War and humanity : युद्ध तुम्हाला काय देतं?
अमेरिकासारखा बलाढ्य देश युद्धाची तयारी करतो, मात्र त्यांच्या भूमीवर हे युद्ध लढलं जात नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी काही वित्तहानी होणार आहे ती आशिया खंडाची होणार आहे. भांडवली व्यवस्था जगाचा नाश करू बघतेय. जग जिंकण्यापेक्षा जग वाचवणं अधिक महत्त्वाचं... वाचा डॉ. सागर भालेराव यांचा लेख
Global conflict impact on Indian markets युद्ध हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर रणगाडे, तोफा, बॉम्बहल्ले आणि रणांगणावर लढणारे सैनिक उभे राहतात. पण युद्धाचं खरं रूप फक्त रणांगणापुरतं मर्यादित नसतं. युद्ध म्हणजे समाजाच्या प्रत्येक थरावर पडणारी सावली आहे. अर्थव्यवस्था, शिक्षण, व्यापार, सामान्य लोकांचं आयुष्य या सगळ्यावर त्याचे परिणाम उमटतात. म्हणूनच आज पुन्हा एकदा आपण स्वतःलाच प्रश्न विचारण्याची गरज आहे - What does war give humanity युद्ध तुम्हाला नेमकं काय देतं?
आज जग युद्धासाठी जणू आसुसलं आहे. रक्ताची चटक लागलेले म्हातारे जागतिक नेते नवतरुणांना देशोधडीला लावत आहेत. ज्या तरुणाईला हे जग अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रेरित करायला हवं, त्याच तरुणाईला आपण रणांगणावर पाठवत आहोत. त्यांच्या हातात पुस्तकं, संगणक किंवा वैज्ञानिक उपकरणं असायला हवीत; पण त्यांच्या हातात आपण बंदुका देत आहोत. युद्धाचा निर्णय घेणाऱ्या लोकांनी स्वतः कधी रणांगण पाहिलेलं नसतं. ते सुरक्षित इमारतींमध्ये बसून युद्धाची रणनीती आखतात; पण गोळ्या मात्र सामान्य सैनिकांना झेलाव्या लागतात. त्यामुळे युद्धात मरतो तो सैनिकच नाही, तर त्याच्या घरच्यांच्या स्वप्नांचाही अंत होत असतो.
आखाती देशात युद्ध सुरू असलं तरी त्याची झळ आपल्यालाही बसू लागली आहे. मार्केट डबघाईला आलं आहे. पेट्रोलचा तुटवडा आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या मेस बंद पडल्या आहेत. सामान्य ऑटो ड्रायव्हर घायकुतीला आले आहेत. युद्धाचं हेच खरं रूप आहे, ते थेट आपल्या घरात घुसत नाही, पण आपल्या रोजच्या आयुष्याला हलवून टाकतं. माझा एक मित्र मर्चंट नेव्हीमध्ये आहे. समुद्रात त्यांचं जहाज अडकून पडलं आहे. कोण कधी मदतीला येईल सांगता येत नाही. गेली पाच दिवस त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सगळीच अनिश्चितता. समुद्रावर असलेले ते लोक एका क्षणात जागतिक राजकारणाच्या संघर्षात अडकतात. ते युद्ध लढत नाहीत, पण युद्ध त्यांना कैद करून ठेवतं. त्यांच्या कुटुंबांची अवस्था कल्पना करण्यासारखीही नाही. सोशल मीडियावर युद्धाची भाषा करणारे, युद्धाचे समर्थन करणारे या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत का?
