मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ योजनेच्या अंमलबजावणीपेक्षा तिच्या जाहिरातबाजीवरच मोठ्याप्रमाणावर खर्च झाला आहे. महिला व बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री विरेंद्र कुमार यांनीच लोकसभेमध्ये ही माहिती दिली होती.
४ जानेवारी २०१९ लोकसभेच्या अधिवेशनात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ योजनेवरील खर्चासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देतांना विरेंद्रकुमार यांनी सभागृहात माहिती दिली, त्यानुसार ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत केंद्र सरकारनं ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ योजनेच्या सुरूवातीपासून ६४८ कोटी रूपयांचा निधी वितरीत केलेला आहे. त्यापैकी ३६४ कोटी रूपये फक्त योजनेच्या जाहिरातबाजीवर खर्च कऱण्यात आले आहेत. म्हणजेच ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ योजनेसाठी वितरीत केलेल्या एकूण निधीपैकी ५६ टक्के पैसे हे फक्त योजनेच्या जाहिरातबाजीवर खर्च करण्यात आले आहेत. म्हणजेच प्रत्यक्ष योजनेवर खर्च करण्यापेक्षा त्याची माहिती सांगण्यासाठी प्रसारमाध्यमांवरच जास्त खर्च करण्यात आल्याचं निधीच्या खर्चावरून स्पष्ट होतं.