मोदी, निवडणूका आणि काळीजादू

Update: 2019-05-08 15:08 GMT

आपल्याकडे निवडणूका आल्या की भले भले जादूगार होतात. प्रत्येक पक्षाचा जादूगार आपापली पोतडी घेऊन मैदानात उतरतो. कुणी रंगीबेरंगी स्वप्ने विकतो, कुणी गरमा गरम भाकरीची आशा विकतो, तर कुणी केवळ हवेच्या बुडबुड्यांवरही मतदारांना गुंग करतो. पण एवढे करूनही ज्यांचे भागत नाही ते काळीजादूही करायला सरसावतात.

विजय व्हावा म्हणून किंवा लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने राजकीय पक्षांकडून सर्व हातखंडे वापरले जात आहेत. राहूल गांधी यांनी देशाताली जनतेला ७२ हजारांचे आश्वासन देवून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर गेल्या निवडणूकीत विकास आणि अच्छे दिनचा नारा दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूकीत मात्र शहिदांचे रक्त, देशाची असुरक्षित सीमा, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी निधड्या छातीच्या नेतृत्वाची गरज व्यक्त करीत नवी जादू करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जादूगार तेच आहेत फक्त नवी जादू चालते का ते आजमावायचे काम सुरू आहे. मात्र, यापेक्षा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये समोर आला आहे.

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस, आला असून हा काळीजादू करण्याचा प्रकार मानला जातो आहे. मात्र, आम्ही अशी जादू मानत नसल्याने असे कृत्य करणा-या आणि भाबड्या आशा लावून असलेल्या कार्यकर्त्य़ांच्या बुद्धीची कीव करू शकतो. भिवंडी लोकसभा मतदारसंघात एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी शाळेत ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमबाहेर सोमवारी काहीजण कारमध्ये होमहवन करत असताना आढळले. या लोकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले व आक्षेपही नोंदवला आहे. याबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले आहेत की,हे लोक कोण आहेत? त्यांच्याकडे जादूटोण्याचे साहित्य कसे आले? व लोकांशी भाजपचा काही संबंध आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच जर हे लोक भाजपशी संबंधित असतील तर कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करुन याची चौकशी केली पाहिजे. अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा भाजपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. काळी जादू करण्यापर्यंत मजल जावी. हे डोक्याला हात लावून घेण्यासारखे आहे. भाजपची विचारधारा ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. मात्र, सकारात्मक विचार आणि विकासाच्या जोरावरच राजकारण होतं. काळी जादू नव्हे तर काळाची जादू चालते हे पुरोगामी महाराष्ट्र नेहमीच दाखवून देत आला आहे.

Similar News