वाचकांना तुम्ही निकृष्ठ का समजता ?

अलीकडच्या काळात मेनस्ट्रीम आणि पोर्टल पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांची उत्कंठा वाढवण्यासाठी आकर्षक हेडिंग देण्याची स्पर्धा लागली आहे याचा सडेतोड समाचार घेतला आहे प्रमोद राजेभोसले यांनी....

Update: 2021-07-24 12:23 GMT

मी बोलतो आहे ते विविध प्रतिष्ठीत प्रमुख मराठी वर्तमानपत्रांच्या व टि.व्ही.चॅनेल्सच्या न्यूज पोर्टलबद्दल.अर्धवट कॅप्शन देऊन, उत्सुकता चाळवून टाकतील अशी टायटल्स देऊन तुम्ही वाचकांची गर्दी खेचता म्हणजे तुम्हाला तसे वाटते तुम्ही काहीतरी वाचनीय देता आहात.बहुतांश गर्दी तुम्ही दिलेली बातमी न वाचता बातमीवरच्या कॉमेंटस् वाचायला आलेली असते. आणि त्यात बातमीपेक्षा तुमच्या बातमीच्या दर्जावरून तुम्हाला ठोक-ठोक ठोकलेले असते.पण तरीही तुम्ही सुधारण्याचे नाव काही घेत नाही. अनेकदा संपादकांना म्हणजे त्या वर्तमानपत्राच्या मुद्रित आवृत्तीच्या संपादकांना शिव्यांची लाखोली वाहीली जाते.बिचाऱ्यांचा काहीच दोष नसतो.

मुळात हे असे का होत असावे ?

याला काही समज-गैरसमज, अर्धवट समज, नव्याच्या पाठीमागे पळण्याची अर्धवट मानसिकता कारणीभूत आहेच. त्याचबरोबर आपण स्पर्धेत मागे पडू ही भीतीही असावी नाही आहेच. याविषयावरचे माझे आकलन मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातील सगळेच बरोबरच असेल असे नाही मात्र त्यातील काही मुद्द्यांचा विचार होणे माध्यम संस्थांनी काही दशके खपून तयार केलेल्या विश्वासर्हातेकरीता (शुध्दलेखन चुभूद्याघ्या) महत्वाचे असेल.

सोशल मिडीया हे नवीन तंत्रज्ञान जसे आले तसे अनेक माध्यम संस्थांमध्ये हा विभाग तंत्रज्ञान समजणाऱ्यांच्या हातात दिला गेला आणि त्यात अनेक वरिष्ठ, संपादक यांना (आणि चांगल्या कंटेटला) बाजूला ठेवले गेले,ठेवले जात आहे. खरी घोडचूक इथेच झाली. नवीन तंत्रज्ञान म्हणजे नवा वाचक वर्ग, तरूण वाचक, कमी वेळ असलेला वाचक, झटपट चटपटीत वाचणारा वर्ग अशी काहीतरी समजूत सगळ्याच माध्यमांच्या चालकांनी करून घेतली. वस्तूत: माध्यमे म्हणून आपण कंटेटच्या व्यवसायात आहोत आणि वर्षानुवर्षे आपण आपली मूल्य जपत(इथे हसायलाच पाहीजे असे काही नाही), विश्वासर्हाता जपत मजकूर वाचकांना देत होतोच. आणि त्यामध्ये कंटेट इज किंग Content is king हे सुत्र जपत होतो.

आजही ते सुत्र आहेच फक्त तंत्रज्ञानाच्या किंवा नव्या विश्लेषन फंड्याला जागून आपण विदुषकाला किंग मानतो आहोत, हे मात्र माध्यम चालकांच्या लक्षात आले नसावे. वाचकांना खेचून आणण्याची ताकद अशा मांडणीत असते, वाद होतील, वाचक आक्रमकपणे नकारात्मक व्यक्त होण्यासाठीच असा कंटेट असतो. असाही युक्तीवाद बरीच तज्ञ मंडळी करीत असतात. सोशल मिडीयातील ती strategy असते असे ते मानतात. इथेच माध्यमे फसत आहेत. कारण इथे ब्रॅण्डची नकारात्मक इमेज तयार व्हायला सुरवात होते. ब्रॅण्ड तयार करणे हे किती महागडे प्रकरण असते, हे यांच्या गावीच नसते. फेसबुकवर अशा न्यूज पोर्टलवर चक्कर टाकली कि ब्रॅण्डचा किती उघड उघड अपमान आपण आपल्याच हाताने करतो, हे (नव-तंत्रज्ञान स्नेही)माध्यमकर्मींना कळेल. ब्रॅण्ड बद्दल मोठ्या कंपन्या किती संवेदनशीलपणे आपला ब्रॅण्ड जपतात, हे आधी शिकण्याचीही गरज आहे. वरती म्हटल्या प्रमाणे अनेक संस्थामध्ये तंत्रज्ञान समजणाऱ्यांच्या हातात हा विभाग असल्याने व त्यांना व्यवस्थापनाने डोक्यावर घेतलेले असल्यामुळे बहुतांशी संपादकही त्याकडे कानाडोळा करीत असावेत (करतात असेच वाचावे).

