'राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का?'- भाजप

Update: 2021-09-13 10:44 GMT

महाराष्ट्रामधील अल्पवयीन मुलींवर होणारे अमानवी अत्याचार आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे , गेल्या आठवड्याभरात चार ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. महिला सुरक्षेबाबत आता सरकारला जाग कधी येणार? असा सवाल उपस्थित करीत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बलात्काऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निदर्शन करण्यात आले. युवा मोर्चाच्या पूजा आल्हाट, प्रियांका शाह, तेजस्विनी कदम, प्रियांका देशमुख, आरती ओव्हाळ यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले.

राज्यात आठवडाभरात पुणे, मुंबई, अमरावती सारख्या शहरात लहान मुली व महिलांवर अमानवीय प्रकारे बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तसेच साकीनाका घटनेतील तरुणीवर तर अत्यंत घृणास्पद अत्याचार करून मारण्यात आले. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमाला फाशीची कठोर शिक्षा होऊन पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा, तसेच काही दिवसांपासून महिला अत्याचार घटनांत सातत्याने वाढत होत आहे. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आघाडी सरकारने कडक पावले उचलून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पुजा आल्हाट यांनी केली आहे.

हाथरस घटनेच्या वेळेस खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. आता राष्ट्रवादीच्या संबंधित नेत्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना बांगड्या पाठवणार का? असा प्रश्न युवा मोर्चाने उपस्थित केला आहे. तसेच, महाराष्ट्रातील शक्ती कायदा हा फक्त कागदावर आहे की अंमलात आणणार आहात? असा जाबही विचारण्यात आला आहे. बलात्कारासारख्या केस 'फास्ट ट्रॅक' कोर्टात चालवून या अशा नराधमांना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News