भारतीय जनता पार्टीने सीबीआय सारख्या महत्वाच्या स्वायत्त संस्थेला निवडणुकीतील ओपीनियन पोल सारखे सर्वे करण्याची एजन्सी बनवली आहे का ? असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातून आपण दोन लाख साठ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होऊ, असा सीबीआयचा अहवाल आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे, तसा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, त्यासंदर्भात सचिन सावंत बोलत होते. नरेंद्र मोदी सरकारने सीबीआयसारख्या यंत्रणांमध्ये अवाजवी हस्तक्षेप व दबाव आणल्याचे प्रकार पाच वर्षात पहायला मिळाले. मध्यरात्रीच सीबीआयच्या मुख्यालयात दिल्ली पोलिसांचा छापा टाकून सीबीआय प्रमुखांचे कार्यालय सील करणे आणि रात्रीच नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती करणे असे प्रकार आपण मोदी सरकारच्याच काळात पाहिले. एवढ्यावरच हे थांबले नसून आता थेट सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी निवडणूक सर्वे करण्याचे कामही सीबीआयला दिले गेले असेल तर ते धोकादायक आहे, असेही सावंत म्हणाले.
सीबीआयकडे अनेक महत्वाची कामं असून त्यांना अशा प्रकारच्या राजकीय सर्वेसाठी जुंपणे खेदजनक आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेला सीबीआयच्या अहवालाचा दावा खरा आहे का, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने द्यावे, असे आव्हानही सावंत यांनी केले आहे.