भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी १० मार्चपासून आझाद मैदानावर बेमुदत गाथा पारायण आंदोलन

Update: 2026-03-07 12:18 GMT

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ध्यान-चिंतनाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचा विध्वंस होत असल्याचा आरोप करत तो तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी १० मार्च २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत गाथा पारायण आंदोलन सुरू होणार आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. देहुवरून निघालेले हे आंदोलक सध्या लोणावळा ठिकाणी पोहोचले आहे.

या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी परभणी येथे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मधुसूदनजी पाटील महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो वारकऱ्यांसह ५ मार्च रोजी देहू येथून दिंडी प्रस्थान झाली असून १० मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर गाथा पारायण आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनासाठी भाविकांनी आर्थिक मदत आणि स्वतः गाथा घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर डोंगरांवर संत तुकाराम महाराज ध्यानासाठी बसत असल्याचा उल्लेख केला जातो. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आमदार सचिन अहिर यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले असल्याचे सांगत, MIDCच्या नावाखाली काही खासगी विकसकांकडून डोंगर खोदकाम आणि अधिकृत आणि बांधकाम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१७ मध्ये हा डोंगर सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असतानाही अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. डोंगर वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महंतांवर हल्ला झाल्याची बाबही त्यांनी सभागृहात मांडत संबंधितांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील आमदार अहिर यांनी केली. 

Tags:    

Similar News