Savitribai Phule death anniversary : ८ मार्चचा उत्सव आणि १० मार्चचा विसर : सावित्रीबाईंच्या प्रेरणेशी तुटलेले नाते?

महिला दिन साजरा होतो, पण सावित्रीबाईंचे स्मरण का विसरतो समाज? ८ मार्चचे १० मार्चशी नाते का नसते....? यासंदर्भात लेखक हेरंब कुलकर्णी यांचा लेख

Update: 2026-03-10 03:33 GMT

Savitribai Phule death anniversary March 10 परवा ८ मार्च हा अत्यंत उत्साहाने साजरा झाला. दिवसेंदिवस हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतोय ही आनंदाची गोष्ट. पण ८ मार्च नंतर अगदी एकच दिवसाने सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन येतो. पण या दिवशी महिला दिन उत्साहाने साजरा करणारे सावित्री स्मरण फारसे करताना दिसत नाहीत. ३ जानेवारीला तरी हा उत्साह असेल का ? ज्यांनी केले त्याचे स्वागतच. पण दुर्देवाने हे प्रमाण कमी आहे. ८ मार्च च्या महिला दिनाचे कार्यक्रमात जो स्त्री आत्मनिर्भर असण्याचा स्वातंत्र्य मिळाल्याचा फील आहे त्यात सावित्रीबाईंचे योगदान महत्वाचे आहे. या देशातील तमाम महिलांसाठी काम केलेल्या महापुरुषांचे योगदान आहे. ते त्याला जोडून घ्यायला हवे.

१० मार्च या दिवसाचे वैशिष्ट्य हे की हा दिवस सावित्रीबाई यांच्या हौतात्म्याचा दिवस आहे... या दिवशी सावित्रीबाई प्लेग च्या साथीत जीवाची बाजी लावून गरिबांना वाचवण्यासाठी फिरताना स्वतः प्लेग चे साथीला बळी पडल्या आहेत. एक लेखक असलेली मान्यता असलेली स्त्री. तिला खरे तर जीव धोक्यात घालून काहीच करण्याची आवश्यकता नव्हती पण तरीही जीवनभर सामाजिक काम करून तिने आत्मबलिदान दिले. त्यामुळे महिला आणि सर्वांसाठी हा प्रेरणा दिवस असायला हवा. पण ८ मार्च ला खूप पोस्ट टाकणारे, सेलिब्रेशन करणारे, स्त्री महत्वाची मानणारे आज शांत असतात. हे का घडते ? हा प्रश्न मला पडतो.

दुर्देवाने स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या महिलांच्या समूहात या चळवळीशी नाते सांगण्याचे प्रमाण कमी आहे किंबहुना आपण आज उभे राहिलो पण आपल्या स्त्री समूहात अजूनही मोठा स्त्री वंचित समूह आहे. त्या समूहाचे प्रश्नासाठी आपण काम करणे आवश्यक आहे याचे भान या नव्याने निर्माण झालेल्या स्त्री मध्यमवर्गात फारसे झिरपले नाही. एकूण मध्यमवर्गापासून आपण स्त्री मध्यमवर्ग वेगळा काढू शकत नाही किंवा पुरुष प्रधान व्यवस्थेत स्त्री वेगळे वागू शकत नाही ही मर्यादा मान्य असली तरीही सुशिक्षित व स्वत:च्या पायावर उभे राहिलेल्या महिलांकडूनच ही अपेक्षा करता येईल हे मान्य करायला हवे.

दुर्देवाने एकूणच ग्राहक बनवण्याच्या काळात हा सुशिक्षित स्त्रीवर्ग मध्यमवर्गीय स्वप्नाचा भाग होतोय. धार्मिक कर्मकांडाचा भाग होतोय. व्रतवैकल्ये हा सुशिक्षित महिलांचा ही जगण्याचा भाग होतोय. सावित्रीच्या शाळेकडे पाठ करून दरवर्षी हजारो महिला अथर्वशीर्ष पठण करून हे वास्तव अधोरेखित करतात. अशावेळी सावित्रीबाई यांच्या विचारांचे वाहक या वर्गाला कसे बनवता येईल यावर चिंतन व्हायला हवे. अशा जाणीवा निर्माण करण्यात आपले शिक्षण आणि कुटुंब संस्था किंवा इतर संस्था कमी पडल्या तरीही वंचित महिलांचे प्रश्न या महिलांना परिचित करून त्या सोडवणुकीत यांना सहभागी करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. स्त्री सुरक्षा बलात्कार यासारख्या विषयावर महिला जागृती निर्माण झाली आहे पण बालविवाह, आदिवासी दलित भटके मुस्लीम यातील महिलांचे प्रश्न, एकल महिलांचे प्रश्न, गरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न हे सारे प्रश्न या सुशिक्षित महिलांच्या विचार विश्वाचा भाग व्हायला हवे.

ज्या महिला विविध चळवळी शी जोडलेल्या आहेत किंवा वाचन करतात त्या नक्कीच याबाबत संवेदनशील आहेत पण ही पार्श्वभूमी नसणाऱ्या मोठ्या संख्येने मध्यमवर्गात आलेल्या व कृती करू शकण्याची शक्यता असलेल्या महिला यांना सावित्रीच्या प्रेरणेशी कसे जोडायचे हेच आव्हान आहे. ८ मार्च आणि १० मार्च यातील अंतर कमी करून हे नाते सघन करण्याचे मार्ग महिलांवर टीका न करता शोधायला हवे.

(साभार- सदर पोस्ट हेरंब कुलकर्णी यांच्या फेसबुक भिंतीवर घेतली आहे.)

Similar News