PFAS protest April 6 Maharashtra : महाराष्ट्राच्या मातीतील अदृश्य विष: कोकणात PFAS संकटाविरुद्ध जनतेचा एल्गार !

फॉरेव्हर केमिकल्सचा कोकणाला विळखा... महाराष्ट्राचेच नव्हे तर भारतातील पाणी, माती आणि येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य कसे संकटात आहेत सांगताहेत लेखक धनंजय शिंदे

Update: 2026-04-02 09:15 GMT

Invisible poison in Maharashtra महाराष्ट्र आज एका अशा वळणावर उभा आहे जिथे औद्योगिक प्रगती आणि मानवी अस्तित्व यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. आपल्याला औद्योगिक महासत्ता असल्याचा अभिमान वाटतो, पण याच उद्योगांच्या नावाखाली आपल्या निसर्गरम्य कोकणात एक अदृश्य शत्रू शिरला आहे ज्याचे नाव आहे पीफास (PFAS). हे केवळ एक रसायन नाही, तर ही एक अशी विषबाधा आहे जी पिढ्यानपिढ्या नष्ट करण्याची ताकद ठेवते.

येत्या ६ एप्रिल २०२६ रोजी, कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे परशुराम परिसरातील ग्रामस्थांनी लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीत होणाऱ्या पीफास उत्पादनाविरुद्ध एका भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. हा लढा केवळ एका गावाचा किंवा एका तालुक्याचा नाही; हा लढा महाराष्ट्राच्या आरोग्याचा आणि आपल्या संविधानाने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराचा आहे.

पीफास म्हणजे नक्की काय? याला फॉरेव्हर केमिकल्स का म्हणतात?

पीफास ही मानवनिर्मित रसायनांची एक मोठी साखळी आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, यातील कार्बन आणि फ्लोरीनचा बंध इतका मजबूत असतो की तो निसर्गात कधीही तुटत नाही. म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ याला फॉरेव्हर केमिकल्स (कधीही नष्ट न होणारी रसायने) म्हणतात. एकदा का हे रसायन पाणी किंवा मातीत मिसळले की ते हजारो वर्षे तिथेच राहते. हे रसायन शरीरात शिरल्यावर कर्करोग, यकृताचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यास कारणीभूत ठरते. गरोदर महिलांच्या माध्यमातून हे विष गर्भापर्यंत पोहोचते, ज्यामुळे मुलांमध्ये जन्मजात व्यंग निर्माण होऊ शकते. हे रसायन पाण्यातून शेतात आणि तिथून आपल्या अन्नसाखळीत शिरकाव करते.

भारत : घातक उद्योगांचे नवीन डंपिंग ग्राउंड?

आज अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांनी पीफासच्या वापरावर आणि उत्पादनावर कडक निर्बंध लादले आहेत. तिथे या कंपन्यांवर अब्जावधी डॉलर्सचे दंड आकारले जात आहेत. मग या कंपन्या कुठे जाणार? उत्तर आहे, भारत आणि इतर विकसनशील देश, जिथे कायदे शिथिल आहेत किंवा त्या विषयावर अजून कोणतेही धोरणच नाही.

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत चालणारे पीफास उत्पादन हे याच उद्योगांच्या स्थलांतराचे उदाहरण असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रगत देशांनी नाकारलेले तंत्रज्ञान आणि रसायने आपल्या कोकणात का आणली जात आहेत? आपण आपल्या निसर्गाचा बळी देऊन पाश्चिमात्य कचरा का स्वीकारायचा?

प्रशासनाचे भयानक मौन आणि आरटीआयचा धक्कादायक खुलासा

या संदर्भात माहिती अधिकारांतर्गत (RTI) प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्याचे उत्तर धक्कादायक आहे. MPCB ने लेखी स्वरूपात मान्य केले आहे की भारतात किंवा महाराष्ट्रात पीफास रसायनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्यावर बंदी घालण्यासाठी सध्या कोणतेही विशिष्ट धोरण, अधिसूचना किंवा परिपत्रक अस्तित्वात नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे, महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी पीफासचे उत्पादन होते, याची माहिती मागणारा आमचा RTI अर्ज अजूनही प्रलंबित आहे. प्रशासन ही माहिती का लपवत आहे? जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या उद्योगांची यादी जाहीर करण्यास सरकारला कसली भीती वाटते?

