Savitribai Phule Jayanti : कपाळाला चिरी लावून सावित्रीबाईंचे स्मरण करा - सोनाली कुलकर्णी
'सावित्री उत्सव' संकल्पनेची सुरुवात कशी झाली? सावित्रीबाईंना स्मरण करताना कुणाच्या नावाची कपाळावर चिरी लावायची ? जाणून घ्या ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याकडून
Savitribai Phule Jayanti सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सावित्री उत्सव साजरा करण्याची संकल्पना माझे सहकारी शरद कदम यांनी मांडली होती. दहा वर्षांपूर्वी असं डोक्यात होतं की, घराच्या दारासमोर पणती लावून सावित्रीमाईंना स्मरण करूयात. हे सगळं बोलता-बोलता असं ठरलं की कपाळाला चिरी लावणं हे वेगळ्या पद्धतीने सावित्रीबाईंचे स्मरण करणं आहे. कारण आपण सर्वजण अनेक वेगवेगळे ग्लोबल सण साजरे करत असतो परंतु अनेकदा आपल्या देशातल्या आपल्या भूमीतल्या महत्त्वांच्या व्यक्तिमत्वाकडे आपलं दुर्लक्ष होतं. ज्या सावित्रीबाईंमुळे संपूर्ण Education for Women स्त्री वर्गाला शिक्षणाचा हक्क मिळाला तिची आठवण चिरीरूपानं कपाळावर मिरवणं यासारखं दुसरे स्मरणं नाही असं मला वाटलं. सावित्रीबाईंसाठी मी एक कविताही लिहिली आहे. ती अशी की,
तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..
तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..
तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..
तुझं लग्नं झालेलं असो / नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला आत्मसन्मान शिकवणारी..
सावित्री उत्सव तुम्ही आणि तुमच्या अवती-भवती असणाऱ्यांना कपाळावर चिरी लावून साजरा करायला सांगा.
सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री