#शेतकरी_वाचवा : परतीच्या पावसाने पिकांना कोंब; संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती
पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीला उशिर होत असल्यामुळे आणि सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहेत. परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे.
मान्सून संपल्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामाचे नियोजन बिघडले असून, शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विदर्भात सर्वात जास्त पीक हे कपाशी, ज्वारी, सोयाबीनसारखी पीकं घेतली जातात. परंतु, त्या पिकावर गदा आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, शासनाकडे मदतीची मागणी करत आहेत.
खरीप पिकांवरील संकटे थांबता थांबत नाहीय. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. जून-जुलै महिन्यात पावसाची गरज असताना पावसाने दगा दिला. परंतु आता पिके काढण्याची वेळ आली तर पाऊस थांबायचं नाव घेत नाहीय.
सोयाबीन पिके यावर्षीची घ्यावीत किंवा सोडून द्यायाची असा मोठा प्रश्न बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्यांपुढे आहे. अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीकामाचे संपूर्ण वेळापत्रकच या पावसामुळे कोलमडले आहे. हाताशी आलेले पिके सतत पडत असलेल्या पावसामुळे हातातून जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.