दुबईत काम करणारा दुसरा एक मित्र सांगत होता, दुबईहून भारतात येण्यासाठी त्याने दोन जणांचे २.५ लाख रुपये मोजले. एरवी ५० हजारांमध्ये त्याचे येणे होत असते. विमान कंपन्या युद्धकाळात पैसे कमवत आहेत. संकटाच्या काळात काही जणांची तिजोरी भरते, तर काही लोकांच्या आयुष्यभराची कमाई संपते. म्हणूनच अनेक विचारवंत म्हणतात की युद्ध हे केवळ राजकीय संघर्ष नसतं; ते आर्थिक व्यवस्थेचंही एक साधन बनतं. शस्त्रनिर्मिती उद्योग, तेल व्यापार, काही मोठ्या कंपन्या युद्धातून नफा कमावतात. त्यामुळे कधी कधी युद्ध थांबवण्यापेक्षा ते चालू ठेवण्यात काही शक्तींना फायदा असतो. अमेरिकेसारखा बलाढ्य देश युद्धाची तयारी करतो, मात्र त्यांच्या भूमीवर हे युद्ध लढलं जात नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जी काही वित्तहानी होणार आहे ती आशिया खंडाची होणार आहे. भांडवली व्यवस्था जगाचा नाश करू बघतेय असं अनेकांना वाटण्याचं कारण हेच आहे. कारण जेव्हा निव्वळ नफा कमवणे हा सर्वात मोठा उद्देश बनतो, तेव्हा मानवी जीवनाचं मूल्य कमी होत असतं. अमेरिकेच्या हल्ल्यात शेकडो शाळकरी मुली मारल्या गेल्या, आपण साधा निषेध नोंदवला नाही. शांतीचा पुरस्कर्ता असलेला आपला देश, बुद्ध-गांधींचा आदर्श ठेवणारा आपला देश कसा काय शांत बसू शकतो? आपल्या परराष्ट्रीय धोरणावर मला इथे भाष्य करायचं नाहीये, कारण तो माझ्या अभ्यासाचा विषय नाही. मात्र आपण कधीच युद्धाच्या बाजूने नव्हतो हे साधं तत्व आजच्या राज्यकर्त्यांना सांगणं गरजेचे आहे.
भारत-पाक युद्धाच्या तणावाच्या काळात आपल्यालाही युद्धज्वर चढला होता. पण आपण वेळीच थांबलो, संवाद आणि संयमाचा मार्ग निवडला म्हणून परिस्थिती स्थिर राहिली. युद्ध झालं असतं तर त्याची किंमत लाखो सामान्य लोकांना चुकवावी लागली असती. आज इस्रायल-इराण-अमेरिका संघर्षाबद्दलही अनेकांना प्रचंड इंटरेस्ट आहे. काही लोक खोमेनी यांच्या हत्येनंतर पेढे वाटत होते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर आनंद साजरा करणं हे युद्धाच्या मानसिकतेचं अतिशय रोगी लक्षण आहे. पण आपण एकदा विचार केला पाहिजे.
काल खामेनी होते, उद्या आपला नंबर लागला तर?
युद्धाच्या खेळात कायमचं विजेतं कोणीच नसतं. शेवटी पराभूत होते ती माणुसकीच.
लोककवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी आजही तितक्याच अर्थपूर्ण वाटतात.
रणगाड्यांच्या रांगा आणि गडगडणाऱ्या तोफा
सूचित आहे खचित करती उभ्या जगाला धोका
असला फौजफाटा, असला शस्त्रसाठा
निर्दाळील जग जाळील असले इंधन माणसाला...
ही कविता केवळ साहित्यिक रचना नाही, तर एक सामाजिक इशारा देखील आहे. जग जितकं अधिक शस्त्रसज्ज होतं, तितकं ते अधिक असुरक्षित बनतं. कारण त्या शस्त्रांचा हल्ला सामान्य माणसावरच होणार असतो. आजच्या काळात तर परिस्थिती अधिक धोकादायक आहे. अण्वस्त्रं, ड्रोन, सायबर युद्ध या सगळ्यामुळे युद्धाचं स्वरूप अधिक भयानक झालं आहे. एक मोठा संघर्ष संपूर्ण मानवजातीसाठी विनाशकारी ठरू शकतो. म्हणूनच सर्वात मोठा प्रश्न आहे - आपण खरंच कोणासाठी आणि कशासाठी लढतोय? धर्म, सत्ता किंवा आर्थिक स्वार्थ यासाठी जर लाखो लोकांचा जीव जात असेल, तर त्या विजयाचा अर्थ काय? कदाचित आज आपल्या काळाची सर्वात मोठी जबाबदारी हीच आहे की आपण युद्धाचं रोमॅटीकरण थांबवलं पाहिजे. युद्ध म्हणजे चित्रपट नाही, तर एक मानवी शोकांतिका आहे. जगाला आज रणगाड्यांची नाही, तर संवादाची गरज आहे. तोफांच्या आवाजापेक्षा चर्चेचा, सुसंवादाचा आवाज मोठा असायला हवा. राष्ट्रांच्या सीमांसोबत माणुसकीची सीमा आपण सगळ्यांनी जपायला हवी. कारण शेवटी युद्ध कधीच काही देत नाही. ते फक्त घेऊन जातं- जीव, स्वप्नं, भविष्य आणि शांतता. म्हणून द्वेषाचा ज्वर वाढवण्यापेक्षा शांततेचा नंदादीप पेटवत ठेवूया. कारण जग जिंकण्यापेक्षा जग वाचवणं अधिक महत्त्वाचं आहे.
War vs peace debate, Human tragedy of war, War and capitalism, War profiteering companies, Dialogue vs war solutions