तिरस्कार, प्रबोधन, आदर, प्रेम, कबुली म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे नाव जर जेवढं पुरोगामी लोकांना आपलंसं आणि प्रेरणादायी वाटतं तसंच प्रखर हिंदुत्व वाद्यांना तितकाच टोकाचा राग देखील येतो. पण काही टोकाचा तिरस्कार करणारेही काही लोक असे आहेत ज्यांचं मन आणि परिवर्तन घ़डून विज्ञानाची कास धरली आहे. त्यावेळी त्या व्यक्तींना काय वाटतं? जाणून घ्या समीर गायकवाड यांच्या पत्रातून......

Update: 2022-10-01 06:30 GMT

नमस्कार Hamid हमीदजी.

तुम्ही माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीय याचा मला अत्यंत आनंद झालाय मात्र त्याहीआधी मला काही सांगायचंय. ते ऐकून/ वाचून तुम्ही निर्णय घ्यावा की मला मित्र यादीत ठेवायचं की नाही!

एक काळ होता जेंव्हा मी डॉक्टर दाभोलकरांविषयी मनात अत्यंत घृणा आणि तिरस्कार बाळगून होतो. कदाचित त्या काळात त्यांच्या समोर जाण्याची एखादी संधी मिळाली असती तर माझ्या हातून एखादं अपकृत्य घडलं असतं.

त्यांच्याविषयी इतकी चीड असायची की त्यांचं नाव जरी कुठे वाचनात ऐकण्यात आलं तरी संताप यायचा. असं वाटायचं की डॉक्टर जाणीवपूर्वक ही मोहीम राबवतायत, त्यांना हिंदूंना बदनाम करायचे आहे, त्यांचे हेतू वाईट आहेत वा ते कुणाचे तरी हस्तक आहेत अशा एक ना अनेक पोकळ कल्पनांनी तेंव्हा मनात ठाण मांडले होते.

तेंव्हा मी अत्यंत कडवट उजव्या विचारांचा निव्वळ सनातनी होतो. सोलापूरमधून बाबरी मस्जिद पाडायला निघालेल्या लोकांच्या टिम मध्ये माझं नाव होतं. उजव्या विचाराच्या विविध संघटनांच्या पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचो.

शहरात घडलेल्या दंगलींचा साक्षीदार आहे मी! आंदोलने, मोर्चे यात भाग घेतला होता. दरम्यान आयुष्यात काही घटना अशा घडल्या की अशांची संगत घटत गेली, ज्या विचारांचा दुस्वास करत होतो त्यांचं वाचन वाढत गेलं. कडवटतेमधला फोलपणा उमगत गेला.

एक प्यादं म्हणून आपला वापर होत असतो याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि मग स्वतंत्रपणे सगळ्याच गोष्टींवर विचार करू लागलो. कट्टरतेने कुठल्याच जातीधर्माचे भले झाले नाही या वास्तवाने खडबडून जागा झालो.

डॉक्टरांची हत्या झाली त्या दिवशी फार वाईट वाटलं. माझ्यासारखाच कुणीएक वाहवत गेलेला हत्यारा असणार या विचाराने हादरून गेलो. काही दिवसांनी पानसरे सरांची हत्त्या झाली आणि त्या खून प्रकरणाचा आरोपी म्हणून समीर गायकवाड नावाच्या इसमाला अटक झाली.

त्यावेळी अक्षरशः भेदरून गेलो होतो, माझ्या विचारांत बदल झाला नसता तर त्या समीर गायकवाडच्या जागी कदाचित मीच असलो असतो या कल्पनेने देखील कासावीस झालो. कुठल्याही धर्मातील कट्टरता आणि कर्मठपणामुळे माणसाचा विवेक लोप पावू लागतो आणि त्याच्यातली मानवता हळूहळू संपुष्टात येऊ लागते या विचारापाशी येऊन ठेपलोय.

आता मागे वळून पाहताना गतकाळातील चुकीच्या विचारधारेची, चुकीच्या गोष्टींना समर्थन दिल्याची टोचणी लागते. हे शल्यच अधिक नेटाने सदविवेक जागृत ठेवतेय हेही खरेच आहे. एके काळी ज्यांचा आपण अनिवार तिरस्कार केला, त्यांच्याविषयी वाईट चिंतलं त्यांच्याबद्दल आता अतिव आदर आणि करुणा दाटून आहे.

माझं हे प्रकटन वाचून तुम्ही मला स्वीकारलंत तर खूप आनंद वाटेल. जेंव्हा कधी तुम्हाला भेटेन तेंव्हा तुमच्या गळ्यात पडून रडेन, कदाचित तेंव्हा माझा आत्मक्लेश काहीसा कमी होईल. तुमच्या स्नेहाच्या प्रतिक्षेत.

- समीर गायकवाड

Tags:    

Similar News