उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार लोकसभा मतदारसंघात निवडून येण्याच्या शर्यतीत नसतील त्या ठिकाणी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.
राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पहिल्यांदाच मुलाखत दिली ती एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीला. या मुलाखतीत राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशात सपा-बसपासोबत आघाडी नसल्याचा थेट फायदा हा भाजपला होईल, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी सांगितलं की, ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार हे निवडून येण्याच्या शर्यतीत नाहीत, त्या मतदारसंघात काँग्रेसकडून सपा-बसपाच्या उमेदवारांना मदत करण्यात येईल, तसे आदेशच मी प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्याचंही राहुल गांधींनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय होण्यासाठी आमचे प्रयत्न असून कुठल्याही परिस्थितीत भाजपचा पराभव करणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाला काँग्रेसचीच भीती आहे. हे खरं असलं तरी मायावती आणि अखिलेश यादव या दोघांबद्दल आपल्याला आदरच असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.