Women psychological empowerment : घर, नोकरी, नाती आणि दबाव: स्त्रीच्या मानसिक संघर्षाचे वास्तव
घरात सर्वकाही आपल्या विचारांच्याविरोधात सुरु असताना स्त्री का गप्प बसते? मनात सुरु असलेली विचारांची गुंतागुंत, भिती, राग, दु:ख यातून कसे बाहेर पडावे? भीतीचे, रागाचे, तिरसट वागण्याचे नियोजन कसे करावे? जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे मानसिक सक्षमीकरण यासंदर्भात डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख
तिला अनेक गोष्टी करायच्या असतात...
घरामध्ये मुलांना वाढवायचे असते.
बाहेर जाऊन पैसे मिळवायचे असतात.
घरातील सासू-सासरे वगैरे नातेवाईकांना सांभाळायचे असते.
इतर अनेक कामे नीट वेळेवर करायची असतात.
Patriarchal society impact on women या साऱ्या मधून सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न, जागतिक आर्थिक प्रश्न, यांच्याकडे बघायला वेळ मिळत नसतो. आणि हे सगळं निमूटपणे करत राहायचं पण असतं. कारण तसा सांस्कृतीक दंडक आहे. या साऱ्यांमधून हे निश्चित झालेलं आहे की पुरुषसत्ताक समाज रचना स्त्रियांसाठी शोकांतिका बनते. आर्थिक परावलंबन किंवा पैशासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे यातून तिची कुचंबना होत राहते. जेव्हा कधी ती मुक्त होऊ इच्छिते तेव्हा सामाजिक तथाकथित नीतीनियम तिला गप्प बसवायचा विडा उचलतात. नात्यांमध्ये तिला दुय्यम वागणूक असणे ही तर सनातन बनली आहे.
...हे सारं जगणं जे घडतं ते या वरील अनेक कारणाने घडतं हे खरं आहे. पण.. केवळ तेवढेच खरं नाही. समाजामध्ये उभे राहत असताना आपण एकमेकांशी कसे वागायला हवे याविषयी खूप मोठा दुष्काळ आहे. आणि आपले वागणे आपण जर व्यवस्थित बनवले तर वर सांगितलेल्या सर्व प्रश्नांना आपण निधडेपणाने तोंड देऊ शकतो याविषयीची माहिती कुठेही दिली जात नाही. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, प्रश्न हजारो वर्षांपासून जैसे थे अवस्थेत स्त्रियांना ठेवत आलेले आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की, हे प्रश्न विविध रूप धारण करून जसेच्या तसे टिकून आहेत. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलेले नाही. त्यामुळे स्त्रियांच्या पायातील या प्रश्नांच्या बेड्या तशाच राहिलेल्या आहेत. आणि त्यावरील उपाय शोधण्याचे अनेक प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झालेले दिसत नाहीत. याचा अर्थ असा आहे की परिस्थितीत बदल होईल असे वाट बघत स्त्री वर्षानुवर्षे उभी आहे पण परिस्थिती बदलत नाही. हेही तिला समजलेले आहे. पण मग परिस्थिती जर बदलत नसेल तर करायचे काय? हा मोठा प्रश्न आहे!
परिस्थिती जर बदलत नसेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की जी परिस्थिती आपल्याला घाबरवते आणि चिडवत राहते त्या परिस्थितीशी दोन हात करण्या इतपत आपली मानसिकता सक्षम बनवायला हवी! लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार आणि त्यातून आपली तयार झालेली मतं या आधारे या परिस्थितीशी आपण तोंड देत आलेलो आहोत. तरी देखील आज अखेर बदल झालेला नाही हे सत्य समोर येते. अशावेळी आपण आपल्यामध्ये अशा परिस्थितीतही कणखरपणे उभे राहणे कसे घडवायचे याची तयारी आपण करायला हवी. मानसिक कणखरपणा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनेक स्त्रियांचा असा समज असतो की पुरुषांकडेच मानसिक कणखरपणा असतो. पण हे सरसकट सत्य नाही.
