निवडणुकीपूर्वी आमचा ठरलंय, जे काय ठरलंय ते अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उपमुख्यामंत्रीपदाबाबत आणि इतर गोष्टींबाबत आमचं काहीही ठरलेलं नाहीये असं भाजप प्रदेश अध्यक्ष पाटील म्हणतायत.
युतीचा फॉर्मुला ठरला तेव्हा रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र त्यांनीही मला याबाबत काहीही माहित नसल्याचं म्हंटलंय. आता फडणवीस म्हणतायत मुख्यमंत्री मीच होणार आणि जो काय फॉर्मुला आहे तो योग्य वेळी जाहीर करू.
निकाल जाहीर होणार होता त्या दिवशी सकाळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते महायुतीच्या २५० जागा येतील. मात्र उलट भाजपाच्या १७ जागा कमी झाल्या. एवढेच नव्हे तर १३ जिल्ह्यात युतीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
चंद्रकांत दादा पाटील पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एकही जागा भाजपला मिळाली नाही. कोल्हापूरमध्ये बंडखोरी करून शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडण्यात आले. चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांची यामध्ये मुख्य भूमिका होती. असे असून देखील आमची वैचारिक युती आहे, असे म्हणत आपल्याच मित्राला दगा देण्याची भूमिका चंद्रकांत पाटलांची आहे.
आम्ही तुमच्या अडचणी समजून घेतल्या, परंतु आता आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे त्यामुळे यापुढे आम्ही अडचणी समजून घेऊ शकत नाही असे शिवसेनाप्रमुख म्हणाले. काही दिवसापूर्वी भाजप ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्यांनाच निवडणुकीपूर्वी पक्षात पाटलांच्या अध्यक्षतेखाली आयात करण्यात आले आणि उमेदवारी देण्यात आली. यातील बहुतेक उमेदवार निवडून आले नाहीत. भाजप जर काँग्रेस-राष्ट्रवादी सारखेच वागत असेल तर आम्ही त्यांना निवडून का द्यायचं, असे म्हणून लोकांनी यांना नाकारले आहे.
निवडणुकीत चंद्रकांत दादांनी मित्रपक्षाला कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले, म्हणजे छोटे पक्ष आहे त्यांनाही विचारायचं नाही, आणि शिवसेनेने सारखे पक्षांना सुद्धा बाजूला टाकायचा असं यांनी चालवले आहे. निवडणुकीचा जो रिझल्ट आला आहे तो पूर्णपणे चंद्रकांत दादांचा पराभव आहे. यापुढे जर महायुतीचे सरकार आलं तर चंद्रकांत दादांना आत्मचिंतन करून मित्रपक्षाला देखील बरोबरीच्या नात्यानं वागवावं लागेल. भाजपला आणि चंद्रकांत दादांना बदलावं लागेल, सुधारावे लागेल असे मत मॅक्स महाराष्ट्र वर बोलताना हेमंत देसाईंनी व्यक्त केले.