महाराष्ट्र भाजपमधील सर्वात ज्येष्ठ खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलीय. मोदींच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपदाची संधी मिळूनही दिल्लीत न रमलेले दानवे पुन्हा महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. गेल्या पावणेपाच वर्षात भाजपनं महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा-लोकसभा निवडणुकीतही यश मिळवलं. मात्र, वादग्रस्त वक्तव्यांमुळेच दानवे अधिक लक्षात राहिले.
ग्रामीण भागाशी नाळ असल्यानं दानवेंकडे कृषी खात्याचं राज्यमंत्री म्हणून कारभार दिला जाऊ शकतो. दानवे हे १९९९ पासून सलग पाचव्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१४ मध्येही त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली होती. मात्र काही काळानंतर लगेचच त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात बोलावण्यात आलं.