कोरोना काळात ऑक्सिजन व्यवस्थापन हाताळण्यात मोदी सरकार नापास, संसदीय समितीचा ठपका

Update: 2022-09-13 07:00 GMT

कोरोना संकट आता कमी झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे व्यवस्थापन हाताळण्यात मोदी सरकारने हलगर्जीपणा केला असा ठपका संसदीय समितीने ठेवला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीने यासंदर्भात सरकारच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूंबाबत चौकशी करावी आणि मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यात यावी असे आदेश या संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

"कोरोना संकट काळात सरकारने केलेल्या हलगर्जीपणाबाबत आम्ही प्रचंड नाराज आहोत. तसेच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे विशेषत: दुसऱ्या लाटेत झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा शोधावा असे आदेश समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षेखाली असलेल्या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांशी समन्वय साधून ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा शोधून काढावा. त्यामुळे सरकारने यामध्ये किती हलगर्जीपणा केला आहे याची खरी माहिती समोर येईल तसेच इथून पुढच्या संकट काळात सरकारने कसे काम केले पाहिजे याचे धोऱण ठरवताना या माहितीचा उपयोग होईल असेही संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. कोरोना संकट काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल झाले, अनेक हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकत नव्हता, याबाबत माध्यमांनीही वारंवार वृत्तांकन केले होते, पण तरीही सरकारने याबाबत तातडीने पावलं उतलली नाही, असा ठपकाही या समितीने ठेवला आहे.

Similar News