ गुरू-शिष्य नात्याची नव्हे, तर विचारांच्या बांधिलकीची साक्ष देते. सत्य आणि ज्ञानासाठी लढणाऱ्यांना साथ देणारे लोक समाजात असतात, याची ही जिवंत उदाहरण आहे.युद्धकैदी, कर्जबाजारी लोक किंवा दुर्बल घटक यांना गुलाम बनवले जात असे.

काळाच्या ओघात गुलामगिरीचे स्वरूप अधिक क्रूर झाले. विशेषतः १६व्या ते १९व्या शतकात अटलांटिक गुलाम व्यापार ही मानवी इतिहासातील काळी छाया ठरली. लाखो आफ्रिकन लोकांना पकडून अमेरिकन खंडात विकले गेले. या अमानुष प्रथेच्या विरोधात जगभर चळवळी उभ्या राहिल्या. अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेत गुलामगिरी संपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, तर युनो ने आधुनिक काळात मानवाधिकारांच्या माध्यमातून गुलामगिरीविरुद्ध ठाम भूमिका घेतली. तरीही प्रश्न उरतो. गुलामगिरी आज पूर्णपणे संपली आहे का? उत्तर दुर्दैवाने “नाही” असेच आहे. आजही मानव तस्करी, बालमजुरी, बळजबरीची मजुरी या स्वरूपात गुलामगिरी अनेक देशांत अस्तित्वात आहे. विशेषतः काही गरीब आणि संघर्षग्रस्त देशांमध्ये ही समस्या तीव्र आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेच्या छायेत ही गुलामगिरी अदृश्य स्वरूपात टिकून आहे.

भारतीय संदर्भात पाहिले तर, चातुर्वर्ण्य व्यवस्था ही थेट गुलामगिरी नव्हती, परंतु तिच्या कठोर सामाजिक रचनेमुळे दलित समाजावर अन्याय, शोषण आणि मानहानी झाली बी आर आंबेडकर यांनी यालाच “सामाजिक गुलामगिरी” असे म्हटले आहे. दलितांना शिक्षण, संपत्ती, सन्मान यापासून दूर ठेवण्यात आले, त्यामुळे त्यांच्या जीवनावर गुलामासारखेच बंधन आले. ब्रिटिश काळात भारतात पाश्चात्य अर्थाने गुलामगिरी मोठ्या प्रमाणात नव्हती, पण इंडेंचर्ड लेबर (करारबद्ध मजुरी) या नावाखाली भारतीयांना परदेशात अत्यंत वाईट परिस्थितीत काम करावे लागत असे. हेही एका प्रकारचे आर्थिक गुलामगिरीचे रूपच होते. आजच्या युगात आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाहीच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, पण गुलामगिरीचे सावट अजून पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

शेवटी, गुलामगिरीचा इतिहास आपल्याला एकच संदेश देतो. माणसाच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही. जर आपण खऱ्या अर्थाने प्रगत समाज घडवायचा असेल, तर प्रत्येक प्रकारच्या शोषणाविरुद्ध सतत लढा देणे हीच आपल्या काळाची खरी जबाबदारी आहे.

Similar News