एकीकडे भाजपचे नेते विरोधकांवर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी १ हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ५१३ एकर जमिनीचा घोटाळा धस यांनी केला आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्याकील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याविरोधात १ हजार कोटी रुपये घोटाळा केल्याची तक्रार दाखल केली होती. या आरोपा संदर्भात नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी या पत्रकार परिषदेत धस यांच्यावरील आरोप प्रकरणी अनेक कागदपत्रे सादर केली. तसेच या प्रकरणात तपास यंत्रणा योग्यप्रकारे तपास करतील, अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यात मुस्लीम देवस्थानच्या तीन तसेच हिंदू देवस्थानाच्या सात जागा लाटण्यात आल्या आहेत, असा दावा मलिक यांनी केला. यात हिंदू देवस्थानची तीनशे एकर जागा आणि मुस्लीम देवस्थानच्या १३ एकर जागेचा समावेश आहे. देवस्थानांच्या जागांची मालकी बदलता येत नसतानाही ५१३ एकर जमिनीचा घोटाळा झाल्याचा आरोप मलिक यांनी केला. भाजपाचे आमदार सुरेश धस आणि आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपाचे नेते रामाच्या देवस्थानांची जागा बळकावत आहे, असा आरोप मलिक यांनी केला. या प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांनी या आरोपांचा खिल्ली उडवली आहे. मलिकांनी ढगात गोळ्या मारण्यापेक्षा तुमचे सरकार आहे तर चौकशी का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.