...शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे

Update: 2019-05-07 03:49 GMT

निवडणुकांच्या काळात नेत्यांच्या भाषणातून गायब झालेला दुष्काळ पुन्हा एकदा नेत्यांच्या अजेंड्यावर आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन सध्या विरोधकांनी सरकारवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. त्यातच शेवटचे मतदान संपताच शरद पवार यांनी राज्यभरात दुष्काळी दौरे सुरू केल्यानं सरकारला निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती करावी लागली. दुष्काळी दौऱ्यावर असणाऱ्या पवारांनी सरकार दुष्काळ निवारणासाठी काहीच करीत नसल्याचा आरोप केल्यानंतर आजच्या सामनातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे.

काय म्हटलंय सामनात?

- विरोधक दुष्काळाचे राजकारण करू पाहत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

''महाराष्ट्रावर कोसळलेले दुष्काळाचे संकट गंभीरच आहे. मात्र त्यावरून राजकीय पोळ्या भाजणे योग्य नाही. उलट दुष्काळाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन हात केले पाहिजेत. सरकार तर काम करते आहेच, पण विरोधी पक्ष, दानशूर लोक आणि स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनीच सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत. प्रसंग बाका आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात आपण काय काम करू शकतो याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा!'',

अशा शब्दांत त्यांनी दुष्काळावर राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.

विदर्भाची तर अक्षरशः होरपळ सुरू आहे. दुष्काळाची दाहकता तर आहेच, पण परिस्थितीचे गांभीर्य राज्य सरकारला नाही हा विरोधकांचा आरोप राजकीय आहे.

- शरद पवार यांना शेती, पाणी, दुष्काळ यातील ज्ञान चांगले आहे. अनेक वर्षे त्यांच्याही हातात केंद्राची तसेच राज्याची सत्ता होती. मग पाणी व शेती याबाबत त्यांनी कायमस्वरूपी कोणत्या योजना राबविल्या? जलयुक्त शिवाराची योजना सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राबविली आहे, पण आधीच्या सरकारात सगळ्यात मोठा घोटाळा जलसिंचनाच्या योजनांत झाला आहे हे पुराव्यानिशी समोर आले. असं म्हणत पवारांवर निशाणा साधला आहे.

- दुष्काळग्रस्त गावांमध्ये जमीन महसूल करात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा अनेक बाबी सरकारने आधीच केल्या आहेत.

- दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन तेथील चारा-पाण्याच्या टंचाईची माहिती घेऊन तातडीने उपाययोजना करण्याविषयी अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत.

Similar News