मानसिक कणखरपणा हा निर्माण करण्यासाठी आपल्याला काही मूलभूत गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे स्त्री असो वा पुरुष कोणीही व्यक्ती ही तीन प्रकारे वागत असते. पहिला प्रकार म्हणजे भिडस्तपणा किंवा गप्प बसूपणा. बहुसंख्य घरांमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर नवऱ्याच्या घरी जाईपर्यंत तिला तिची मते व्यक्त करू देण्याविषयी उदासीनता असते किंवा तिच्या मतांना गंभीरपणे घेतले जात नाही. लग्नानंतर तिला नवरा आणि सासरकडच्या लोकांचे निमूटपणे सहन करावे लागते. या दोन्ही ठिकाणी तिला, 'गप्प बस' असा कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे सांगितले जात असते. इथल्या संस्कृतीमध्ये मुलगी सासरी गेली तर ती आम्हाला मेली असे अगोदरच माहेरकडचे घोषित करून टाकतात. तिची अर्थी सासरीच उठेल अशी इथली व्यवस्था सतत मनावर बिंबवत आलेली आहे. पण गंमत अशी आहे की या मुलींच्या आयांना जे भोगावं लागलेलं आहे ते मात्र आपल्या मुलींना त्या सांगताना, 'शेवटी बाईनं सहन करायचं असतं' असं शिकवत बसतात आणि इथेच तिच्या भिडस्तपणाचा पाया रचला जातो. बहुसंख्य वेळा स्त्रिया अनेक प्रसंगांमध्ये गप्प बसतात. त्याचं कारण त्यांच्या मनात येणारे त्यांना स्वतःलाच घातक ठरणारे विचार त्यांना गप्प बसवत असतात. हे घातक विचार तिच्या कुटुंबाने, इथल्या संस्कृतीने आणि पुरुष रचनेने तिच्या मनात पेरलेले असतात. कोणते असतात हे विचार? हे विचार नीट तपासून बघा तुमच्या मनात आहेत का ते.
स्त्री गप्प बसते कारण..
पहिला विचार तिच्या मनात येतो की मी जर तोंड उघडले तर समोरच्याला वाईट वाटेल. त्याला दुःख होईल. त्यापेक्षा गप्प बसलेले बरे. हा विचार अत्यंत चुकीचा आहे. जेव्हा आपण आपले मत व्यक्त न करता दुसऱ्याला आपल्या मतामुळे दुःख होईल म्हणून गप्प बसतो तेव्हा आपण एक भयंकर गोष्ट करत असतो. ज्या विचारामुळे तुम्ही त्रस्त होता तेव्हा तुम्ही दुसऱ्याला त्याविषयी बोलला नाहीत तर समोरचा असं गृहीत धरतो की 'तो जे बोलला आहे किंवा सांगतो आहे ते बरोबर आहे! कारण तुम्ही त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. म्हणजे तुम्हाला ते पटलेले आहे!' वास्तवात ते तुम्हाला पटलेले नसते. मग तुम्हाला जे पटलेले नाही हे तुम्ही स्वतः त्याला सांगता का? आणि तुम्ही सांगत नसाल तर तो जे जे म्हणेल ते ते तुम्ही सर्व ऐकता आणि गप्प बसता असा संदेश तुम्हीच त्याला देऊन मोकळे होता. यावर असे युक्तिवाद केले जातात की जर त्यांच्याशी आपण असहमत झालो तर वाद होतील, भांडणं होतील.
हा दुसरा विचार आहे जो आपलेच नुकसान घडवतो. याचे उत्तर असे आहे की तो जे जे म्हणेल ते ते सर्व तुम्ही सहन करत आलात तर तुम्ही किती काळ ते सर्व सहन करणार आहात? आयुष्यभर करणार आहात का? अर्थातच नाही. कारण प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता ही काही काळापूर्तीच असते. त्यानंतर मात्र डोक्यावरून पाणी चाललंय असं वाटून आपण क्षणाचाही विलंब न लावता विरोध सुरू करतो. अशावेळी भांडण सुरू होते. म्हणजे वाट बघूनही नंतर भांडण होणार असेल तर वाट कशाला बघायची? एवढा काळ आपण गप्प बसून काय उपयोग झाला? याचा अर्थ सरळ आहे की जेव्हा आपण असहमत असतो किंवा आपल्यावर अन्याय होत असतो त्याचवेळी आपण व्यवस्थित, नीट हे त्यांना सांगायचे असते की मला हे चालणार नाही, आवडत नाही, पटत नाही. बऱ्याच जणींना असे वाटते की हे जर आपण असे म्हणालो तर ते आपल्याला उद्धट समजतील. पण वास्तवात हा उद्धटपणा नसतो तर तो रोखठोकपणा असतो. पण आपण ते टाळतो. आणि समोरचा जे काही करेल आणि वागवेल ते सहन करत बसतो. विशेषतः सासू आणि सून नात्यांमध्ये हे जास्त प्रकर्षाने दिसते.
