International Women’s Day 2026 : महिला दिनाच्या शुभेच्छा बंद करा: खरी समानता हवी, सोपस्कार नाही!

महिला दिन: मुठभर सक्सेस स्टोरी आणि जाहिरातींच्या जाळ्यात अडकलेली समानता... आर्थिक स्वातंत्र्याशिवाय महिला दिन फक्त दिखावा असून खरी गरज पुरुषसत्ताक मानसिकता मोडण्याची आहे. या मानसिकतेचा कसा छेद देता येईल यावर लेखक आनंद शितोळे यांचा लेख

Update: 2026-03-07 01:30 GMT

Reality of women empowerment in India महिला दिन साजरा करणे आणि त्यासाठी शुभेच्छा देणे हे लवकरात लवकर बंद व्हावं या सगळ्यांना शुभेच्छा !!
महिला दिनाला मुठभर महिलांची सक्सेस स्टोरी छापून येणे, केवळ महिलांचा कार्यक्रम घेणे, एखादी आस्थापना, काम फक्त महिलांनी चालवणे हा सालाबाद्प्रमाणे उपचार झाला.

Gender equality discussion स्त्री-पुरुषांच्या मुलभूत रचनेत नैसर्गिक भेद आहे, म्हणजे पुनरुत्पादन करण्यासाठी दोघे अनिवार्य आहेत पण म्हणून पुरुष गर्भवती होऊ शकत नाहीत हे वास्तव आहे, निसर्गाने ती जबाबदारी स्त्रियांना दिलेली आहे तश्या त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि कौशल्य स्त्रियांमध्ये निसर्गतः आलेली असतात हे मान्य आहे का ?
नैसर्गिक रचनेत असणारा हा भेद मान्य केला इतर बाबतीत समानता येण्यासाठी अडचण कुठं आहे. लढाऊ विमान चालवण्यासाठी महिला पायलट प्रशिक्षण घेत आहेत आणि ग्रामीण भागातल्या साक्षर नसलेल्या स्त्रियाही गृहउद्योग, लघुउद्योगांच्या माध्यमातून अर्थार्जन करत आहेत. स्त्रिया अर्थार्जन करत असल्या, बहुतांशी काम स्त्री पुरुष करत असले तरीही समानता अजूनही लांब आहे.

Patriarchal mindset in Indian society आपल्याकडं अजूनही जी पुरुषसत्ताक कुटुंबांची मानसिकता आहे त्यामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून पुरुष समजला जातो आणि आर्थिक व्यवहार साहजिकच पुरुषांकडे असतात. आपण कमवलेले पैसे कसे खर्च करायचे किंवा त्याची गुंतवणूक कशी कुठं करायची याच स्वातंत्र्य स्त्रियांना अजूनही नाहीये. हि समानता मात्र कळीचा मुद्दा आहे. कधीकधी अस वाटत स्त्रियांना स्वतःलाच ही समानता नको आहे की काय. अगदी उच्चशिक्षित असणाऱ्या स्त्रियांना आपण आर्थिक व्यवहार बघत नाही याचाही अभिमान असतो. “ मी आलेले पैसे / पगार नवऱ्याकडे देऊन टाकते, मला बाकी काही कळत नाही “ अस स्त्रिया म्हणतात तेव्हा सखेद आश्चर्य वाटत.

खरतर असे बँकांचे, गुंतवणुकीचे आणि इतर खर्चाचे आर्थिक व्यवहार दोघांनी वेगवेगळे नाही केले तरी किमान दोघांनी एकत्रितपणे केले तर स्त्रियांना त्यामधून आत्मविश्वास मिळतोच पण आणखी एक महत्वाची गोष्ट साध्य होते. दुर्दैवाने जर जोडीदाराचे अकाली निधन झाले तर बऱ्याचदा स्त्रियांना पतीच्या व्यवहार, मालमत्ता, गुंतवणूक यांची काहीही माहिती नसणे मोठ्या अडचणीला कारणीभूत ठरते.

ही आर्थिक समानता स्त्रियांना मिळणे हा खरा महत्वाचा टप्पा.

