23 मे 2019 ला जेव्हा लोकसभा निवडणूकांचे निकाल येत होते, माझ्या व्हाट्सएपवर तीन प्रकारचे मेसेज येत होते. आता दोन प्रकारच्या मेसेजविषयी बोलणार आहे आणि शेवटी तिसऱ्या प्रकारच्या मेसेजविषयी. बहुतांश मेसेज असे होते की
‘’आज देखते हैं रवीशकुमार की सूजी है या नहीं, उसका चेहरा मुरझाया है या नहीं” एकानं तर लिहिलं की त्याला रवीशकुमारला अपमानित होतांना पाहायचं, बुडतांना मरतांना पाहायचं, पंक्चर काढतांना पाहायचंय, कुणीतरी विचारलं की बरनॉल ची ट्युब आहे की पाठवू, कुणी म्हटलं की तुमचा चेहरा पाहायचाय, तेव्हा तुमचा फोटो पाठवून द्या. मी पण सगळ्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. एवढचं नाही तर मी लाईव्ह कव्हरेज करत होतो. तेव्हाही अशा प्रकारच्या मेसेजचा उल्लेखही केला आणि स्वतःवरच हसलो. दुसऱ्या प्रकारच्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की, आजपासून तुम्ही नोकरीच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि पाण्याची समस्या दाखवणं बंद करा. जनता याच लायकीची आहे, बोलणं बंद करा. तुम्हांला वाटत नाही तुम्हीही रिजेक्ट झाला आहात, तुम्हांला विचार केला पाहिजे की, तुमची पत्रकारिताही मोदींना हरवू शकली नाही. मी पूर्वग्रहदूषितपणा ठेवतच नाही. यावरही माझं लिहून झालंय.
2019 चा जनादेश माझ्या विरोधात कसा आला ? मी गेल्या पाच वर्षांत जे लिहिलंय, बोललोय त्याचीही कसोटी लागली होती का ? ज्या लोकांचं दुःख आम्ही दाखवलं, ते चुकीचं होतं का ? मला माहिती होतं की युवक, शेतकरी आणि बँकांमध्ये गुलामासारखं काम करणारी लोकं ही भाजपचे समर्थक आहेत. ते ही माझ्याशी कधी खोटं बोलले नाहीत. सर्वात पहिले किंवा नंतरही नरेंद्र मोदींचे समर्थक असल्याचंच ते सांगत होते. मी याच आधारावर त्यांच्या समस्या नाकारल्या नाहीत के ते मोदी समर्थक आहेत. त्या दाखवल्या यासाठी की त्या समस्या वास्तविक होत्या. आज एकही खासदार सांगू शकत नाही की त्यांनी पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांना नोकरीचं नियुक्तीपत्र मिळवून दिलंय. मी चालवलेली ‘’नोकरी सीरीज’’ च्या मालिकेमुळे दिल्लीपासून ते बिहारपर्यंत लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रं मिळालीत. कित्येक परीक्षांचा निकाल लागू शकला. नियुक्तीपत्र मिळालेल्यांपैकी अनेकांनी माझी माफी मागितली, की त्यांनी मला शिव्या दिल्या होत्या. माझ्याकडे शेकडो पत्रं आणि मेसेजचे स्क्रीन शॉट्स आहेत ज्यामध्ये लोकांनी मला शिव्या दिल्या होत्या, त्याविषयी त्यांनी माफीही मागितली आहे. यापैकी कुणीही हा पुरावा देऊ शकत नाही की मी कुणालाही मोदींना मत देऊ नका, असं सांगितल्याचा. हा हे नक्की सांगितलं होतं की, तुम्ही मनापासून मत द्या, मत दिल्यानंतर नागरिक बना.
पन्नास हजार पेक्षा अधिक लोकांना नोकरीचं नियुक्ती पत्र मिळवून दिल्याचं जे यश आहे, ते मी माझ्या छातीवर लावून ठेवेल की, मोदी समर्थकांनी मला अपमानित केल्याचं ते प्रतिक आहे. कारण ते मला नाही तर त्या मोदी समर्थकांना अपमानित करतील ज्यांनी मला त्यांच्या समस्यांसाठी संपर्क केला होता. नोकरी मालिकेचाच परिणाम म्हणून प्रचंड बहुमतातील मोदी सरकारलाही रेल्वेमध्ये लाखो पदांसाठी नोकरीची जाहिरात काढावी लागली. त्याला मुद्दा बनवण्यात आला. तुम्ही बघा की, गेल्या पाच वर्षांत रेल्वेमध्ये किती पदांसाठी नोकरीची जाहिरात आली आणि शेवटच्या वर्षात किती जागांसाठी जाहिरात आली. नोकरीची मागणी गोदी मीडिया करत होता का की, रवीशकुमार करत होता ? प्राईम टाईम मध्ये मी हा विषय दाखवला. रेल्वेविषयक मालिकेमध्ये स्वांतत्र्य सेनानी एक्सप्रेस सारख्या रेल्वे या काही वेळेसाठी का होईना वेळेवर धावण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे मोदींना विरोध होता का ? बिहारमधील महाविद्यालयात तीन वर्षांच्या कला शाखेच्या पदवीसाठी पाच वर्ष संघर्ष करणाऱ्या युवकांच्या प्रश्नावर बोलणं म्हणजे मोदींना विरोध होता का ?