तिसरा विचार असा असतो की मी जर समोरच्याशी असहमत झाले किंवा विरोध केला तर समोरचा मला सोडून जाईल. वास्तवात जर तुमच्या मतांना समोरची व्यक्ती किंमत देत नसेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर ती त्याचवेळी सोडून गेलेली उत्तम. कारण ती आयुष्यभर तुमच्या कुठल्याच मतांना व विचारांना ती गंभीरपणे घेणार नाही. आणि मग त्याचा फटका तुम्हाला बसत राहील.
चौथा विचार असा असतो की जर मी समोरच्याच्या बोलण्याशी सहमत झाले नाही तर भांडण होण्यापेक्षा गप्प बसून टाकूया. 'पुढे कधीतरी बघू' हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण पुढे कधीतरी ती वेळ कधीच येत नाही.
पाचवा विचार असा असतो की, समोरच्याला आपल्यापेक्षा आपण जास्त महत्त्व द्यायला हवे कारण ती व्यक्ती महत्त्वाची आहे आणि तिला बरच काही कळतं. असं जर असतं तर ती व्यक्ती वाटेल ते तुम्हाला बोलली नसती किंवा तुम्हाला वाईट वागवलं नसतं. पण आपणच काढलेला हा निष्कर्ष असतो. जो चुकीचा असतो. व्यक्ती कोणतीही असो, ती मोठी केव्हा छोटी नसते ती तुमच्या बरोबरीने किंवा समानतेने वागणारी असायला हवी. पण हे फार कमी ठिकाणी आढळते. त्यामुळेच वादाच्या ठिणग्या पडत राहतात आणि तुम्ही गप्प बसत राहता. गप्प बसणे हे अशा पाच विचारांमधून निर्माण होत असते. हे विचार आपणच निर्माण केलेले असतात. जर हे विचार चुकीचे आहेत तर अशा विचारांना कवटाळून बसणे ही चूक आपलीच नसते का?
ही चूक आपलीच असते. पण मग हे चूक आहे तर या चुकीचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्यामागे एक मनोविज्ञान आहे. ते असे आहे की, जर आपणाला नको असलेल्या भावना सोडून द्यायच्या असतील, नष्ट करायच्या असतील तर आपण आपल्या विचारांना जबाबदार धरायला हवे. सूत्र असे आहे की, प्रत्येक भावनेमागे विचार असतो. भावना या आपोआप निर्माण होत नाहीत. दुःख, राग, भीती या तीन प्रमुख भावना आहेत. ज्या आपणाला आवडत नाहीत. नकोशा असतात. या भावना जेव्हा निर्माण होतात तेव्हा निश्चितपणे या भावना निर्माण होण्याअगोदर कोणता ना कोणता तरी विचार आपल्या मनात तरळून गेलेला असतो.
