West Bengal Election: ममता बॅनर्जींसमोर बंडखोरीचं आव्हान, तिसऱ्या मंत्र्यांनी दिला राजीनामा

Update: 2021-01-22 11:23 GMT

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकार मधील तिसऱ्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या अगोदर आत्तापर्यंत दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल हा डाव्यांचा गड समजला जातो. या ठिकाणी भाजप कमळ फुलवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत तृणमुल विरुद्ध भाजप (BJP) असा सामना रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, ऐन विधान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी होत असल्यानं ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

कोणी दिला राजीनामा?

पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. रजीब बॅनर्जी यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.

काय म्हटलंय राजीनामा पत्रात?

"मला आपणास कळवताना खेद होतो आहे की, मी आज २२ जानेवारी २०२१ रोजी वनमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. असं रजीब बॅनर्जी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे. अलिकडे भारतात कोणत्याही राज्यात निवडणुकांच्या अगोदर भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असते. पश्चिम बंगालमध्येही (West Bengal Election) हेच चित्र आहे.

आत्तापर्यंत कोणी दिला राजीनामा?

पश्चिम बंगालचे कॅबिनेट मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी डिसेंबर 2020 मध्ये राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राज्य क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी 5 जानेवारीला राजीनामा दिला होता. मात्र, ते अजुनही पक्षात आहेत.

तृणमूल कॉंग्रेसचे नेते असलेले शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आता ही बंडखोरी थांबवण्यासाठी ममता बॅनर्जीने नवीन पर्याय हाती घेतला आहे. नंदीग्राममधून तृणमूल कॉंग्रेसचे नेते असलेले शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली आणि नंदीग्राम मधून विधानसभा लढवण्याची घोषणा केली.

"नंदीग्राम माझ्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे मला असे वाटते मी इथून निवडणूक लढवली पाहिजे. आमच्या प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी मला यासाठी परवानगी द्यावी." असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी बंडखोरांच्या विरोधात पक्षाची काय रणनिती असेल. हे त्यांनी स्पष्ट केलं.

वास्तविक पाहता ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, यावेळी बंडखोरांना रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी थेट बंडखोरांच्या मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता त्या नंदीग्राम मधून निवडणूक लढवत असताना भवानीपूरमधून कोणाला उमेदवारी मिळणार? की त्या दोनही मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हे गुलदस्त्यातच आहे.

मात्र, भाजप नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांना केवळ नंदीग्राम मधून निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी हे चॅलेंज स्विकारतात की नाही पाहणं महत्त्वाचं आहे.

Tags:    

Similar News