या पाच वर्षात मला कोट्यवधी लोकांनी वाचलं. हजारोंच्या संख्येनं ऐकलं. टीव्हीवर पाहिलं. बाहेर भेटले तर गळाभेट घेतली. प्रेम-स्नेह दिलं. त्यात मोदी समर्थकही होते, संघाचे लोकंही होते आणि विरोधी पक्षाचीही लोकं होते. त्यात भाजपचीही लोकं होती ते चुपचाप येऊन माझं अभिनंदन करत होते. मला एक गोष्ट समजली ती अशी की, मोदी समर्थक असो की मोदी विरोधक गोदी मीडिया आणि पत्रकारितेतला फरक त्याला समजतो. कारण ...
गोदी मीडियाचे अँकर मोदींच्या लोकप्रियतेच्या आडून माझ्यावर टीका करतात, त्यामुळं मोदी समर्थकाकडे गप्प बसण्याशिवाय पर्याय नसतो. भारतासारख्या देशात प्रामाणिक आणि नैतिक होण्यासाठी सामाजिक आणि संस्थात्मक अशी व्यवस्थाच नाहीये. इथं प्रामाणिक होण्यासाठीची लढाई ही एकट्याचीच आहे आणि ती पराभूतच होते. लोकं उपहासानं विचारतात की कुठं गेला सत्यवादी रवीशकुमार. कुठं गेले पत्रकारितेवर बोलणारे रवीशकुमार. माझ्यात कमतरता आहे. मी आदर्श नाहीये, तसा दावाही कधी केला नाही. मात्र, जेव्हा तुम्ही म्हणता की, तुम्हीही त्याच पत्रकारितेचं तत्त्व, महत्त्व पुन्हा सांगत असता, मी किंवा माझ्यासारखे पत्रकार तेच तर सांगतात.
मला माहिती होतं की मी ज्या व्यवसायात आहे तिथं मी पराभूत होण्यासाठीची लढाई लढतोय. इतक्या मोठ्या सत्तेविरोधात, भांडवलशाही कॉर्पोरेटविरोधात लढण्याची ताकद फक्त महात्मा गांधींमध्ये होती. मात्र, जेव्हा मला वाटलं की, माझ्यासारखे कित्येक पत्रकार स्वतंत्रपणे कमी आर्थिक मोबदल्यामध्ये पत्रकारिता करत आहेत, तेव्हा मला वाटलं की मला आणखी जास्त काम करावं लागेल. मी हिंदीभाषिक वाचकांसाठी दररोज सकाळी इंग्रजीतून अनुवादित मजकूर लिहायचो तो मोदी विरोधासाठी नाही तर हिंदीचा वाचक सक्षम व्हावा यासाठी तो प्रपंच होता. त्यात कित्येक तास गेले. मला नेमकं माहित होतं की, मी हे फार काळ एकटा करू शकत नाही. त्यात मोदी विरोधाचा गंध नव्हता तर माझ्या व्यवसायाविषयी असलेलं अधिकची प्रेमभावना त्यामागे म्हणूनच सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्याच व्यवसायावर प्रश्न उपस्थित करण्याची मोठी जोखीम होती, ती म्हणजे स्वतःसाठी रोजगाराच्या संधी गमावणं. तरीही आयुष्यात काही वेळेसाठी ते ही करून बघितलं. अशा गोष्टींचं स्वतःचं असं एक टेन्शन असतं, जोखीम असते, मात्र यातून जे शिकायला मिळतं ते दुर्मिळच. गुडीगुडी प्रश्न विचारून मी मोदी समर्थकांमध्ये लपू शकतो, मात्र तुम्हा वाचकांसमोर मी येऊ शकत नाही.
मी धर्मांशक्तींविरोधात सर्वांसमोर बोललो. आजही बोलणार. तुमच्यामध्ये धार्मिक आणि जातीयतेचा पूर्वग्रदूषितपणा आहे. तुम्ही मशीन होत चाललात. मी पुन्हा सांगतोय की धार्मिक आणि जातीयतेचा पूर्वाग्रहाचा प्रभाव असलेली धार्मिकता तुम्हांला एक दिवस मानवी बॉम्ब बनवेल. स्टुडिओमध्ये नाचणाऱ्या अँकरला पाहून तुम्हांलाही वाटत असेल की ही पत्रकारिता नाहीये. बँकांमध्ये गुलामासारखं काम करणाऱ्या शेकडो महिला अधिकाऱ्यांनाही त्यांचा गर्भ पडण्यापासून ते शौचालयाची भीती दाखवून काम करण्यासंदर्भातलं पत्र काय मला मोदींचा विरोध करण्यासाठी त्यांनी लिहिलं होतं का ? त्यांची पत्रं आजही माझ्याजवळ आहेत. मी त्यांच्या प्रश्नांना आवाज दिला आणि कित्येक बँकांच्या शाखांमध्ये महिलांसाठी स्वतंत्रपणे शौचालयं बनवण्यात आली. मी मोदींचा अजेंडा नाही चालवला. ते माझं कामंही नव्हतं. जर तुम्ही माझ्याकडून याच अपेक्षा ठेवत असाल तर तेव्हाही मी हेच सांगेल की एक वेळ नाहीतर शंभर वेळा विचार करा.