खांदेशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पडलेल्या पाऊस आणि गारपीट मुळे मोठं नुकसान झालं आहे.
खान्देशात काल अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे हाताशी आलेल्या रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेरसह नंदुरबार तालुक्यातील शनीमांडळ, रजाळे, इंद्रिहट्टी आणि जळगावच्या चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, जामनेर परिसरात गारपीट झाली. साक्री तालुक्यातील शेणपूर, मलांजन आणि पिंपळनेर परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास तुफान गारपीट झाली. त्यामुळे भाजीपाल्यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. धुळ्यातील कुसुंबा परिसरातही वादळाचा मोठा तडाखा बसला.
नंदुरबारमधील शनीमांडळ, रजाळे परिसरात सुमारे २० मिनिटे गारपीट झाली. रजाळे येथील फुमा माता यात्रोत्सवासाठी आलेल्या व्यावसायिकांची यामुळे मोठी धांदल उडाली. उन्हाळी कांदा, भुईमूग व टरबूजाचे मोठे नुकसान झाले.
जळगाव शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. चाळीसगाव, पारोळा, जामनेर आणि पाचोरा तालुक्यात सायंकाळी ५ वाजेनंतर. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. पिंपळगाव हरेश्वर तसच सोयगाव परिसरात वादळाने पिके आडवी केली. पारोळ्यात अनेक शेतकऱ्यांच्या कृषी सोलर पॅनेलला फटका बसला आहे.