West Bengal Election: बंडखोरांच्या विरोधात ममतांचं नवीन अस्त्र

Update: 2021-01-20 06:19 GMT

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. अलिकडे कोणत्याही राज्यात निवडणूक म्हटलं की भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असते. असं एकंदरित चित्र पाहायला मिळतंय.

पश्चिम बंगालमध्येही (West Bengal Election) हेच चित्र आहे. ऐन विधान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी करत काही नेते भाजपचं कमळ हातात घेत आहेत. आता ही बंडखोरी थांबवण्यासाठी ममता बॅनर्जीने नवीन पर्याय हाती घेतला आहे.

नंदीग्राममधून तृणमूल कॉंग्रेसचे नेते असलेले शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. "नंदीग्राम माझ्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे मला असे वाटते मी इथून निवडणूक लढवली पाहिजे. आमच्या प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी मला यासाठी परवानगी द्यावी."

असं म्हणत बंडखोरांना थेट आव्हान देत अशा प्रकारे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी पक्षाची काय रणनिती असेल. हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. वास्तविक पाहता ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, यावेळी बंडखोरांना रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी थेट बंडखोरांच्या मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता त्या नंदीग्राम मधून निवडणूक लढवत असताना भवानीपूरमधून कोणाला उमेदवारी मिळणार की त्या दोनही मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हे गुलदस्त्यातच आहे.

मात्र, भाजप नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांना केवळ नंदीग्राम मधून निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी हे चॅलेंज स्विकारतात की नाही पाहणं महत्त्वाचं आहे.

Tags:    

Similar News