वरील पाच पैकी एखादा विचार आपण उदाहरणासाठी घेऊया. 'समोरचा वाटेल ते बोलतोय. मला त्याचा त्रास होतोय. पण मी जर त्याला त्याविषयी बोलले तर त्याला राग येईल.' हा जो विचार आहे हा विचार जेव्हा मनात येईल तेव्हा आपल्याला 'भीती' ही भावना वाटू लागते. थोडक्यात विचार आणि भावना या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी विचारातूनच भावना निर्माण होतात. अशा वेळी एक सूत्र बनते. "जसे विचार तशा भावना". जेव्हा एखादी स्त्री गप्प बसते, भिडस्त बनते, तेव्हा ती भीतीमुळे गप्प बसत असते. भीती ही भावना असल्याने या भीती मागील अनेक विचार हे तिने मनात धरून ठेवलेले असतात. जर हे विचार सतत येत राहिले तर सतत भित्रेपणा कायम राहतो. अशावेळी घाबरल्यावर बहुसंख्य स्त्रिया या, देवाचे करतात, नवस बोलतात, उपवास करतात, पूजा विधी करत राहतात, मांत्रिकाकडे जातात, ध्यानधारणा करतात, मंत्र पुटपुटत राहतात किंवा आधुनिक प्रकार देखील आहेत जे त्या करतात. ते म्हणजे.. मोबाईल मध्ये रिल्स बघत राहणे, टीव्हीवर एकापाठी एक सिरीयल बघत राहणे, मैत्रिणींशी फोनवर तासंतास कैफियत मांडून बोलत राहणे, बाहेर कुठेतरी मन रमेल म्हणून फिरायला जाऊन येणे, व्यायामामध्ये झोकून देणे.. वगैरे. हे सर्व प्रकार म्हणजे भीतीला तात्पुरते गप्प बसवणे एवढेच असते. या सर्व प्रकारांमुळे भीती तात्पुरती नाहीशी देखील होते. पण ती तात्पुरती नाहीशी होते. कारण हे सर्व प्रकार केल्याने भीतीमागचे विचार बदललेले नसतात. ते जैसे थे असतात. आणि जेव्हा जेव्हा ते विचार मनात येतात तेव्हा तेव्हा भीती वाटत राहते. आणि मग तासनतास मंत्र पठण करणे, कुठल्यातरी 'पाठीशी आहे' म्हणणाऱ्या कडे जाऊन तेथेच बसणे, कुठले तरी मंत्रशक्तीचे पुस्तक सतत जवळ ठेवणे, गंडेदोरे किंवा भंडारा-अंगारा बांधून ठेवणे, मंतरलेले पाणी शिंपडणे, चालूच राहते. म्हणूनच भीती नाहीशी होत नाही. ती वारंवार येत राहते. अशा वेळी विचार बदलणे हा उपाय असतो पण हा उपाय सहजासहजी जमत नसतो. त्यासाठी विशेष समुपदेशन करून घ्यावे लागते. पण बहुसंख्य स्त्रिया समुपदेशनाऐवजी वरील उपाय पसंत करतात. त्याचे कारण त्यांना वाटते की अज्ञात शक्तींनी सर्व काही ठीक होईल. पण ते कधीच होत नाही. कारण आपले विचार कधीच बदलत नाहीत. शेवटचा उपाय म्हणून मनोरोगतज्ञाकडे जाऊन औषधोपचार सुरू केले जातात.
एक साधे उदाहरण घेऊ. कुटुंबामध्ये सासू-सून या संघर्षामध्ये सासू किंवा सुनेला सतत ताण येत राहिला तर त्यांचे विचार बिघडत जातात. आणि हे बिघडलेले विचार, बिघडलेल्या भावना निर्माण करतात. मग सुनेला कधीतरी डिप्रेशन येते. डिप्रेशन ही भावना आहे. मग अशावेळी तिला मनोरोगतज्ञाकडे ट्रीटमेंट सुरू होते. त्याचा उपयोग देखील होतो. पण सासू आणि सून या जेव्हा जेव्हा समोरासमोर येतील तेव्हा निर्माण होणारे विचार पुन्हा डिप्रेशन आणत राहतात. डिप्रेशन वारंवार येत राहते. मग वारंवार गोळ्या खाव्या लागतात. थोडक्यात औषधं घेत राहणे हा उपाय इमर्जन्सीच्या काळात उपयोगी असला तरी तो एकमेव उपाय दीर्घकाळसाठी उपयोगी नाही.
सामान्यपणे कोणत्याही स्त्रीला मनोरोग नसतो. पण विचार दोष मात्र निश्चितपणे असतात. हे दोष अनेक प्रकारचे असतात. आणि हे दोष दोषी भावना निर्माण करत असतात. विचारांमध्ये दोष आहेत हे बहुसंख्य स्त्रिया मान्य करत नाहीत. त्यांना वाटते आपलेच म्हणणे बरोबर आहे आणि त्यातून आपले विचार दोष दूर करण्याच्या फंदात देखील त्या पडत नाहीत. विचार दोष कोणते असतात? याचे एक उदाहरण आपण पाहूया. समजा नवरा म्हणाला की तुझ्या आजच्या सकाळच्या जेवणात मीठ कमी पडले होते. लगेच तुमच्या मनात असा विचार येईल..
