नामदेव ढसाळ : एका ज्वालामुखीची जन्मकथा

Update: 2026-02-15 08:30 GMT

महाराष्ट्रातल्या पुण्याजवळ पूर या गावी जन्मलेला गावकुसाबाहेरल्या वस्तीत वाढलेल्या मुलानं पुढे अख्ख्या जगाला अन् गावाला ओळख सांगितली, ती एक बंडखोर आक्रमक नेता. एका संघर्षमयी संघटनेचा जन्मदाता संस्थापक अन् जागतिक कीर्तीचा मराठी साहित्यविश्वात सुवर्णाक्षरानं अक्षरवाड्‌मय निर्माण करणारा कवी म्हणून ।

नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७. पूर हे जन्मगाव धर्मांतराची चळवळ दूरच पण बलुतेदार पद्धत असल्यामुळे छोटा नामदेव 'जोहार-येसकराला भाकर येऊ द्या' अशी हाळी घालत भाकरीही मागत हिंडे. त्यामुळे दलित पणातली दुःख-वेदना ही अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेगत आयुष्यभर धगधगत राहिली त्याच वेदनेचे शब्द बनवले न् त्याच शब्दांचे हत्यार करून तो पुढे राजकारणात उतरला.


कामधंद्यासाठी वडील मुंबईला फोर्टमधल्या मटण दुकानात कामासाठी आलेले. छोट्या नामदेवच्या आत्रंगी खट्याळपणाला अन् शाळेला दांड्या मारण्यापायी आई वैतागलेली सर्वच आयांसारखी मारून झोडून ती शाळेला पाठवायची.

जातपात पाळणारे मारकुटे मास्तर बदलल्यावर मात्र छोटा नामदेवही बदलला, नवीन मास्तरांनी शब्दांची गोडी लावली. पुढे आई बरोबर नामदेवही मुंबईला आल्यावर ताडदेवाच्या कोकाटे मास्तरांनी चांगल्या काव्य गद्यपद्याचीही ओळख दिली.

तर ढोरचाळ कामाठीपुऱ्याने अधोविश्वाची ओळख दिक्षा दिली, एका बाजूला पौगंडावस्थेतल्या प्रेमप्रकरणात चांगलेच पोळून निघाल्यावर नामदेवने शाळेला रामराम ठोकून एकीकडे काव्य-एकीकडे टॅक्सी चालवणं, नशा करणं तर दुसरीकडे प्रजा-समाजवादी लोकांमध्ये राहून राजकारणाची संथा घेणे सुरू केले. ताडदेवचे जनता केंद्र, जॉर्ज फर्नाडिस, सभोवतालचे अराजक, वाढता दलितांवरील अन्याय अत्याचाराचा क्षोभ या सर्वांचे एकत्र रसायन अंतःकरणात धगधगत राहालेले, त्यातच दलित समवयस्क, समविचारी धडपडी मित्रमंडळी गोळा झाली आणि दलितांवरील अमानुष अन्याय अत्याचाराला तोंड देण्यासाठी स्वतःची संघटना चळवळ उभारणे ही काळाची गरज नामदेवने ओळखली व 'दलित पँथर' या नव्या संघर्षमयी क्रांतिकारक घटना भूमिका असलेली संघटना जन्माला घातली.

नामदेव, ज. वि. पवार यांची ही जोडगोळी मेगाफोन उसनेपासने येऊन भाषण करत फिरायचे. नंतर राजा ढाले, अविनाश महातेकर, भाई संगारे हेही सामील झाले. 'लोग आते गये कारवाँ बनता गया' डोक्याला कफन बंधून आंबेडकरी विचार ध्वजाप्रमाणे हातात उंचावून ही झपाटलेली वेडी माणसे महाराष्ट्रात जिथे-जिथे दलितांवर अन्याय होईल, तिथं धावून जात परिणामी 'दलित पँथर' संघटना थोड्या अवधीत नुसतीच मोठी व्यापकच झाली नाही तर तिचा एक दबदबा, दरारा निर्माण आला, पण यानंतरच या तळागाळात पोचलेल्या संघटनेचा धोका ओळखून राजकीय धुरीणांनी प्रसिद्धी, पैसा व एकमेकांबद्दल अविश्वास पेरून दिल्यामुळे अल्पावधीतच 'दलित पँथर'ला फुटीचे ग्रहण लागले.

