एकीकडे रिलायन्स जिओ आपल्या ऐतिहासिक आयपीओसाठी बँकांची फौज तैनात करत असताना, दुसरीकडे भारतीय स्टार्टअप्सच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळत आहे. जागतिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणावामुळे (Geopolitical Tensions) अनेक मोठ्या स्टार्टअप्सनी आपले आयपीओ लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
PhonePe सह बड्या स्टार्टअप्सची 'वेट अँड वॉच' भूमिका
फिनटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी PhonePe ने आपला आयपीओ तूर्तास स्थगित केला आहे. एवढेच नाही तर Zepto, OYO, Acko आणि Turtlemint यांसारख्या कंपन्या, ज्यांच्याकडून २०२६ मध्ये मोठ्या धमाक्याची अपेक्षा होती, त्या आता सावध पवित्रा घेत आहेत.
आयपीओ लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे
जागतिक स्तरावर सुरू असलेले चढ-उतार आणि व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
२०२१-२२ च्या काळात स्टार्टअप्सना जे अवाढव्य मूल्यांकन मिळाले होते, ते आता सार्वजनिक बाजारात मिळणे कठीण झाले आहे. गुंतवणूकदार आता केवळ वाढीपेक्षा (Growth) 'नफा' (Profitability) आणि 'कॅश फ्लो'ला जास्त महत्त्व देत आहेत.
आयपीओ म्हणजे आता फक्त व्यवसाय मोठा करणे नसून तो नफ्यात आणणे आहे," असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक मजबूत कंपन्या चुकीच्या वेळी बाजारात येण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहत आहेत."सध्याचे वातावरण हे 'मार्केट ड्रिव्हन' आहे, म्हणजेच जेव्हा बाजार स्थिर होईल, तेव्हाच या कंपन्या त्यांचे नशीब आजमावतील,अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.
पुढील १२ ते १८ महिने हे स्टार्टअप्ससाठी 'अग्निपरीक्षा' असतील. जे स्टार्टअप्स भांडवल कार्यक्षम (Capital Efficient) राहतील आणि नफा कमावतील, तेच पुढील आयपीओ सायकलमध्ये यशस्वी होतील, असेही तज्ज्ञांनी सांगितलंय.