'आजच याला मीठ कमी पडले हे कसे काय आठवले?'
'माझे जेवण याला आता आवडत नाही का?'
'हा मीठ कमी पडले आहे असे सांगून मला ठोकण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे का?
जेव्हा यापैकी एखादा कुठलाही विचार जरी आला किंवा अशा पैकी काही विचार आले तर तुम्ही एखादा विचार पकडून ठेवता. आणि 'मीठ कमी पडले' या ऐवजी 'नवरा असा का विचार करू लागलेला आहे?' हा विचार करू लागता. नवऱ्याच्या मनात हाच विचार आलेला आहे हे तुम्ही कसे काय ठरवता? तुम्ही मनकवडे आहात का? दुसऱ्याच्या मनातलं तुम्हाला ओळखता येतं का? की तुम्ही माईंड रीडर आहात? या प्रश्नांची उत्तरे अर्थातच नाही असे असेल तर नवऱ्याच्या मनात अमुकतमुक चालले आहे व तो तसाच विचार करतो आहे हे तुम्ही ठरवणं म्हणजे मनकवडेपणा ठरणार आहे. दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे आपणच ठरवायचे व तसे नक्की करून टाकून घोषित करायचे हा विचार दोष आहे. ज्याला 'मनकवडेपणा' किंवा माइंड रीडिंग म्हणतात. यावर उपाय असा असतो की जर आपल्याला नवऱ्याच्या सांगण्याविषयी शंका असेल तर आपल्याला जे वाटते ते त्याला विचारून खात्री करून मगच नक्की करायला हवे. पण आपण ते विचारत नाही. आणि आपणच मनातल्या मनात समोरच्याला काय वाटते हे ठरवून मोकळे होतो. हा विचार दोष आपणालाच त्रास देतो. कारण आपल्याला जे वाटत असते तसेच समोरच्याला वाटते हे खरे नसते. त्याला दुसरेच काहीतरी वाटत असते आणि आपण भलताच अर्थ काढलेला असतो.
जसा मनकवडेपणा हा विचार दोष आहे तसेच अनेक विचार दोष हे मानस विज्ञानात सांगितले गेले आहेत. या सर्व विचार दोषांची माहिती करून घेणे हा विचार बदलासाठीचा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे. पण हे सारे काही करून घेतले जात नाही आणि आपण लहानपणापासून विचार कसा करायचा याविषयीची जी पद्धत तयार केलेली असते तीच वापरतो. भिडस्तपणा हा सतत जर होत राहिला तर आपण सतत भीतीच्या छायेखाली राहतो. त्यातून नैराश्य नावाची भावना तीव्र होत जाते. या निराशेतून आपण धड नीट बोलू सुद्धा शकत नाही. अशी फ्रस्ट्रेशन निर्माण करणारी भावना तयार होते. त्यामुळे आत्मविश्वास खच्ची होतो. डिप्रेशन किंवा निराशा विकृती ही भिडस्त राहण्यापासून सुरू होते आणि आपण ही भिडस्त वागण्याची पद्धत सोडून दिली नाही तर गंभीर डिप्रेशन कडे घेऊन जाते.
भीतीची एकदा ओळख झाली की ती भीती सर्वत्र थैमान घालते. नवरा मारेल ही भीती, नवरा सोडून जाईल ही भीती, सासु छळेल ही भीती, घरात सगळेजण मिळून मला कॉर्नर करतील ही भीती मुलांना नीट वागवले जाणार नाही ही भीती, मुलांमध्ये जर वागणे बिघडले तर आपल्यावर ठपका येईल ही भीती, कामाच्या ठिकाणी बॉस कसा वागेल या शंकेने दाटून येणारी भीती, वगैरे वगैरे. अनेक भित्या जेव्हा आपल्या पाठी आपणच आपल्या विचारांनी लावून घेतो तेव्हा आपण मानसिक दृष्ट्या पांगळे होतो. आधाराची गरज भासू लागते. आणि हे आधार आजूबाजूला टपून बसलेले लोक अचूकपणे हेरतात आणि स्त्रियांचा गैरवापर करतात. शोषण करतात. मोठ मोठे बुवा, महाराज, आज गजाआड जे झाले आहेत ते स्त्रियांचे यौन शोषण केल्यामुळे देखील गजाआड झालेले आहेत.
