संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईचा इशारा

Update: 2022-06-24 07:40 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी बहुमताचा दावा केला आहे. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी अपेक्षित संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आता ही कायदेशीर लढाई आहे. त्यामुळे काही नियम आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. त्यामुळे काय होतंय ते पाहू, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचा आकडा कमी झाला आहे. मात्र लोकशाही आणि बहुमत हे आकड्यांवर चालतं आणि त्यांच्याकडे 40 असो की 140 हे महत्वाचं नाही. कारण आकडे खूप चंचल असतात. त्यामुळे ज्यादिवशी आमदार मुंबईत येतील तेव्हा आम्ही बहुमत सिध्द करू, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकजूटीने काम करत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बंडखोर आमदारांना मुंबईत परत यावेच लागेल असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला. त्यावरून नारायण राणे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता धमकी दिली. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन रंगत आणली. तर या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आसाममध्ये असलेल्या आमदारांना मुंबईत यावेच लागेल. त्यावेळी त्यांना कोणता भाजप नेता मार्गदर्शन करील, अशी धमकी दिली होती. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मात्र या धमकीवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त करीत ही भाजपची अधिकृत भुमिका आहे का? अशी विचारणा करत संताप व्यक्त केला.

Full View

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांना लोक धमक्या देत आहेत. तर या लोकांनी पुर्वी बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि मला धमक्या दिल्या आहेत. त्या धमक्या देऊ द्या. पण आता त्यांचा माज शरद पवार यांना धमक्या देण्यापर्यंत पोहचला आहे. ज्या शरद पवार यांच्याविषयी देशभरात आणि जगभरात आदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आदर करतात. त्या शरद पवार यांना धमकी देणं ही भाजपती संस्कृती आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तसंच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असंही राऊत यावेळी म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी राज्यातील घडामोडींवर पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये शरद पवार म्हणाले की, शिवसेना आमदारांना राज्यात यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंत त्यांना आसाम आणि गुजरातचे नेते इथं येईन मार्गदर्शन करतील असं मला वाटत नाही. एवढंच नाही तर तिकडे गेलेल्या आमदारांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अँटी डिफेक्शन एक्टच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना परिणाम भोगावेच लागतील. याबरोबरच या आमदारांना मतदारसंघातही परिणाम भोगावे लागतील. त्यामुळेच काहीतरी कारण द्यायचं म्हणून हे निधी मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे, असं शरद पवार म्हणाले होते.

नारायण राणे यांची धमकी

राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यावर बोलताना शरद पवार यांनी धमकी दिली असे म्हणत नारायण राणे यांनी ट्वीट केले. त्यामध्ये राणे म्हणाले की, शरद पवार या सर्वांना धमक्या देत आहेत. 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, अशी धमकी नारायण राणे यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर देतांना दिली.

Tags:    

Similar News