भारतीयांना आणि त्यातल्या त्यात स्त्रियांना त्यागाच आकर्षण असतंय, त्यागमूर्ती बनवून त्यांना देवी वगैरे म्हणवून मखरात बसवून पूजा केली की तिचे सगळे अधिकार, हक्क, स्वप्न बासनात बांधून तिला घरासाठी राबणारी बाई म्हणून घाण्याला जुंपण सोपं असतंय.
हे करण्यात पुरुषांचा स्वार्थ असतो त्यामुळे पुरुषही स्त्रियांना अशी त्यागमूर्ती बनवून मखरात बसवतात. पर्यायाने स्त्रियांना देवत्व देऊन समानता नाकारली जाते. ही असमानतेची भावना समाजात इतक्या खोलवर रुजलेली आहे कि ती मोडण्याचा प्रयत्न हीही बातमी होते. या असमानतेला खतपाणी घालण्याचे काम माध्यमं जाणूनबुजून करतात. साधं टीव्हीवर येणाऱ्या जाहीरातींच उदाहरण घ्या. चौकोनी कुटंब दाखवायला स्त्री गृहिणी दाखवली जाते आणि पुरुष कमवता. एक मुलगा एक मुलगी अस कुटुंब दाखवलं जातं. दोन मुली असलेल कुटुंब चांगलं नसतं का ? परिपूर्ण नसतं का ? स्त्री कामावरून घरी आलेली आहे आणि पुरुष कपड्याच्या साबणाची जाहिरात करत कपडे धुऊन वाळत घालतोय किंवा स्वयंपाक घरात पोळ्या करतोय असं जाहिरातीत बघितलेलं आहे का ?

आपणही या जाहिराती बघतो पण आपल्याला त्यातली असमानता खटकत नाही, ना स्त्रियांना ना पुरुषांना. निर्णय स्वातंत्र्य हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. आर्थिक स्वातंत्र्य असो कि घर कुठ घ्यायचं, मुलांना शिक्षण कुठल्या शाळेत द्यायचं, कोणत्या कॉलेजात टाकायचं, कोणती चारचाकी, दुचाकी विकत घ्यायची याबद्दल कदचित स्त्रियांना विचारलं जात असेल पण त्यांचा निर्णय प्रमाण ठरत नाही.

समाजाची व्यवस्था पुरुषसत्ताक आहे, समानतेवर आधारित नाही हे आपणच मान्य केलेलं आहे आणि तेच अदृश्य साखळदंड पायात अडकवून घेतलेले आहेत. अगदी होममेकर हजबंड संकल्पना प्रत्यक्षात दिसायला लागलेली असली तरीही त्यामध्ये निर्णय स्वातंत्र्य नेमकं कुणाला आहे हा कळीचा मुद्दा असतो, हे होममेकर हजबंड होणं आर्थिक पातळीवर असलेली अगतिकता आहे कि मनापासून स्विकारलेलं आहे हे तपासलं तर त्यातला सच्चेपणा समजून येतो. आणि थेट होममेकर नवरा तरी का ? होममेकर वाईफ किंवा हजबंड हेही दोन टोकाचे दोन बिंदू झाले, त्यामध्ये असणारा सुवर्णमध्य साधायला का जमू नये ? काम, हक्क, जबाबदारी, निर्णय स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी दोघांच्या का असू नयेत ? दोन भिन्न व्यक्ती म्हणून ओळख जपताना दोन्ही व्यक्तींचं सिंक्रोनाईज होणं अवघड असलं तरी अशक्य नाहीच.

इतके मोठे बदल, सध्या स्त्रियांना पुन्हा देवीचं रूप देऊन मखरात बसवून, त्यांच्या कपड्यांची, आभूषण यांची उठाठेव करणाऱ्या काळाची चक्रे उलटी फिरवून मध्ययुगीन काळाकडे धावायला लागलेल्या समाजात घडण्याची अपेक्षा करणं दिवास्वप्न वाटतयं पण उम्म्मीद पे दुनिया कायम है. नैसर्गिक भेद स्विकारुन समानता रुजत आणि जोपासत नाहीत तोवर सगळे फक्त सोपस्कार आणि मनाची समजूत. म्हणूनच सुरुवातीला म्हटलेलं आहे, महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याची प्रथा लवकरात लवकर आपोआप बंद व्हावी याच शुभेच्छा.

WomensDay, InternationalWomensDay, GenderEquality, WomenEmpowerment, FinancialFreedomForWomen, WomenRights, PatriarchyDebate, WomenDecisionPower

Similar News