भीतीचे जसे नियोजन करणे गरजेचे असते तसेच रागाचे देखील नियोजन करणे गरजेचे असते. त्याचबरोबर तिरसट वागण्याचे देखील नियोजन करणे गरजेचे असते.
भिडस्त प्रकाराच्या अगदी विरुद्ध प्रकार म्हणजे आक्रमक किंवा रागीट प्रकार होय. ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीचा सर्वांशी खटका उडू लागतो. ती चिडते, संतापते. तिची चिडचिड सुरू होते. या संतापाची भावना निर्माण होण्यामागे तिचे विचार असतात. ते विचार म्हणजे,
नवऱ्याला एवढी साधी अक्कल नाही का?
ही सासू मिऱ्या वाटायलाच माझ्या डोक्यावर बसलेली आहे.
घरातली सगळी कामे काय मीच करायची का?
हज्जार वेळा सांगितलं कपडे जिथल्या तिथे ठेवत जा पण अक्कल नाही, काय करणार? वगैरे.
या विचारातून दर्शवायचे असते हे की समोरच्याला अक्कल नाही. त्याला त्याच्या लायकीत ठेवल्याशिवाय तो नीट वागत नाही. रागाने बोलल्याशिवाय कोणतेही कामे होत नाहीत. जेव्हा हे सर्व विचार एकत्र येतात तेव्हा आपल्या संतापाचा स्फोट होत राहतो. हे विचार दुरुस्त करणे गरजेचे असते. पण त्याच्या ऐवजी आपण या विचारांना धरून ठेवतो. कारण या विचारांमुळे तात्पुरती कामे होतात आणि तात्पुरते समाधान मिळते. जेव्हा भिडस्त आणि आक्रमक अशा दोन्ही पद्धती एकाच वेळी वापरल्या जातात तेव्हा स्वभावात तिरसटपणा निर्माण होतो. जर कामाच्या ठिकाणी आपला सहकारी मदत करत नसेल तर त्याला तोंडावर स्पष्टपणे काहीही न बोलता भिडस्त राहून त्याच्या माघारी इतरांकडे त्याची निंदानालस्ती करण्याचा आक्रमकपणा आपण करतो. हा तिरसट स्वभाव झाला. काही वेळा असेही घडते की आपण तोंडसुख घेऊन भडाभडा राग व्यक्त करून मोकळे होतो. म्हणजे आक्रमक होतो आणि नंतर आपण एवढे का चिडलो? का संताप केला? याचे वाईट वाटू लागते. आणि आपण गप्प गप्प बसून दुःखी होतो.
अशा प्रकारच्या चारही पद्धतीच्या वागण्याचा ज्या स्त्रिया वापर करतात त्या सातत्याने दुःख, भीती, राग, या भावनांमध्ये अडकून पडलेल्या असतात. खरे तर त्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन आपले म्हणणे थेट मांडण्याची सवय लावून घ्यायला हवी. यामध्ये ही सवय लावताना शांतपणे व्यक्त करण्याचं कौशल्य हासील करायला हवे. आणि हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. कोणत्याही व्यक्तीबरोबर कोणत्याही घटनेमध्ये शांतपणे पण स्पष्टपणे आपण व्यक्त होणे हे एक कौशल्य जे आहे त्याला 'आत्मनिर्भर पद्धत' म्हणतात. हे कौशल्य इतरांना अत्यंत प्रभावीपणे नीट बोलण्यास भाग पाडते. मग यासाठी आपण सातत्याने आत्मनिर्भर कौशल्याचा सराव करणे आवश्यक असते आणि ते शिकून घेणे देखील असते. आत्मनिर्भर कौशल्य हा संपूर्ण स्वतंत्र लेखाचा विषय आहे. परंतु मानस विज्ञानात त्यावर उपाय आहेत एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.
Women empowerment, Patriarchal society impact on women, Gender inequality in society, Women mental strength, Women social issues, Women rights and freedom, Women struggle in society, Women's role in family and society, Gender discrimination India, Women empowerment India