भाजपाला विरोध म्हणजे देशद्रोह नाही, आडवाणींनी मोदींना धुतलं

Update: 2019-04-05 02:10 GMT

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदींना घरचा आहेर दिला आहे. भाजपाला राजकीय विरोध करणाऱ्यांना शत्रू मानण्याची किंवा देशद्रोही मानणं चूक असल्याचं मत आडवाणी यांनी व्यक्त केलं आहे.

बालाकोट हवाई हल्ल्याचे पुरावे मागणे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील एएफएसपीए किंवा देशद्रोहासंदर्भातल्या कायदे रद्द करण्याबाबतच्या आश्वासनांना भाजपाच्या नेत्यांनी देशद्रोही कृत्य म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर आडवाणी यांचं हे वक्तव्य भाजपासाठी घरचा आहेर ठरलाय.

विशेष म्हणजे आडवाणींच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ ट्वीट करून आपली बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

“’आडवाणीजींनी अतिशय समर्पकपणे भाजपाच्या विचारधारेचं सार सांगीतलं आहे. भाजपाचं मार्गदर्शक तत्वच आहे, आधी राष्ट्र,मग पक्ष आणि नंतर स्वतः. मला भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटतो आणि अभिमान आहे आडवाणीजीं सारख्या उदात्त व्यक्तिमत्वांनी त्याला मजबूत केलं आहे’’

भारतातील वाढीस लागलेल्या असहिष्णुतेसाठी भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरण्यात येतंय, या पार्श्वभूमिवर आडवाणींचं हे वक्तव्य हे कबुलीजबाबासारखं मानलं जातं. जवळपास साडेतीन वर्षे लालकृष्ण आडवाणी यांनी भाजपाच्या सध्याच्या राजकीय कारभारावर मौन साधलंय. २०१५ मध्ये बेंगलुरू येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही लालकृष्ण आडवाणी यांनी बोलण्यास नकार दिला होता.

भारतीय लोकशाहीचा हिस्सा असणाऱ्या सर्वांनीच प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करायला पाहिजे असं मत ही आडवाणी यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय पक्ष, माध्यमं, निवडणूक आयोग आणि मतदार या सर्वांसाठी आत्मपरिक्षणाचा हा काळ असल्याचं आडवाणी यांनी म्हटलंय.

गेली सात दशकं मी पक्षाचा अविभाज्य घटक म्हणून वावरलोय. पंडीत दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि अशाच मोठ्या, निःस्वार्थी आणि प्रोत्साहीत करणाऱ्या नेत्यांसोबत काम करण्याची दुर्मिळ संधी मला मिळाली. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष शेवटी स्वतः या एका मार्गदर्शक तत्वावर माझं आयुष्य आधारित राहीलंय, आणि मी याच तत्वावर शेवटपर्यंत चालेन असं आडवाणी यांनी म्हटलंय.

Similar News