उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेना कुणाच्या बाजूने? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. मात्र शिवसेना खासदारांनी केलेल्या मागणीमुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसंदर्भात शिवसेनेची भुमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

Update: 2022-07-17 06:17 GMT

राज्यात सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचे जाहीर केले आहे. त्यापार्श्वभुमीवर हे सरकार बेकायदेशीर असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी संवाद साधला असता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेनेची भुमिका काय असणार याबाबत भाष्य केले आहे.

संजय राऊत दिल्ली येथे मॅक्स महाराष्ट्रशी बोलत असताना म्हणाले की, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दिला आहे. मात्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ही भूमिका असणार नाही. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीत नेमका पाठींबा कुणाला द्यायचा याविषयी चर्चा होणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिंदे सरकारने निधी अडवणे योग्य नाही

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा निधी अडवल्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीचा 9 हजार 500 कोटींचा निधी थांबवला आणि शिवसेनेचा निधी सुरू ठेवला असला तरी हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. मात्र अशा प्रकारे निधी थांबवणे चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले.

तसेच राऊत यांना दिपीली सय्यद यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची भेट होऊ शकते, असं म्हटलं आहे. त्याबद्दल संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, मी पक्षाचा लहान कार्यकर्ता असून मला याविषयी माहिती नाही.

पुढे मंत्रीमंडळाच्या विस्तारावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन मंत्र्यांची कॅबिनेट राज्य चालवत आहे. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे. तर त्यावर आशिष शेलार यांनी घटनेची आठवण करून दिली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला घटना माहिती आहेच पण भविष्यातील दुर्घटनाही माहिती आहेत. मात्र देशाच्या घटनेला नैतिकतेला आधार आहे. पण सरकार नैतिकतेच्या पायावर उभा आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले, हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? आणि घेऊ शकत असेल तर मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. ४० आमदारांपैकी अनेक आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या - संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, अशा वेळेला शपथ घेतल्यास सरकार कोसळेल, असंही संजय राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News