त्या दरम्यान नामदेव ढसाळ कम्युनिस्ट आहे, अशी वावडी उठवून काही लोकांनी नामदेवला राजकारणातून उठवण्याचे कारस्थान रचलेच, पण नामदेव सपत्निक पुण्यात पँथरची बांधणी करण्यास गेला असताना त्याच्या आईला 'नामदेव गेला, मारलं त्याला' अशी अफवा पोचवल्याने आई वेडी झाली. त्यात पैसा नसल्याने सांसारिक फरफट. त्यातच कविता लिहिणे सुरूच होते.

कवी आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे जीवन म्हणजे एक शोकांतिकाच असते. त्यात एकच नाही तर पूर्ण कुटुंबच भरडले जाते. पण या जात्यातल्या भरडण्यातही नामदेव हसतच होता आणि भाषणात आग पेरत होता, कितीही काहीही झाले तरी तो समष्टीसाठी देहाचा ध्वज करून या जातीवर्गविहिन समाज लक्ष्यातून माघार घेणार नव्हता. त्याचे ते एक मिशन होते. ध्येय होते आणि त्यासाठी त्याने आयुष्यभर किंमत मोजली, राजकीय धुरीणांनी त्याला वापरून घेतले. पण आपल्या राजकीय वजनाचा त्याने कधीच फायदा करून घेतला नाही. पण दुसरीकडे साहित्यिक मराठी परदेशातही त्याच्या कवितांना लोकांनी डोक्यावर घेतले. अनेक पुरस्कार सन्मान व जागतिक साहित्य परिषदेत त्याला व त्याच्या कवितांना नावाजले गेले

नामदेव अतिशय निखळ आणि नितळ मनाचा उदारमतवादी व दुसऱ्याच्या भावना जाणणारा, मंत्री ते रस्त्यावरला मजूर या दोघांनाही सारख्याच मनाने मापणारा, कार्यकत्यांसाठी तो कल्पवृक्ष अन् ज्ञानेशांसारखी माऊली होऊन सावली व्हायचा, त्याच्या घरी जाणाऱ्यांना कधी त्यानं रिकाम्या पोटानं, मुक्या ओठांनी पाठवलं नाही, जरी त्याच्या खिशात नोटा नसल्या तरी, भरपूर माणसं अवतीभवती ही नामदेवची श्रीमंती. रसिक आणि गुणग्राहकही तेवढाच, बर्गमनची फिल्म ते दादबा इंदूरकर मामाचा तमाशा, जहांगिरमधील चित्रं ते पिला हाऊसमधल्या, डब्बा थिएटर पॅराडॉईजमधलं पिटात बसून 'उजाला'मधला शम्मी कपूरचा "मेरा सौ का नोट दे दे कालू" हा डॉयलॉग मारणं त्याला काहीच वर्ज्य नव्हतं, आयुष्याचे सगळे रंगभंग चाखणारा, त्याचं दिलखुल्यस हसणं आणि ओठात प्रचंड प्रेमळ शिवराळ भाषा कलंदर रांगडा लोभस गडी...!

स्त्रियांबद्दल सर्वच पुरुषांना वाटतो तसा लोभ असला तरी तो स्त्रिलंपट केव्हाच नव्हता. "सेक्स न् बाया ही काही चोव्वीस तास विचार करत बसण्यासारखी गोष्ट नाही", "माझ्या जीवनात आलेल्या बाया भाकरीसारख्या आहेत, आवश्यक पण म्हणून मी काही चोवीस तास रवंथ करत नाही."

इव्हन बायकोनं नामदेवला जगजाहीर दूषणं देत पुस्तक लिहिलं तरीही, 'ते तिचं स्वातंत्र्य आहे. मी चळवळीतला माणूस, तिर्च अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारू ? प्रत्येक बाईला आपला नवरा कसा आहे हे सांगण्याचा अधिकार आहे, हे फक्त एक नामदेवच सांगू शकतो.

चालता येणं शक्य नव्हतं तरी व्हीलचेअरवर बसून त्यानं सभा, मिटिंगा घेतल्या, दौरे केले, कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असतानाही तो 'दलित पँथर'चे लेख लिहीत होता. राजकीय निरीक्षक त्याच्या राजकारणाबद्दल काही बोलोत पण शेवटपर्यंत समष्टीचा विचार करणारा एक लोकप्रिय लोकनायक, एक श्रेष्ठ कवी म्हणून त्याला अखेरचा सलाम

- मलिका अमर शेख 

Tags:    

Similar News