प्रमुख आणि तांत्रिक मागण्या

कोकणातील जनता केवळ निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो नाही; त्यांच्या मागण्या या तांत्रिक आणि कायदेशीर पायावर आधारित आहेत:

१. तात्काळ उत्पादन बंदी: लक्ष्मी ऑरगॅनिकमधील पीफासचे उत्पादन जोपर्यंत त्याचे पूर्ण पर्यावरणीय ऑडिट होत नाही, तोपर्यंत तात्काळ बंद करण्यात यावे.

२. केंद्रीय अधिसूचना: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ अंतर्गत पीफासला तात्काळ धोकादायक पदार्थ (Hazardous Substance) म्हणून अधिसूचित करावे.

३. जागतिक मानकांचा स्वीकार: भारताने पिण्याच्या पाण्यातील पीफासची मर्यादा युरोपियन युनियनच्या मानकांनुसार (०.१ मायक्रोग्राम प्रति लिटर) निश्चित करावी.

४. तंत्रज्ञान ऑडिट: या कंपन्यांनी आयात केलेल्या यंत्रसामग्रीचे निष्पक्ष ऑडिट करावे. जुने आणि प्रदूषकारी तंत्रज्ञान इथे वापरले जात आहे का, याची तपासणी व्हावी.

५. जनसुनावणी: या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांची तात्काळ जनसुनावणी आयोजित करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.

छत्रपतींच्या महाराष्ट्राला आता जागृत व्हावे लागेल

हा लढा केवळ लोटे परशुरामपुरता मर्यादित नाही. जर आज आपण इथे शांत बसलो, तर उद्या पूर्ण कोकण आणि त्यानंतर अख्खा महाराष्ट्र या विषारी विळख्यात अडकेल. ही लढाई महाराष्ट्र धर्म जपण्याची आहे. आपल्या मातीचे, पाण्याचे आणि येणाऱ्या पिढ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय संविधानाचे कलम २१ आपल्याला सन्मानाने आणि प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार देते. आता वेळ आली आहे की सरकारने या हक्कांची अंमलबजावणी करावी.

एक आवाहन : ६ एप्रिलच्या मोर्चात सहभागी व्हा

येत्या ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता परशुराम एजन्सी एक्सेल फाटा ते लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मी महाराष्ट्रातील सर्व जागरूक नागरिकांना, पर्यावरण प्रेमींना, विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना विनंती करतो की, या मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर करा. जर आपण आज आवाज उठवला नाही, तर उद्याचे पाणी पिण्यालायक उरणार नाही आणि आपली मुले आजारांच्या विळख्यात जन्मतील. हा केवळ एक मोर्चा नाही, तर हे आपल्या अस्तित्वाचे आंदोलन आहे.

विषाची फॅक्टरी हटवा, कोकण वाचवा !

पीफास हटवा, आरोग्य वाचवा !

धनंजय रामकृष्ण शिंदे (X / Twitter) : @Dhananjay4INC. Mobile No. 98676 93588

#StopTheDump #SaveKonkan #CleanWaterRights PFASFreeIndia महाराष्ट्रांगइंस्टंपफेस


PFAS in Maharashtra, PFAS contamination India, Forever chemicals India, Lote Parshuram pollution, Konkan environmental crisis, Maharashtra pollution news, toxic chemicals in water India, industrial pollution Maharashtra, PFAS health effects, groundwater contamination India,PFAS cancer risk, forever chemicals health effects, toxic water health risks India, chemical contamination food chain, PFAS pregnancy risks, water pollution diseases India, liver disease chemical exposure, immune system damage chemicals

Similar News