global health crisis war : युद्ध फक्त सीमांवर नाही, मध्यपूर्व संघर्षामुळे जागतिक आरोग्य संकट, भारतावरही परिणाम

युद्धाचा भारतीय आरोग्य सेवेवर आणि रुग्णावर होणारा परिणाम सांगताहेत डॉ. सुरेश शेळके

Update: 2026-04-02 10:12 GMT

war impact on medical supply chain  मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष हा केवळ राजकीय किंवा लष्करी प्रश्न नसून, एक गंभीर सार्वजनिक आरोग्य संकट बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 5 मार्च 2026 रोजी, व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, या संघर्षाचा परिणाम लाखो लोकांच्या आरोग्यावर, आरोग्य व्यवस्थांवर आणि मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांवर होत आहे. या संघर्षामुळे अनेक देशांमध्ये मृत्यू आणि जखमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. इराण, लेबनॉन, इस्रायल आणि इतर आखाती देशांमध्ये हजारो लोक जखमी झाले असून शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र काम करत असूनही संसाधनांची कमतरता जाणवत आहे. विशेषतः चिंतेची बाब म्हणजे आरोग्य सेवांवर थेट हल्ले होत आहेत. रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य केंद्रे हे युद्धाच्या निशाण्यावर येत असल्याने रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांनुसार आरोग्य सेवा सुरक्षित ठेवणे अत्यावश्यक असतानाही अशा हल्ल्यांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापित होत आहेत. हजारो कुटुंबांना आपली घरे सोडावी लागत आहेत आणि ते सुरक्षिततेच्या शोधात स्थलांतर करत आहेत. विस्थापित लोकांना स्वच्छ पाणी, अन्न आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्ध यांच्यामध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार झपाट्याने होतो. परिणामी. आरोग्य व्यवस्थेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. औषधांचा तुटवडा, आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचीa अपुरी संख्या यामुळे अनेकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. अनेक रुग्णालये पूर्ण क्षमतेने भरलेली असून काही ठिकाणी आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत आहे तर काही ठिकाणी आरोग्यसेवा पुर्णपणे कोलमडली आहे. याशिवाय, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक गंभीर धोका म्हणजे अणुऊर्जा केंद्रांवर होणारे हल्ले. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होऊन त्याचा मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

या सर्व परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने सर्व संबंधित देशांना संघर्ष कमी करण्याचे, आरोग्य सेवांचे संरक्षण करण्याचे आणि मानवतावादी मदत सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे. कारण आरोग्य व्यवस्था कोसळली तर त्याचा परिणाम केवळ युद्धग्रस्त भागापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम जागतिक स्तरावरही होत असतात.

युद्धाचा India healthcare भारतीय आरोग्य सेवेवर आणि रुग्णावर होणारे परिणाम:

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण युद्धाचा परिणाम आता भारतातील आरोग्य क्षेत्रावरही दिसू लागला आहे. आशा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य क्षेत्रात कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट चाळीस वर्षापासून काम करत आहे. हे काम करता असताना आम्ही दुष्काळाचा, कोविड महामारीचा आरोग्य सेवा, रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबिय यांच्यावर होणारे परिणाम खूप जवळून पाहिले आहे. आता युद्धाचे परिणाम भारतातील आरोग्य क्षेत्रातही दिसू लागले आहेत. ग्रामीण भागात इंधना अभावी बसेस बंद पडल्या आहेत. डिझेल पेट्रोलसाठी वाहनांची लांबच लांब रांगा आहेत. रिक्षाचालक इंधन मिळत नाही म्हणून संप करू लागले आहेत. परिणाम आजारी रूग्णाला हॉस्पिटलपर्यंत पोहचण्यासाठी ताण सोसावा लागत आहेत. त्यामुळे वेळेवर उपचार मिळण कठीण होत आहे. जरी सध्या रुग्णालयीन सेवा आणि औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेला नसला, तरी तज्ञांच्या मते दीर्घकाळ संघर्ष चालू राहिल्यास भारतातील उपचार खर्च वाढण्याची शक्यता आहे. भारताचा औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरणांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः कच्चा माल, औषधी घटक (API- Active Pharmaceutical Ingredient) , तसेच प्लास्टिक आणि रासायनिक घटक यांसारख्या आवश्यक वस्तू परदेशातून आयात केल्या जातात. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील उत्पादन खर्चावर होतो.

Strait of Hormuz impact India सध्या या युद्धामुळे महत्त्वाच्या व्यापार मार्गांमध्ये अडथळे येत आहेत. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या मार्गावर परिणाम झाल्यास वाहतूक खर्च, विमा खर्च आणि इंधनाच्या किमती वाढत आहेत. यामुळे वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचे उत्पादन अधिक महाग होण्याची शक्यता आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सध्या कंपन्या वाढलेला खर्च स्वतः सहन करत आहेत. त्यामुळे रुग्णांवर तात्काळ परिणाम जाणवत नाही. मात्र, जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली, तर औषधांच्या किंमती आणि रुग्णालयातील उपचार खर्च वाढून त्याचा थेट भार रुग्णांवर पडेल. याशिवाय, सिरिंज, ग्लोव्हज, कॅथेटर यांसारख्या वैद्यकीय वापरातील वस्तूंच्या पुरवठ्यात विलंब होत असून त्यांच्या किमती वाढण्याचे संकेत आहेत. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. जागतिक स्तरावरही या युद्धाचा परिणाम औषध पुरवठा साखळीवर होत असल्याचे दिसून येते. वाहतूक खर्चात वाढ, लॉजिस्टिक्समध्ये अडथळे आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे औषध उद्योगावर दबाव वाढत आहे. तज्ञांचे मत आहे की, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी ही एक “साखळी प्रतिक्रिया” आहे. युद्ध जितके लांबेल, तितका त्याचा परिणाम आरोग्य क्षेत्रावर अधिक गंभीर होऊ शकतो. विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरीब रुग्णांसाठी उपचार अधिक महाग होण्याची शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात भारतातील सामान्य नागरिकांच्या आरोग्य खर्चात वाढ होऊ शकते, ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापित करणे ही हेच यावरील खरे उत्तर आणि उपाय आहे.


Middle East conflict health crisis global health crisis war, WHO warning Middle East war, war impact on healthcare systems, healthcare crisis Middle East, Iran Israel conflict health impact, Lebanon war casualties, war and public health crisis, hospitals under attack war, humanitarian crisis Middle East

Similar News