...म्हणून दिला अजित पवारांनी राजीनामा

Update: 2019-09-28 12:41 GMT

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील रंगत चांगलीच वाढली होती. कालपासून अजित पवार यांनी राजीनामा का दिला यावर अनेक तर्कवितर्क बांधून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. काल शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत माझं नाव शिखर बँक घोटाळ्यात (Shikhar Bank Scam) विनाकारण गोवलं जात असल्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याकडून याविषयी काय उत्तर मिळणार याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

आज मुंबई येथे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सर्व राजकीय घडामोडींना आता पूर्णविराम मिळाला आहे. शिखर बँक घोटाळ्यात माझ्यासोबत शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव विनाकारण घेतलं जात आहे. या वयातही माझ्यामुळं त्यांच्या नावाची बदनामी होत असल्यामुळे मी राजीनामा दिला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. जो व्यक्ती कधीही बँकेच्या संचालकपदी नव्हता त्या माणसावरही का गुन्हा दाखल केला जातो? असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

https://youtu.be/bRm-44YZPNU

 

पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच अजित पवार यांनी सर्व सहकाऱ्यांची माफी मागितली. “या आधीही मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी सर्व नेते कार्यकर्ते यांच्याशी बोलल्याशिवाय यापुढे काही निर्णय घेणार नाही असं सांगीतलं होतं. मात्र, यंदा मी असं काही सांगीतलं असतं तर मला सर्वांनी नाहीच म्हटलं असतं. म्हणून ३ दिवसांपूर्वी मी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांना फोन केला होता. माझ्या मनात राजीनाम्याचा विचार घुटमळत होता म्हणून मी राजीनामा दिला” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Similar News