सोशल मिडीयावर वाचक काहीतरी भंकसगिरीच वाचतात असे माध्यमांनी स्वत:च ठरवून टाकले. आम्हाला इतके निकृष्ठ तुम्ही कुठल्या आधारावर ठरवता ? वाचक म्हणून आम्हाला तुम्ही सकस आणि सकसच मजकूर द्यायला हवा. फारतर तो तुम्ही नव्या रचनेत त्यात थोडेफार हलकेपणा आणा. पण म्हणून 'करीना व तैमुर, पत्नीने केले अमूक म्हणून....., जाणून घ्या काय आहे रहस्य....'वगैरे छापाच्या बातम्या कधीतरी ठिक आहे. पण तुमचा दर्जा घसरला म्हणून वाचकांनाही त्याच पातळीवर तुम्ही का आणता आहात ? नवीन पिढीच्या हाती सुत्रे जरूर द्या पण म्हणून माध्यम क्षेत्राचा आत्मा जो कि कंटेट आहे तो कशाला विसरता. तंत्रज्ञान बदलले म्हणून वाचकाची अभिरूची बदलली हे सरसकट गृहीत धरणे चुकीचे आहे. आपण बदल म्हणून हॉटेलात जातो म्हणून काही एकदम अति-वेगळे पदार्थ आपल्यासमोर येत नाही. किंवा नवीन तंत्रज्ञान आहे म्हणून पदार्थ काही वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजे पेस्टच्या किंवा टॅबलेटच्या स्वरूपात येत नाही. माध्यमांनी आत्मा म्हणजे परत content is king हे विसरता कामा नये.

नवतंत्रज्ञानवाली मंडळी फक्त कंटेटचे वाहक असू द्या..

कंटेट निर्मिती-निवडीचे काम त्यांनाच करू द्या ज्यांनी खोलात जाऊन काम केलेले आहे. वाचकांची नाडी ज्यांना समजली आहे त्यांनाच स्वातंत्र्य द्या. तंत्रज्ञानातील तज्ञ हा कंटेट मधील तज्ञ असलेच असे नाही हे स्वीकारा. त्या तंत्रज्ञान तज्ञाला फक्त सोशल मिडीयावर कंटेटच्या प्लेसमेंटचे काम करू द्या. अन्यथा एका पिढीने कष्टाने उभे केलेले विशेषत: मुद्रित माध्यमांमधील ब्रॅण्ड रसातळाला किंवा ब्रॅण्डच्या नकारात्मक इमेजचे पाप न्यूज पोर्टलच्या माथ्यावर असेल हे नक्की. याकरता सध्याच्या मुख्य माध्यम विभागांच्या संपादकांनी आक्रमक होणे आवश्यक आहे. दर्जेदार कंटेटच वाचकांकडे जाईल याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. न्यूज पोर्टल हे फक्त वाहक असतील अशी भूमिका जोपर्यंत घेत नाही, तो पर्यंत आम्हा वाचकांना 'मित्रानेच केले कांड आणि मग....'वगैरे वाचत बसायला लागेल. तुमच्या ब्रॅण्डचेही कांड होत राहील हे तुम्ही विसरता कामा नये. उडत्या-फिरत्या, चटपटीत बातम्यांमुळे पेज व्हीव वाढतात वगैरे बढाया तंत्रज्ञान स्नेही मंडळी नक्कीच वेगवेगळ्या तक्त्यांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन करीत असणार. प्रश्न आहे या अशा कंटेटमुळे रेव्हेन्यू खरेच वाढला कि आहे त्या मूळ ब्रॅण्डची अधिक नाचक्की झाली. फेसबुकवर आपण काही माध्यमांच्या बातम्या बघितल्या (वाचायचा काही प्रश्नच नाही) व त्यावरचे कॉमेंटस् वाचले तर वाचक कंटेट जनरेटरपेक्षा किती सुज्ञ आहे व त्याला काय नको आहे हे लगेचच कळेल. त्याकरीता कुठल्या रिसर्च फंड्याची गरज नाही.

भाषिक माध्यमांनी वाचकांना फारच हलक्यात घेतल्याचे दिसते. इथे मी मराठी माध्यमांबद्दल बोलतोय,कारण मला इतर प्रादेशिक भाषा येत नाही आणि त्यामुळे तेथील मजकूर वाचण्याचा प्रश्नही येत नाही. इंग्रजीमधील The Wire , The Print वाचकांना सकस मिळेल याचीच काळजी घेतात. मराठीत देखील साधना साऱखे साप्ताहिक त्यांच्या कर्तव्य साधना ह्या पोर्टलवर मेंदुला खुराक देतात.

शुध्द बीजापोटी....हे आपण विसरतो आहोत...

सृदृढ पिढी तयार करायची असले तर आपल्याला सकसच द्यावे लागेल. चटपटीत म्हणजे जंक फूड सारखे फक्त खाण्याचा आनंद मिळेल पण पोषणमूल्य काहीच नसते तसे होऊ नये याची काळजी माध्यमांमधील जबाबदार (समजूतदार असे वाचावे) मंडळींनी घ्यायला हवी. सृजनशील अशी पुढची पिढी घडविण्याकामी माध्यमांची भूमिका मोठी असते.असेल. शेवटी तुकोबा म्हणतात तसे, शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे विसरून चालणार नाही. चकचकीतपणाच्या स्पर्धेत व गोरी गोमटी दाखवण्याच्या नादात आपण अपरिपक्व समाज जन्माला घालतो, हे माध्यमांना ध्यानात घ्यायला हवे.

अति-महत्वाचे - या संपूर्ण मांडणीत जुने ते सोने असा सुर आळविण्याचा प्रयत्न नाही ना कोणा व्यक्ती(व तंत्रज्ञान)विषयी आकस नाही.तर जुने व नव्याचा सुयोग्य संगम होऊन सुंदरता वाचकांच्या वाट्याला यावी, अशा अपेक्षाकरीता हा लेखनप्रपंच आहे.

(आम्ही बऱ्याच जणांनी लै कष्टांनी लै ब्रॅण्ड उभे केले रे म्हणून जीव तुटतो. बाकी वाचक म्हणून 'आलीया भोगाशी असावे सादर' आहेच आपल्या वाट्याला....)

@ प्रमोद राजेभोसले

Similar News