कृषीमंत्र्यांच्या घराबाहेर शेतकऱ्यांची काळी दिवाळी, जोरदार घोषणाबाजी

Update: 2021-11-05 09:24 GMT

नाशिक :  शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली त्यामुळे मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले. राज्यात सर्वत्र अतिवृष्टीने थैमान घातलेले असतांना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ' कडू ' होत असतांना मंत्र्यांची दिवाळी ' गोड ' होऊ द्यायची नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान, कृषिमंत्री भुसे यांनी स्टंटबाजी आंदोलन न करता चर्चा करून आपले प्रश्न मार्गी लावू असे हात जोडून विनंती केली. दरम्यान, ' स्टंटबाजी ' या शब्दावर आक्षेप घेत आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या विवीध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. 2 तासांच्या चर्चेनंतर आंदोलकांना आंदोलन मागे घेतले. सरकारने पीक विम्याचे पैसे दिले नाही, दिवाळी पूर्वी अतिवृष्टीचे पैसे जमा होतील असे सांगितले. मात्र तसे झाले नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे, असे म्हमत हे आंदोलन करण्यात आले.

Tags:    

Similar News